subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, May 31, 2011

पं.मुकुंद मराठे -सी.डी. प्रकाशन ९ जूनला

पं. मुंकुद मराठे. गेली १६ वर्षे शास्त्रीय संगीताचे एकनिष्ठपणे अध्यापन करणारे गुरू म्हणून परिचित. कसदार व दमदार गायकीने त्यांची मैफल ऐकणा-यांच्या नेहमीच लक्षात रहाते. शास्त्रीय संगीताची गायकी ग्वाल्हेर घराण्याची. पण बनारसच्या ठुमरी आणि दादरावर वेगळी हुकमत.

त्यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा आविष्कार घडविणारी रागरंग ही सीडी तालयोगी पं, सुरेश तळवलकर यांच्या हस्ते गुरूवार ९ जूनला पुण्याच्या एस एम जोशी सभागृहात प्रकाशित होत आहे.यावेळी चित्रकार रवि परांजपे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी व आकाशवाणी पुणे केंद्रांचे संचालक पतंजली मादुस्करविशेष उपस्थित रहाणार आहेत.

यावेळी पं. मुकुंद अनंत मराठे यांची शास्त्रीय, उपशास्त्रीय रागांची मैफल आयोजित केली आहे. याला हार्मेनियमची साथ करतील डॉ. अरविंद थत्ते आणि तबल्यावर साथ करणार आहेत पं. अरविंदकुमार आझाद. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

Wednesday, May 25, 2011

गंधर्वयुगाच्या पुनःप्रत्ययाचा 'आनंद'

बालगंधर्व चित्रपट पाहून आलेल्या युवकांच्या घोळक्‍यातून एक आवाज उमटला, "काय, आवाज लागलाय यार! मस्तच. एक नंबर. आपल्याला तर जाम आवडलं बुवा.....'
तितक्‍यात दुसरा आवाज उमटला, "अगदी खरंय, मी आधी नाट्यसंगीत फारसे ऐकायची नाही; पण या गाण्यांची गोडी लागली.' दुसरीकडे याच प्रेक्षकांच्या घोळक्‍यात मिसळलेले दोन आजोबा गप्पा मारत होते, "गाणी ऐकताना अगदी बालगंधर्वांचीच आठवण झाली. हे शिवधनुष्य चांगले पेलले......'
बालगंधर्वांच्या गाण्याची नव्या पिढीला ओळख करून देणारा आणि जुन्या पिढीला पुन्हा त्या संगीतनाटकाच्या सुवर्णयुगात नेणारा आवाज आहे, आनंद भाटे यांचा.
बालगंधर्व यांच्या जीवनावर चित्रपट करायचा म्हणजे अनेक आव्हाने नक्कीच समोर असणार; पण त्यातील सगळ्यात मोठे आव्हान असणार ते बालगंधर्वांची गायकी पुन्हा नव्याने उभी करण्याचे. बालगंधर्वांच्या ध्वनिफिती न वापरता, गायकाकडून ही गाणी गाऊन घेण्यात आली. यामध्ये दुहेरी आव्हान होते. बालगंधर्व हे केवळ गायक-नट नव्हते तर अनेकांचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या भक्तांच्या अपेक्षांना उतरण्याचे आव्हान त्यात होतेच; पण त्याचबरोबर नव्या पिढीलाही ही गाणी आपली वाटली पाहिजेत, बालगंधर्वांची शैली जपत त्यात नावीन्यताही जपली पाहिजे. भाटे यांनी या सर्व आव्हानांचा अत्यंत आत्मविश्‍वासाने सामना केला आणि त्याला यश आल्याचे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते. बालगंधर्व हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे ही खूप चांगली आणि आव्हानात्मक गोष्ट होती. निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत सगळी भट्टी जमून आली. त्यामुळे प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. चित्रपटात पार्श्‍वगायन करण्याची संधी आनंद यांना मिळाली हे त्यांचे मोठे भाग्य आहे. बालगंधर्व यांची जी गायकी कळली ती कशी मांडता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चित्रपटात वेळेचे बंधन, दृष्याची सुसंगती या गोष्टी सांभाळाव्या लागल्या. त्यादृष्टीने त्यांनी गाण्यात योग्य ते बदल केले. या बदलांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
"चिन्मया सकल हृदया....' हे गाणे बालगंधर्व म्हणतात असे दृष्य चित्रपटात आहे. हे खरे बालगंधर्वांचे गाणे नाही. संगीतकार कौशल इनामदारने नवीन चाल देऊन भजन चित्रपटात आणले. परंपरेशी सुसंगत चाल करणे आव्हान होते. आनंद, आदित्य ओक व कौशल अशी त्यांची चांगली टीम जमली होती. तिघांनी मिळून या गाण्यांविषयी, सादरीकरणाविषयी विचार केला. बालगंधर्वांच्या गाण्यात हे विसंगत वाटता कामा नये हे आव्हान स्वीकारले. अनेक लोकांना ते आवडले. चांगला प्रतिसाद रसिकांकडून मिळाला. बालगंधर्वांच्या सुवर्णकाळाचा पुनःप्रत्यय प्रेक्षकांना दिल्याबद्दल वेगळेच समाधान "बालगंधर्व'च्या टीमला मिळाले आहे यात शंका नाही.

-वसुधा जोशी

http://www.esakal.com/esakal/20110521/4751203579187930167.htm

Friday, May 20, 2011

भेट दोन गंधर्व युगांची

मी नाटकाचा वेडा माणूस...बालगंधर्व मुंबईला आमच्या मामाकडे यायचे. त्यावेळी लांब बसून त्यांना ऐकायचो...मध्येच खुळ्यासारखा एखादा प्रश्न विचारायचो...आमच्यातले अंतर कमी होत गेले. १९३२ मध्ये एका चटईवर बसून गप्पा मारण्याइतके आमचे संबध जमले...माझं आणि बालगंधर्वाचे नात हे भक्त आणि दैवतासारखे होते ...

आयुष्याची शताब्दी गाठलेले बुजूर्ग कलाकार अण्णासाहेब शिरगावकर जुन्या आठवणींना उजाळा देत होते...हेच बालगंधर्व समर्थपणे साकारणारा अभिनेता सुबोध भावे समीप आला आणि अण्णासाहेबांनी त्याला चक्क वाकून नमस्कार केला!


बालगंधर्व चित्रपटातील सुबोध भावे, आनंद भाटे, माधव वझे, अथर्व कवेर्, राहुल सोलापूरकर या कलाकारांचा सत्कार संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते रामदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

बालगंधर्वाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी प्रेक्षकांना गंधर्वयुगात नेले. बालगंधर्व आणि शाहू महाराज यांची झालेल्या भेटीपासून ते त्यांच्या संगीताच्या बैठकांचे वर्णन करत त्यांनी कार्यक्रमात रंग भरला. त्याकाळात महाराष्ट्रात बालगंधर्वांचा फोटो नाही असं एकही घर नव्हतं. बालगंधर्वांची फॅशन त्या काळातल्या बायका करायच्या. शिरगावकरांनी सांगितलेल्या बालगंधर्वांच्या या आठवणीने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. बालगंधर्वांची भूमिका केलेला सुबोध भावे प्रेक्षकातून उठून शिरगावकरांकडे गेला. त्यावेळी आताच्या चित्रपटातील बालगंधर्व हेच, अशी ओळख त्यांना करून दिल्यावर या बुजूर्ग कलाकाराने चित्रपटातल्या बालगंधर्वांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सभागृहातले वातावरण नि:शब्द झाले होते.

राज्यात शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व हे तीन युगपुरुष होऊन गेले, त्यांचे कर्तृत्त्व मराठी माणसाच्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचे पांडुरंग हे जसे दैवत आहे, तसेच संगीत नटांचे बालगंधर्व दैवत आहे. शास्त्रीय संगीतातला अवघडपणा बालगंधर्वांनी नाट्य संगीतात जोपासला. शास्त्रीय संगीत रसिकांपर्यंत पोहोचवले ते बालगंधर्वांनीच, असा गौरव या वेळी कामत यांनी केला.

"पांगिरा' -20 मेपासून

"आयड्रीम प्रॉडक्‍शन'चा "पांगिरा' हा  बहुचर्चित  चित्रपट येत्या 20 मेपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. 

किशोर कदम, प्रशांत पाटील प्रमोद पवार, शशांक शेडे, मीता सावरकर, नंदिनी जोग यांच्यासह संगीतकार विजय नारायण उपस्थित होते.

"जोगवा'सारखा आशयघन चित्रपट बनविणाऱ्या टीमनेच "पांगिरा' हा चित्रपट बनविला आहे. प्रसिद्ध साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्या "पांगिरा' या कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केले आहे. संवाद-गीते, कविता तसेच प्रस्तुतकर्ते संजय पाटील आहेत. पटकथा राजीव आणि संजय पाटील यांनी लिहिलेली आहे. उपेंद्र लिमये, किशोर कदम, प्रमोद पवार, मिता सावरकर, स्मिता तांबे आदी कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत.

बदलत्या गावपांढरीची कहाणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वेदना त्यात मांडण्यात आली आहे. चित्रपटाला विविध महोत्सव आणि स्पर्धांमध्ये चोवीस नामांकने आणि अकरा पारितोषिके मिळालेली आहेत. विश्‍वास पाटील यांनी 1980 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. सोन्यासारखा घाम मातीत गाळून धरतीला हिरवा शालू नेसविणाऱ्या भूमिपुत्रांची ही उद्‌ध्वस्त जत्रा अजून किती पिढ्यांनी कोडग्या नजरेने बघायची, असा प्रश्‍न पाटील यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

Monday, May 16, 2011

जिद्द कमी पडते- पं. भालचंद्र देव

 शाहरूख खान चित्रपटात व्हायोलिनवर स्वर काढतो. त्याचे आकर्षण बाळगून अनेक विद्यार्थी व्हायोलिन शिकायला येतात. मात्र या वाद्यात स्वर शोधायचा असतो. त्यासाठी लागते ती कमालीची चिकाटी आणि जिद्द. थोडक्या वेळात येणारे हे वाद्य नाही. प्रथम अकर्षणाने आलेला विद्यार्थी पुढे वाद्याचे धडे गिरवायला येत नाही. शिकायला येणारे शार्गिद अर्धवट सोडून जातात. म्हणूनच सौ. चारूशीला गोसावी, अविनाश द्रवीड, सुरेश गुजर यांचे सारखे विद्यार्थी, शिष्य व्हायोलिनमध्ये पुढे चमकताना दिसतात. तीन हजारात तीन-चारच स्वतःचे नाव कमावतात याची खंत पं. भालचंद्र दामोदर देव यांनी व्यक्त केली.
पं. देव यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने पुण्यात आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात पं. देव यांनी मनमोकळी उत्तरे देत शब्द-सूरांची मैफल रंगवित नेली. पुण्याचे सांस्कृतिक पत्रकार सुभाष इनामदार यांनी पं. देव यांच्याशी बातचित केली. त्यांच्याकडून काही आठवणी रसिकांना ऐकता आल्या.

ज्येष्ठ रसिक, समिक्षक, कलावंत आणि व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडूलकरांच्या हस्ते स्वरबहार संस्थेच्या वतीने शनिवारी ( १४ मे) पं. देव आणि त्यांच्या पत्नी सौ. निला भालचंद्र देव यांचा सत्कार केला गेला.
स्वरानंदचे प्रकाश भोंडे, ज्येष्ट व्हायोलिन वादक पं. फैय्याज हुसेन खॉं यांना देवांविषयीचे विषेश सांगितले..
पं. गजाननबुवा जोशी यांचेकडे पं. देव यांनी व्हायोलिनचे धडे गिरविले. त्यांचे सांगणे होते की, तु व्हायोलिनीस्ट होण्यासाठी अजून ५ वर्षे रिय़ाच कर. पण परिस्थितीमुळे आपल्याला टेलिफोन खात्यात नोकरी पत्करावी लागली. मात्र व्हायोलिन शिकण्याची जिद्द. तेच एकमेव व्यसन जडले. आयुष्यभर तेच केले. आज मी तृत्प आहे. माझ्या मेहनतीला फळ आले. माझ्या मुलीचा काल (शक्रवारी ) व्हायोलिन गाते तेव्हा...कार्यक्रम ऐकला आणि तिने कलेचे चिज केले असे वाटले., असे विचार पं. भालचंद्र देव  यांनी सत्कारप्रसंगी मांडले.
शास्त्रीय संगीताची आवड असली तरी नोटेशन लिहण्याची सवय सुगमसंगीताकडे वळल्याने झाली. याचे श्रेय ते स्वरानंद या संस्थेला देतात. अरुण दाते, वि.र.गोडे, विसुभाऊ बापट, आनंद माडगूळकर, यशवंत देव, बबनराव नावडीकर, मालती पांडे अशा कित्येक कलावंतांना पं. देव यांनी व्हायोलिनची साथ केली. पण हिराबाई बडोदेकरांबरोबर केलेल्या साथीची आठवण त्यांच्या लेखी वेगळी होती. ती आठवण सांगताना हिराबाईंच्या लडीवाळ स्वरांची यादगार त्यांना सांगावाशी वाटली. नागेश खळीकर यांचेबरोबर भारत गायन समाजात १९६१ साली केलेल्या साथीची पसंती आणि त्यावेळी मिळालेल्या १५ रुपयांच्या बिदागीचा किस्साही पं. देव यांनी ऐकविला.
सत्काराला उत्तर देताना त्यांनी पुणे आकाशवाणी, आणि भारत गायन समाज या संस्थाना आवर्जून उल्लेख केला. आपल्या वादनाला यामुळे दिशा प्राप्त झाल्याचे ते सांगतात. आयुष्यातही गेली ४९ वर्षे सौ.ची साथ मोलाची मिळाल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.
व्यासपीठावर, कार्यक्रमात चमकतो तो गायक किवा संगीतकार. पण गाण्याला उठाव देणा-या साथीदारांची ओळख किती जणांना असते, असा प्रश्न उपस्थित करून श्री. मंगेश तेंडूलकरांनी अनेक चित्रपटात व्हायोलिन आणि सारंगी वादकांनी कमाल वादन करून गाण्याला उठाव दिला आहे.पण त्यांचे नाव माहित नसते. ते अज्ञात असणारे असंख्य कलावंत गाण्यात कलाकुसर करतात. जीव ओततात. यानिमित्ताने पं. देव यांचे नाव समोर आले. त्यांच्या कलेची स्वतंत्र ओळख झाली. त्यांच्या वादन कलेचा गौरव झाल. गाण्याला नटविणा-या अशा साथीच्या कलावंताचा सन्मान व्हायला हवा , असे सांगून तेंडूलकरांनी पं. देव यांचा सत्कार केला.
फैय्याज हुसेन खॉं यांनी व्हायोलिनमुळे आपल्याला भरभरून आनंद-प्रेम मिळाल्याचे सांगितले.
निवारा वृध्दाश्रमाच्या सभागृहात सत्कार कार्यक्रमाची सुरवात पं. देव यांची कन्या आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी यांनी व्हायोलिनवर सादर केलेल्या श्यामकल्याण रागाने झाली.
पं. देव यांनी आरंभी राग यमन आणि नंतर तीन नाट्यपदे व्हायोलिनवर रंगवून रसिकांना स्वरांची ओंजळ अर्पण केली.

शुक्रवारी ( १३ मे) व्हायोलिन गाते तेव्हा...हा हिदी-मराठी गीतांचा नजराणा व्हायोलिनच्या स्वरातून आविट गोडीत रसिकांना बहाल केला. गांधर्व महाविद्यालयात सादर झालेल्या कार्यक्रमाला भरभरून दाद मिळाली. वन्समोअरची शिफारीशही झाली. शब्देविणे स्वरातून बोलणारे व्हायोलिन एकेका गाण्यातून बहरत होते. सौ. चारूशीला गोसावी यांची वाद्यावरील हुकूमत आणि मेहनतीचा कस प्रत्येक रचनेतून सिध्द होत होता. संथ, उडत्या चालींच्या रचना सादर करून रसिकांना टाळ्या द्यायला भाग पाडले. सौ. विनया देसाई यांचे निवेदन आणि ताल व साथीच्या वाद्यांच्या सुरेल आविष्कारातून सारे श्रोते तृप्त झाल्याचे दिसत होते.


सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276


Saturday, May 14, 2011

व्हायोलिन वादन-'शब्दांविना कळले

'व्हायोलिन गाते तेव्हा...'
 'शब्दांविना कळले सारे शब्दांच्या पलीकडले...' असे म्हणता म्हणता जेव्हा व्हायोलिनचे सूर शब्दांतीत बोल काढू लागते, तेव्हा नकळतच हात जुळतात आणि टाळ्यांच्या कडकडाटासह वाह वाह आपसूकच उमटू लागतात, अशी अनुभूती आज पुणेकर रसिकांनी 'व्हायोलिन गाते तेव्हा...' या कार्यक्रमात घेतली.
ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित भालचंद्र देव यांच्या अमृतमहोत्सवी समारंभानिमित्त दोन दिवसांच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील प्रथम दिनी त्यांची कन्या व शिष्या चारुशीला गोसावी यांचे व्हायोलिन वादन झाले. या वेळी ५०चे दशक गाजविणाऱ्या काही अजरामर हिदी-मराठी गाण्यांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.
मधाळ सुरांनी मोहळ ही शब्दांची होती, की शब्दांविना होती अशा संभ्रमात टाकणारे हे वादन झाले. या वेळी 'तुझे गीत गाण्यासाठी सूर लाभू दे रे...', 'थकले रे नंदलाला...' अशा भक्तिगीतांसह 'बय्याँ ना धरो...', 'चांदणे शिपीत जाशी...' अशा प्रेमगीतांचेही या वेळी सादरीकरण झाले. स्वरांमधील लडीवाळपणा, मुरक्या, हरकती सारे काही गळ्याप्रमाणे गोसावी यांच्या व्हायोलिनच्या तारांनीही तेवढाच उभेउभ साकारला. प्रत्येक गाण्यातील बारकावे टिपत सादर केल्या जाणाऱ्या कलाविष्काराला तेवढ्याच दिलखुलासपणे रसिकही दाद देत होते.
'श्रावणात घन नीळा बरसला...' सादर करताना अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात व्हायोलिनच्या सुरांनी न्हाऊ घतले.
या वेळी 'जांभूळ पिकल्या झाडाखाली...' अशा उडत्या चालीच्या गीतांचेही सादरीकरण करून श्रोत्यांच्या टाळ्यांचा ठेका मिळविला. एखाद्या लावण्यवतीने आपल्या नृत्याने मोहळ घालून मिळवावी, तशी दाद व्हायोलिनच्या सुरांनी मिळविली. गीतांमधील वैविध्याचे दर्शन घडविताना 'काहो धरीला मजवरी राग...' ही लावणीदेखील तेवढ्याच ताकदीने सादर करण्यात आली.
या वेळी शुभदा आठवले यांनी हार्मोनियम, श्रद्धा कानिटकर यांनी सिथेसायझर, राजेंद्र साळुंखे यांनी तालवाद्यांची, तर रविराज गोसावी यांनी तबल्याची साथसंगत केली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Thursday, May 5, 2011

शब्दातून व्यक्त होणारे -श्रीकांत आफळे


शब्दातून व्यक्त होणारे हे आमचे मित्र श्रीकांत आफळे शब्दातून व्यक्त. तशी आधी नोकरी केली CWPRS मध्ये.
पण नंतर सणक आली नोकरीत निवृत्ती स्वीकारली आणि छंदबध्द जीवन जगण्याचा मार्ग निवडला.
नोकरीत असतानाही पत्रिका करणे, भविष्य सांगण्याचा छंद होता. आता मात्र तोच छंद त्यांनी वाढविला. जोपासला.
आता इतरांच्या समस्यांना शब्दाचे माध्यमातून आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ते बोलतात जसे गोड तसे. शब्दांशी खेळण्याची कलाही जाणतात. कथाही रचतात.
असे हे मित्र अक्षयतृतियेच्या निमित्ताने तुमच्या भेटीला आणतोय.
तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.
त्यांच्या प्रेमळ वाणीचा स्पर्श तुम्हालाही घडेल..कळलं का?
===================================================

शब्द म्हणजे

भावनांची फुलं
फुलांना गंध असतो
तसा शब्दांना अर्थ असतो
फुल तेच असते
पण ते जेव्हा देवाला वाहतात
तेव्हा त्यात भक्ति आणि भाव असतो
जेव्हा गळ्यात माळतात
तेव्हा शृंगार, प्रेम व्यक्त होते
तेच फुल जेव्हा स्त्री केसात माळते
तेव्हा तिच्या सौंदर्यात भर पडते
शब्दांचे पण तसेच आहे
कवी वा लेखक शब्दांचा आधार घेतो
त्यांचं सौदर्य तेव्हा वेगळं असतं
शब्दांना भावना असतात
भावना जाणणा-यांनाच त्या कळतात
शब्द फक्त डोळ्यांनी पहाणे
म्हणजे जाणणं नव्हे
शब्दांच्या पाठीमागच्या भावनांचा शोध
सगळेच घेतात असे नाही
शब्द भावनेचं अभिव्यक्त रुप
शब्द असतात भावनांचं प्रतिबिंब
ते जेव्हा एकटे असतात
तेव्हा ते अधिक सुंदर वाटत नाहीत
त्यांना अर्थ असेल असे नाही
पण एखादा जेव्हा जवळ करतो
त्याची सुंगर गुंफण करतो
तेव्हा ते सुंदर दिसू लागतात
शब्दांना लय, सूर प्राप्त झाले की,
मग त्याचे गाणे होते
त्यातले सौंदर्य, भावना, अर्थ
कळणारालाच कळतो
समजणा-याच कळतो



श्रीकांत आफळे,
सी-१/६, गुरूराज सोसायटी, पद्मावती,
पुणे- ४११०३७
मोबा. ९८९०३४८८७७

शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास

केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि  त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्‍यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्‍या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!
गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली.  मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.
कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्‍यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.
पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर,  पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.
साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्‍या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.
२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.
मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.

आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्‍या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापासही नाही. पण एक गोष्ट त्यांना मनापासून जाणवते आणि ती म्हणजे, संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.