subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 24, 2016

पं.प्रभाकर जोग यांचा ८५वा वाढदिवस



संगीतसाधक प्रभाकर जोग यांचे८५ वर्षांत पदार्पण
ज्येष्ठ संगीतकार, श्रेष्ठ व्हायोलीनवादक आणि उत्तम संगीतसंयोजक पं. प्रभाकर जोग यांचा आज ८५ वा वाढदिवस..त्यांच्यासारख्या उत्तम कलाकाराची ओळख ही त्यांच्या त्या काळातल्या आठवणीतून झाली पाहिजे..त्यांनी उत्तम आरोग्यपूर्ण अशी शतायुषी पुरी करावी अशीच सा-या संगीत चाहत्यांची सदिच्छा आहे..
सांस्कृतिक पुणेकडून त्यांना वाढदिवसाच्या केवळ शुभेच्छाच नाही तर त्यांच्या आयुष्यातल्या कारकीर्दीचा त्यांनीच घेतलेला आढावा पुन्हा इथे देताना, त्यांचे काम . त्यांची कुशलता आणि त्यांनी संगीतकलेची केलेली सेवा रसिक वाचकांसमोर देता आली तर पहावे हा उद्देश..त्यांच्याच शब्दात…..




सुधीर फडके यांनीप्रतापगडचित्रपटाचे काम पुण्यामध्ये सुरू केले होते. व्हायोलिनसाठी प्रभाकर जोग यांना बोलवा, असे ललिताबाईंनी बाबूजींना सांगितले होते त्यानुसार १९५० मध्ये मी वादक म्हणून त्यांच्यासमवेत काम करण्यास सुरुवात केली. ‘सुवासिनीचित्रपटाच्यावेळी मी त्यांचा संगीत साहाय्यक झालो. त्यामुळे साहजिकच पुढे गीतरामायणाचे संगीत संयोजन करण्याची संधी मिळाली. माझ्या घरामध्ये गीतरामायणाच्या तालमी होत असत. वादकांना सूचना देण्यापासून तेऑर्केस्ट्रा कंडक्टकरण्यापर्यंतची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली होती. ती मी यशस्वीपणे पार पाडली. त्याचे प्रतििबब गीतरामायणातील गीतांच्या लोकप्रियतेमध्ये दिसून येते.


बाबूजींचा मी इतका विश्वास संपादन केला होता की, गीतरामायणातीलचला राघवा चला पहाया जनकाची मिथिलाहे गीत स्वरबद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. या गीतासाठी अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा आवाज वापरला होता. ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथाया बाबूजींच्या स्वरातील गीताची अस्ताई मी संगीतबद्ध केली होती

गीतरामायणामध्ये वादकांना शंभर रुपये मिळायचे, तर साहाय्यक असल्यामुळे मला सव्वाशे रुपये मानधन मिळायचे. वादकांचे चहापान करण्यासाठी पैसे खर्च व्हायचे. पण कामामध्ये मिळणाऱ्या आनंदापुढे या पैशांचे मोल वाटायचे नाही. आकाशवाणीवरून आठवडय़ाला एक याप्रमाणे प्रसारित होत असलेल्या गीतरामायणातील निम्मी गाणी होईपर्यंत माझ्याकडे घरामध्ये रेडिओदेखील नव्हता. नंतर मी रेडिओ विकत घेतला. एका अर्थानेगीतरामायणहा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हणता येईल.

माझ्या आयुष्यातली आणखी एक गोष्ट त्याच दरम्यान घडली. रोहिणी भाटे यांच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी कुसुम वाड ही गायिका येत असे. मी त्यांचा व्हायोलिनवादक होतो. आमचा परिचय झाला आणि त्याचे रूपांतर विवाहामध्ये झाले. कुसुम वाड नीला जोग झाली

लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल काहे संगीतकार म्हणून मी स्वतंत्ररीत्या स्वरबद्ध केलेले पहिले गीत. पूर्वी आकाशवाणी नवीन गायक, कवी आणि संगीतकारांना संधी देत असे. त्यासाठी ऑडिशन घेतली जात असे. यामध्ये नीलाने सहभाग घेतला होता आणि मला तुमचेच गाणे पाहिजे, असा प्रेमळ स्त्रीहट्ट धरला. त्या वेळी माझ्याकडे स्वत:चे असे कोणतेच गाणे नव्हते. ‘लपविलास तू हिरवा चाफाहे गाणे मी स्वरबद्ध केले आणि तिने ते गायले. हे गाणे एवढे लोकप्रिय झाले की तिची गायिका म्हणून ओळख झाली. मात्र एचएमव्ही कंपनीने या गीताची ध्वनिफीत (कॅसेट) करण्याचे ठरविले. मात्र त्यासाठीश्रेणीचा कलाकार हवा ही त्यांची अट होती. नीलाबीश्रेणीची गायिका होती. त्यामुळे ते गाणे मालती पांडे यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केले गेले. ध्वनिफीत करण्यासाठी त्याच्या जोडीलाकशी मी सांगू वडिलांपुढे, श्रावणातल्या घनमेघांचा रंग मला आवडेहे गदिमांचेच गीत घेण्यात आले होते. तर मंदाकिनी पांडे यांच्या स्वरांतसत्यात नाही आले स्वप्नात येऊ काआणिसोनियाचा पाळणा रेशमाचा डोरही संजीवनी मराठे यांची गीते स्वरबद्ध केली होती.


लपविलास तू हिरवा चाफाया गीताची एक वेगळीच गोष्ट आहे. मुळात हे गाणे माडगूळकरांनीलाखाची गोष्टचित्रपटासाठी लिहिले होते. ते स्वरबद्ध करण्यासाठी बाबूजी यांच्यासमवेत मी बसलो असताना राजाभाऊ परांजपे तेथे आले आणि त्यांनी गदिमांना म्हटलं, ‘अण्णा हे गाणं नाही चालणार. गाणं छान आहे, पण मी चित्रपटातीलसिच्युएशनबदलतो आहे. त्यामध्ये हे गाणं बसत नाही.’’ राजाभाऊंनी नाकारलेलालपविलेला चाफामला उपयोगी पडला. ‘लाखाची गोष्टचित्रपटामध्ये राहून गेलेले हे गाणे जयसिंग सावंत या माझ्या मित्राकडे होते. नीलाने हट्ट केल्यानंतर मला त्याची आठवण झाली. जयसिंग याच्याकडून मी ते गाणं आणलं आणि त्याला चाल लावली. नीलाने ते आकाशवाणीसाठी गायले. आणि या गाण्याने संगीतकार म्हणून माझी ओळख झाली.


जावई माझा भलाहा माझा संगीतकार म्हणून पहिला मराठी चित्रपट. या पहिल्याच चित्रपटासाठीकाय मागू मी देवापाशी अंगणी गंगा घरात काशीहे गीत आशा भोसले यांनी गायिले होते. मात्र त्या वेळी लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी आणि किशोरकुमार या पाश्र्वगायकांचाएचएमव्हीकंपनीशी रॉयल्टीच्या मुद्दय़ावरून वाद झाला होता. आम्ही गायलेल्या गीताची ध्वनिफीत निघणार नाही, असा निर्मात्याबरोबर करार करून मगच ते चित्रपटासाठी पाश्र्वगायन करीत असत. या वादाचा फटकाजावई माझा भलाचित्रपटाला बसला. चित्रपटातील गीते चांगली असूनही ध्वनिमुद्रिका नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.

पणस्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणीआणिप्रिया आज माझी नसे साथ द्यायाअशा गीतांनी मला सुगम संगीतामध्ये मुशाफिरी करता आली याचा आनंद वाटतो. सुधीर फडके यांचा अमृतस्वर लाभलेली ही गीते लोकप्रिय झाली हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी सांगीतिक कारकीर्द सुरू झाली त्या बाबूजींनी माझ्या संगीत दिग्दर्शनामध्ये ही गाणी आनंदाने गायिली. जे स्वत: परिपूर्ण संगीतकार-गायक अशा बाबूजींना मी गाण्याची चाल सांगायची म्हणजे माझ्यावर दडपण असायचे. पण बाबूजी हे स्वत: ते दडपण दूर करायचे. ते अगदी एखाद्या विद्यार्थ्यांसारखं गाणं शिकायला बसायचे. एखादी वेगळी जागा घेतली तर चालेल का, असे ते मला विचारत. ‘तुम्ही सांगता तसे माझ्या गळ्यातून आलेच पाहिजे,’ असे सांगून ते सराव करायचे. यशाच्या शिखरावर असताना मेहनत आणि अचूकतेवर भर देणारा असा दुसरा संगीतकार-गायक मी पाहिलाच नाही.

स्वर आले दुरूनीया गीताची जन्मकथा रोमांचकारी आहे. एकदा ध्वनिमुद्रण संपवून मी बसने घरी येत होतो. प्रवास सुरू असताना मनात काही वेगळेच चालले होते. एक सुरावट जन्म घेत होती. मग खिशातील पेन काढून बसच्या तिकिटाच्या मागे मी नोटेशन लिहिले. घरी आल्यानंतर संवादिनी घेऊन मी ते गायलो. चाल पक्की झाली. आता त्याला शब्द हवे होते. हे गाणे कोण लिहू शकेल असा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर संगीतकार यशवंत देव यांचे नाव आले. या चालीला समर्पक शब्द संगीताची जाण असलेले देवसाहेबच देऊ शकतील अशी माझी पक्की खात्री झाली. देव हे त्या वेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर काम करीत होते. मी देवसाहेबांना दूरध्वनी केला आणि त्यावरच मी त्यांना नोटेशन ऐकविले. त्यांनी मला पत्राद्वारे नोटेशन पाठविण्यास सांगितले. त्यांचे उलट टपाली पत्र आले आणि शब्द होतेस्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी’. गाण्याचे शब्द खरोखरच दुरून आले होते. हे गीत गाण्याची मी बाबूजींना विनंती केली. त्यांनी या गीताचे सोने केले हे मी वेगळे सांगायला नको. त्याच्या जोडीला दुसरे गीत हवे म्हणून पुन्हा देवांनाच गळ घातली आणि त्यांनीप्रिया आज माझी नसे साथ द्यायाहे गीत मला दिले. तेही बाबूजींनी अप्रतिम गायले आहे.

प्रपंच चालविताना पैसे लागतात. सुधीर फडके यांच्यासमवेत काम करताना पैसे मिळायचे. पण वाढत्या घरखर्चाची आवश्यकता ध्यानात घेता गरजा भागविण्यासाठी मिळणारे पैसे पुरायचे नाहीत. मग बाबूजी यांच्याशी चर्चा करूनच मी हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये वादक म्हणून दाखल झालो

आघाडीच्या सर्वच संगीतकारांच्या स्वररचनांमध्ये व्हायोलिनवादनासाठी मला निमंत्रण असायचे. मदन मोहन यांना माझे वादन आवडत असे. तरमी केव्हा उपलब्ध आहे हे जाणून घेऊनच मग ध्वनिमुद्रण निश्चित करावे,’ असे भूपेन हजारिका आपले साहाय्यक अनिल मोहिले यांना सांगायचे. मी मुंबईमध्ये गेलो तो काळ ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांचा होता. अशा चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आणि संगीतकार एस. एन. त्रिपाठी खूपच लोकप्रिय होते. त्यांच्याकडेही काम करण्याची संधी मिळाली. ते माझ्याशी छान गप्पा मारत असत. ‘इतना फास्ट नोटेशन लिखनेवाला म्युझिशियन हमने देखा नहीं,’ अशा शब्दांत माझे कौतुक झाले. त्यामुळे मदन मोहन, सज्जाद, एस. डी. बर्मन, रोशन, . पी. नय्यर यांच्यापासून आर. डी. बर्मन, जयदेव, राजेश रोशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन ते अगदी नव्या पिढीेचे म्हणता येतील असे अन्नू मलिक, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद अशा सर्व संगीतकारांबरोबर मी काम केले आहे.

No comments:

Post a Comment