subhash inamdar

subhash inamdar

Saturday, September 26, 2020

चार संगीतकारांची मर्मस्थळे सांगणारा ..चतुरंग




सी रामचंद्र. मदन मोहन. ओ. पी.नय्यर. रोशन..चतुरंग

6 Feb. 2020

सी रामचंद्र. मदन मोहन. ओ. पी.नय्यर. रोशन.. या चार महान संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या अजरामर गीतांचा आस्वाद देता देता ती गाणी का इतकी वर्षे रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य का गाजवून आहेत याचा साक्षात्कार देणारा चतुरंग हा संगीतमय कार्यक्रम आजही आपले वेगळेपण मनात कायम ठेवून आहे.. रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अनुभवलेले सडेतीनतास लिहिताना डोळ्यात साठवून राहिले याचे प्रमुख कारण मृदुला दाढे- जोशी यांनी चार संगीतकारांच्या गाण्यांची केलेली बुद्धिनिष्ठ विचार मांडणी.. कार्यक्रम संगीताचा ..पण लक्षात रहाते ती मृदुला दाढे यांनी त्याविषयी सांगितलेली मर्मस्थाने आणि संगीतकारांनीही केला नसेल असा त्यामागे ठेवलेला विचार.
शरयू दाते, सई टेंभेकर आणि संदीप उबाळे यांनी त्या गाण्यांना सादर करून जी मौज रसिकांना आपल्या उत्तम गायनातून अनुभवायला दिली त्याबद्दल हमलोगचे सुनील देशपांडे यांना मनापासून दाद देणे हे गरजेचे आहे.. चतुरंग.. खरेच चार संगीतकारांवरचा कार्यक्रम पण तो पेलला तो तीन गायक आणि एक अभ्यासपूर्ण भाष्य केलेल्या मृदुला दाढे-जोशी या चार कलावंतांनी.. तो चोखंदळ आणि विचक्षण वाचक तसेच जाणकार श्रोते असलेल्या पुणेकरांना तिकीट काढून तो मनापासून ऐकवासा वाटला यातच याचे यशस्वीपण सामावलेले आहे.






त्या संगीतकारांच्या सुवर्णकाळात जेंव्हा मेलडी ही अनभिषिक्त सम्राट होती. चाली छान होत्या. गाणं सुरेल होते. शब्दात ताकद होती. हे सारे मान्य केले तरीही त्यात विलक्षण दैवी गुण होता. त्या भारावलेल्या अवस्थेतून बाहेर आलो की त्यातली सौन्दर्यस्थळे नव्याने जाणवायला लागतात..या गाण्यांचा एक संगीत अभ्यासक म्हणून मृदुला दाढे यांनी याविषयी केलेले भाष्य त्या चालीविषयी वेगळी दृष्टी देतात . मग ते गीत रसिकांसमोर गायक गायिका सादर करतात..यातूनच संगीतकारांची त्यामागच्या विचारांची दिशा कळण्यास मदत होते आणि आपण भारावून जातो.
प्रत्येक संगीतकाराचा स्वभाव आणि त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्यांच्या चालीतही आढळते असे मृदुला दाढे यांना वाटते आणि ते त्या सोदाहरण मांडतातही.
रोशन यांचा शास्त्रीय संगीतावर विलक्षण प्रेम..त्यांची गाणीही त्यातल्या बंदीशीसारखी ..मन रे तू काहे ना धीर धरे ..संदीप उबाळे यांच्या आवाजात ते दर्द भरे गीत मोहिनी घालते.

काळजात किनारी दुःख आणि रांगडी मस्ती असणारा संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचा उल्लेख होतो.. त्यांचे बलमा बडा नादान हे गीत शरयू दाते तेवढ्याच सुरेलतेने गाऊन रसिकांना मोहित करतात.
मदन मोहन हे नाव उच्चारताना काळजात कळ येते..अक्षय कारुण्याचा झरा म्हणजे मदन मोहन..दुःख आणि तेही भरजरी
अनुभवावे ते या संगीतकाराच्या गाण्यातून.. हम प्यार मे जलनेवलो.. या गण्यातून सईने ते नेमके स्वरातून उलगडून दाखविले.

ओ. पी.नय्यर यांच्या गाण्यात तुम्हाला ते भावनेला थेट भिडवतात. तीव्र भाव, जिद्द, रांगडेपणा सारे त्यांनी आणि आशा भोसले यांनी त्या गाण्यात जपले..त्यांचेच एलो मै हारी पिया.. हे गीता दत्त यांच्या अवजातले गाणे सईने सादर करीत ते दर्शन घडविले..
असे चार संगीतकांचे सांगेतीक दर्शन चतुरंगच्या मंचावर सतत उलगडत जात होते.. कधी स्वरातून तर कधी शब्दातून ते सारे संगीतकार वेगवेगळ्या भावनातून इथे सिद्ध होतात.. मग ती गाणी कधी बंदीशींवर आधारित तर कधी उत्तम रचनेतून कानी येतात..

लग जा गले.. इशारो इशारोमे..अकेली हूँ मै...तुम आगर मुझको ना चाहो..असेल नाहीतर.. तुम क्या जानो..आप के हसीन रुख पे..ओ चांद जहाँ.. चैन से हमको कभी..
सारीच हिंदी चित्रपटसृष्टीला आपले चार चांद लावणारे हे चार संगीतकार ऐकताना आपण स्वतःला भाग्यवान समजतो..
ये जिंदगी उसिकी है. जो किसिका हो गया..या गाण्यातून जेंव्हा मृदला दाढे-जोशी समारोपाचे गीत सादर करतात तेंव्हा वतावरणही भारून जाते.. आण्णा म्हणजे सी. रामचंद्र यांच्या या विलक्षण गाण्याने चतुरंगने अलविदा केले..

हम लोग प्रस्तुत या कार्यक्रमाची सारी भिस्त संगीत संयोजक आणि सिंथवर आपले प्रभुत्व असलेला कलावंत केदार परांजपे यांचेकडे जाते.. प्रसाद गोंदकर-सतार..निलेश देशपांडे-बासरी.. विशाल थेलकर..गीटार..
अजय अत्रे..विक्रम भट..दोघेही रिदम मशीन आणि तबला..यांच्या उत्तम संगीत साथीने हा प्रवास आनंददायी ठरला.. चालीला योग्य असा स्वरांचा भरणा ..गाण्यातील शब्दांच्या अवकाशात संगीत संयोजकाने आकाराला आणलेली वाद्यांची सुरावट आणि तालातून बहरत गेलेली आनंददायी साथ..सारेच या वादकांनी आपल्या साथीतून रसिकांसमोर पेश केले.

असा कार्यक्रम करणे हे धाडस आहे ते सुनील देशपांडे यांनी ह्या हमलोग संस्थेने केले याबद्दल त्यांचेही आभार मानले पाहिजेत. रंग चार सांगितकारांचे हा या कार्यक्रमाचा भाग पहिला आहे. म्हणून पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.



-सुभाष इनामदार...पुणे.
Subhashinamdar@gmail. com
6 Feb. 2020

अक्षरधाराचे अनमोल कार्य

 

अक्षरधाराचे रमेश आणि रसिका राठीवडेकर


6 march 2020

पुस्तकांना वाचकापर्यंत नेणारे दाम्पत्य म्हणजे अक्षरधाराचे रमेश आणि रसिका राठीवडेकर ..



पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर सुमारे दोनहजार क्षेत्रफळावर वाचकांना आपले वाटावे अशी रचना केलेले पुस्तकांचे दालन सजवून ते पुस्तकांच्या विविध दालनातून नाटविले आहे.






एकदा परीक्षा सुरू झाल्या की पुस्तकांच्या दुकानाकडे वाचक फारसे फिरकत नाहीत..मग काही नवी आकर्षण आणि सवलत देण्याची तयारी देऊन संचालक दुकानात येण्याचे आमंत्रण देत असतात..



दुकानात हरतऱ्हेचे साहित्य उपलब्ध असते.. एखादे पुस्तक नसले तर ते मागवून देतात..वाचकाचा फोन घेऊन त्यांना त्याविषयी माहितीही देतात..आणि त्यांना पोचही करतात..






मुलांना सुट्टी लागली की खास पुस्तके मुलांना घरी नेण्याची सवलत देतात.. रोज साहित्यिक बोलावून मुलांना त्यांची भेट घडून आणतात.. .कुणी घरी वाचायला नेलेली पुस्तके परतही देत नाहीत..तर कुणी प्रतच देत नाहीत..पण हे सारे सहन करून उपक्रम दरवर्षी राबवितातच..



आजकाल पुस्तके वाचनाचे प्रमाण कमी होत आहे हे मान्य करत आता आमची अक्षरसेवा कायमस्वरूपी रहावी असाच आमचा सारा प्रयत्न असल्याचे रमेश राठीवडेकर सांगत होते..


हा अक्षरधाराच्या पुस्तक संसारात त्यांची सौभाग्यवती रसिकाताई अनमोल काम करतात..प्रसंगी कार्यक्रमाचे सारे नियोजन..अगदी निवेदनापासून आभारपर्यंत त्या उत्तम रित्या हाताळतात..





आता हे पुस्तक दालन सुरू केल्यावर रमेशजी इतर भागात पुस्तक प्रदर्शने भरविण्याचे बंद करून याच पुण्यातल्या दुकानात अधिक वैविध्य कसे आणता येईल असा प्रयत्न करीत असतात..


रमेश आणि रसिका राठीवडेकर यांचा हा अक्षरप्रवास शब्दबद्ध करणे ही खरेतर काळाची गरज आहे.



अशा पुस्तकात आपले सारे आयुष्य वेचणाऱ्या राठीवडेकर पती पत्नीच्या कार्याला आमच्यासारख्या अनेक पुस्तकप्रेमींचा सलाम..त्यांना अक्षरधारामध्ये भेटून नवी ऊर्जा मला मिळाली.. ती तुमच्या मनात बिंबविण्याचा हा प्रयत्न..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail. com

 6 march 2020

Friday, September 25, 2020

चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन




 17 March 2020

मराठी चित्रपटसृष्टी जेंव्हा सचिन पिळगांवकर, लक्षा बेर्डे.. आणि अशोक सराफ यांच्या नावावर धुमडक्यात ..आत्मविश्वासपूर्ण मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत होती.. तेंव्हा त्यांच्यासोबत असलेले आणि आपल्याला लाभलेल्या सहज अभिनयाची देणगीतून सदैव अनेकविध भूमिकेतून चमकणारे नाव जयराम कुलकर्णी..

आज मंगळवारी १७ मार्च २०२० सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी या इहलोकातून निघून गेले आणि ते सारे दिवस पुन्हा आठवणीत साठले गेले..




वयाच्या ८७ व्या वर्षी अनेक दुःख पचवत आपल्या हसऱ्या व्यक्तीत्वाने ते सारे सहन करत होते..
आज ते सारे संपले..
व्यंकटेश माडगूळकर यांच्याबरोबर पुणे आकाशवाणीच्या ग्रामीण विभागात जयराम कुलकर्णी हे आपल्या खर्जातील आवाजाने श्रोत्यांना आपलेसे वाटत गेले.. पी डी ए तुन भालबा केळकर यांच्यासोबत काही नाटकात ते रमले देखील होते..
पण सचिन पिळगावकरांच्या हाकेसारशी चित्रपटसृष्टीचा भाग बनून ते तिकडे वळाले..आणि मागचे सारे मागे पडून या सोनेरी दुनियेत विसावले. बहरलेही..



एक माणूस म्हणून ते अनेकांच्या मनात स्थापित झाले होते.. कलाकार म्हणून अनेक चित्रपटांचे पुरस्कार मिळाले देखील..पण गेली काही वर्षे त्यापासून दूर राहून ते सारे आपल्या घरातून तपस्वीपणे अनुभवत होते..
आज विराजस हा नातू माझा होशील ना ..यातून आपल्या आजोबांचा वारसा पुढे नेत आहे.. सून मृणाल कुलकर्णी हिने आपले स्थान अभिनेत्री, दिग्दर्शन यातून सिध्द केलेच आहे..

रुचिर आणि रूपक हे दोघे आपल्या क्षेत्रात नावारूपाला आले आहेत.. मात्र जयराम कुलकर्णी या साऱ्यातुन अनंताच्या प्रवासास निघून गेले आहेत..त्यांच्या मागे डॉक्टर पत्नी हेमाताई जयराम कुलकर्णी..ताकदीने उभ्या होत्या आणि आहेत..
जयराम कुलकर्णी आपले नाव कायम ठेवून निघून गेलेत..त्यांच्या स्मृतीला हीच आदरांजली..



- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
 17 March 2020

राहूल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांनी रंगविलेली मैफल

 



स्वरगंध

-

21 July 2019

आपल्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची स्मृती जपून त्यांना
सांगेतीक स्वरसुमन गेली पंचवीस वर्ष अपर्ण करणाऱ्या आपटे परिवाराचे ब्रीद
पुढे चालू ठेवण्याचा वसा रसिक आणि या परिवारात सामील झालेल्या लोकांनी
घेतला.. हीच परंपरेची पालखी आता पुढे जाणार आहे.
ललकारचे कै. नानासाहेब आपटे आणि कै. कमलाताई आपटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी सकाळी भरत नाट्यमंदिरात राहुल देशपांडे यांनी राग बसंत मुखारी आपल्या तरल स्वरसोजातून बहरात नेला आणि यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सत्राचा आरंभ केला.
स्वरांची आवर्तने घेत अलबेला सजन आयो.. ही बंदिश राहुलने रंगविली.. आणि रसिक तृप्त झाला..




मग प्रियांका बर्वे -कुलकर्णी हिने स्वरमंचाचा ताबा घेतला आणि माऊली
टाकळकर होते (वय अवघे ९२ वर्षे) टाळाच्या साथीला बोलावून बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल हा
अभंग सादर केला.
उत्तरोत्तर मैफल रंगत जाणार ह्याची जाणीव उपस्थित मान्यवरांना झाली.
राहुल गोळे, निखिल फाटक, अनय गाडगीळ या साथीदारांनी मैफलीचे स्वर ताल पक्के केले आणि गाण्याचा मनमुराद आनंद रसिकांना भरभरून दिला.

रवींद्र आपटे, सौ.आशा भामे आणि चंद्रशेखर आपटे या तीन कुटुंबीयांनी अशी
मैफल दरवर्षी रंगवीत ठेवतात.. यंदाही आपल्या स्वबळावर ती आयोजित केली..

संकल्पना आणि सादरीकरण यात ते आता तयार झाले आहेत.. त्यांचा असा खास रसिक
वर्गही आवर्जून येत असतो.. पण ह्या ललकारच्या स्मृती पुढील पिढीपर्यन्त
नेण्यासाठी परिवाराने पुढे येण्याची कल्पना एका आपटे परिवाराच्या जवळच्या
रसिकाने बोलून आपटे परिवाराला धन्यवादही जाहीर केले.

राहुल देशपांडे यांनी कट्यार मधील घेई छंद रसिकांच्या आग्रहाखातर गायले.

प्रियांका बर्वे यांनी नाही मी बोलत.. नाट्यपद ऐकवून आपल्या आजीची कुणीही -पाय नका वाजवू आणि लपविलास तू हिरवा चाफा.. ही भावगीतेही तिने सादर केली..





राहुल देशपांडे यांनी बगळ्यांची माळ फुले..चा टवटवीत आणि रसरशीत गीताचा गजर केला..
आणि शेवटी कानडा राजा पंढरीचा.. अभंग रसिकांच्या ह्रदयात साठवून या मैफलीची सांगता एका टप्प्यावर केली..






रविवार सकाळच्या ह्या ललकार प्रणीत स्वरगंध आठवतच पुन्हा पुढच्या जुलै
मध्ये पुन्हा नव्या गायकाला रंगमंचावर पहायचे ठरवून लोक पांगले..





राहुल देशपांडे यांनी सादर केलेली ही बंदिश त्यांच्या गायकीची साक्ष देते.



- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

21 July 2019

Thursday, September 24, 2020

पुरूक्रमा..कलाजीवनाची संगीतमय वारी .

 


पुरुषोत्तम बेर्डे

30 June 2019

मुंबईच्या कामाठीपुराच्या शालेय जीवनापासून ती सुरु होते आणि एकेकाळचा कामाठीपुरातला वर्गमित्र शामाच्या आठवणीपर्यत टिपत रहाणारा हा एका कलावंताच्या आयुष्यातील कालखंड ऐकणे म्हणजे पुरूक्रमा.
पुरुषोत्तम बेर्डे यांच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता,संगीतकार, नाटककार ,प्रकाशयोजनाकार ,वेशभूषाकार आणि चित्रकार आशा विविध भूमिकात केलेली सर्जनशील कामगीरी यातून बेर्डे फिरवून आणतात.. तुम्हाला तुमच्या आत डोकवायला भाग पाडतात. कलाकृती सादर करताना होणारी प्रसववेदना आणि त्याच्या परिपूर्णतेतून होणारा मूक आनंद व्यक्त करण्याची पुरूषोत्तम बर्डे यांची ओळख या एकपात्री प्रयोगातून अधिक रसिकांच्या मनात भारून राहते.
आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडाची एकपात्री सफर ऐकताना सहाजिकच आपण अनेक टप्प्यावर मधुमधुन स्थारावतो.. त्यांचा संगीतमय आविष्कार एकतो.. त्यावेळचे कांही किस्से सनात साठवून घेतो..
कधी निलेश पाटील यांच्या निसर्गातील कव्याचा आस्वाद घेतो. तर जाऊबाई जारात नाटकाच्या निमित्ताने सोळा अभिनेत्रींच्या कसरतीतीून तावून निघालेल्या आठवणीत रमतो. आणि निर्माता दिलिप जाधव यांनी जाऊ बाईच्या एकहजाराव्या प्रयोगाच्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे यांना भेट दिलेल्या फोर्ड आयकॉनच्या अनोख्या भेटीला दाद देतो.



तर दूरदर्शनवर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करताना बातम्यांच्या मागे चुकून फ्लोअरचे दार उघडे राहािल्याने बेर्डे यांच्या शिट्टीने बातमीपत्रात होणारा गोंधळ लक्षात ठेवतो.






चित्रकाराच्या दुनियेची ओळख करून देणा-या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतल्यानंतर लिहलेल्या आणि त्याची निर्मिती केलेल्या टूरटूर या एकांकिकेपासून बेर्डेंची कला कारकार्द सुरु झाली. आणि रंगभूमिवर व्यावसायिक जबरदस्त यश दिलेल्या याच नाटकाने पुरुषोत्तम बेर्डे यांना नाव दिले. सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, प्रशांत दामले, विजय पाटकर ही नावे रंगभूमिवर स्थीरावली . याचे सारे श्रेय बेर्डे यांचेकडे जाते.

हमाल दे धमाल मधून त्यांनी चित्रपट रसिकांचे लक्ष वेधले. त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्य़ातून त्यांना अनिल कपूर यांची कशी मैत्री झाली. रजनिकांत, दिलिपकुमार यांनीही कसे स्वागत केले . आदरणीय दादामुनी अशोक कुमार यांनी दिग्दर्शक म्हणून कसे स्विकारले.. सारेच क्षण ऐकणे म्हणजे पुरुक्रमा करणे होय.
बालपणाचा काळ कामाठीपूरात कसा गेला..ते ये जीवन है..सांगणारे गाणे दाखवत त्यातून होणारे संस्कार कसे आपल्यातील गुणांना वाव देणारे ठरले ते पहाणे मजशीर आहे. गणीताच्या लोखंडे सरांचा मार टाळण्यासाठी खिडकीतून घेतलेले गाढवाचे दर्शन. हा अवघड विषय टाळण्यासाठी घेतलेला संस्कृत विषय..विविध कलांची लहानपणी झालेली ओळख.. सारेच या पुरुक्रमात ऐकता येते.
आपल्या आयुष्य़ात चुलचभाऊ लक्ष्मीकांत बेर्डे याचा सल्लागार आयुष्यात झालेला उपयोग ते व्यक्त करतात.
मोजक्या लोकांच्या संगतीत आपल्या कारकीर्दीचा हा आलेख अधिक व्यापक होतो. कलेच्या सर्व प्रांतात भ्रमंती करताना पुरूषोत्तम बर्डे यांना कसे अनुभव आले. निर्मिती सावंत पासून मकरंद अनासपुरे यांच्या पर्य़त अनेक नवोदितांना संधी देताना त्याना आलेला अनुभव. आता ते चित्रकाराच्या भुमिकेतून कसे नेमके टिपण करतात तेही कावळयांच्या तिक्ष्म नजरेतून ते आपल्या चित्रातून समाजविदारक गाष्टी मांडतात तेव्हा त्यांची सर्जनशील कलावंताची पारखी नजर स्तिमित करते.
मंगलगाणी दंगलगाणी, झपाटा अशा वाद्यवृंदांनाही आपल्या कलेच्या नजरेचा बहाल करून त्यांनी रंगभूमिवर दिसताना कलेने कलाकाराने कसे देखणे दिसावे याचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
पारखी नजर. साहित्याची आवड. अभिनयाची जाणीव. संगीताची जाण. दिग्दर्शनाची ताकद. आणि चित्रातून उभी रहाणारी कलाकृती प्रत्यक्ष कशी असावी याचे भान असणारे पुरुषोत्तम बेर्डे यांना पुरुक्रमातून अनुभवणे एक आनंदाचा ठेवा आहे.
हा आनंदाचा ठेवा अनुभवण्यासाठी गेलो असता.. पुरूषोत्तम बैर्डे यांचेसमवेत ..अरूण घाडीगावकर,सुभाष इनामदार



पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरुक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग पाहताना या आमच्या जुन्या मित्रत्वाची आठवण जागी झाली. पुरुषोत्तम बर्डे यांच्या या आगळ्या आत्मकथेची रसिकांनी सवार्थाने दखल घेऊन त्या कालखंडाची साेनेरी पाने आपल्याही मनात साठवून ठेवावी हेच सांगणे.



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

30 June 2019

तुमचा विसर न झाला..डॉ. विजय देव

 

डॉ. विजय देव



पुण्याच्या श्रद्धांजली सभेत बहुआयामी व्यक्तित्व उलगडले..

24 April 2019

सुख दुःखाच्या प्रसंगी सामोरे जाताना डॉ. विजय देव सरांकडे सकारात्मकतेने पहाण्याचा जो उमदेपणा होता तो फार कमी लोकांच्याकडे असतो. आपल्या अस्तित्वाचा आनंद आपल्या भोवतालच्या लोकांना व्हावा असे त्यांचे जगणे होते. ते गेल्याने आपल्या साऱ्या लोकांचा जगण्याचा एक श्वास कमी झाला. त्यांच्या जाण्याने कुटुंबात, समाजात रिकामी जागा निर्माण झाली आहे ती पुन्हा भरून येणे शक्य नाही. आपण सारे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असा विश्वास या परिवाराला देऊ..अशी भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढरे यांनी व्यक्त केली.
राज्यशास्त्राचे अभ्यासक, दुर्ग साहित्य संमेलनाचे जनक, उत्तम कथावचक, आणि समाजाला नवे आणि वेगळे काही देण्याची उर्मी असणारे लोकप्रिय प्राध्यापक डॉ. विजय देव यांच्या निधनानंतर रविवारी २१ एप्रिलला पुण्याच्या स. प. महाविद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. अरुणा ढेरे बोलत होत्या.

ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत व्यासपीठावर अरुण फिरोदिया, शि. प्र. मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि अरुणा ढेरे होत्या.डॉ. देगलूरकर म्हणाले, देव सर ज्ञानी होते, विश्वासू होते, सात्विक होते, संवेदनशील होते. ते कुठेही आधार असल्याशिवाय आपले मत मांडीत नसत.

यानिमित्त देव सरांच्या आठवणींचा पट इथे उलगडला गेला.. यातून विजय देव काय होते आणि ते कसे समाजाच्या साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि कुटुंब यातून ते कसे होते ते समोर आले.. आणि आपण नेमके काय गमावले याचे भान आले.

उत्तम प्रध्यापक, उत्तम लेखक वक्ते , गडांविषयी उत्तम जण याबरोबरच उत्तम समाजचिंतक म्हणून देव सर आपणाला अधिक भावल्याची भावना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केली.
संस्थात्मक काम करताना अपमान सोसावे लागतात पण त्यांना बळ देणारे देव सर नाहीत याची उणीव सतत भासणार असल्याचे ते म्हणाले. तरुणांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्थायीभाव होता.
दुर्ग साहित्य संमेलन हा साहित्यामध्ये सुरू झालेला नवा प्रवाह देव यांनी सुरू केला. सरांनी मोजके लिहिलंय पण पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल असे लिहिल्याचे मिलिंद जोशी आवर्जून सांगतात.

बाबा अतिषय मनापासून त्यांचे जीवन जगले आणि असं जीवन जागायचे असते हे आम्हा दोघींना त्यांनी शिकविले.. देव यांची कन्या ,अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल देव- कुलकर्णी आपल्या वडीलांविषयी बोलत होत्या.
कायम त्यांनी आम्हाला सांगितले की, अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे जाऊन काही काम करा. केवळ स्वतःचा नाही पण इतरांचाही विचार करा. त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीत सामील करून घ्या, हीच त्यांनी दिलेली सगळ्यात मोठी शिकवण आहे, असे त्या म्हणाल्या. आनेक गोष्टीत रस घेणे आणि त्यात रमणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी चिकाटीने, धाडसाने कॅन्सरला तोंड दिले. अतिशय हळव्या भावनेने मृणाल व्यक्त होत होती.

बावन्न वर्षांचा हा सुखी संसार आज संपला या शब्दात आपल्या भावना सांगत विजय देव यांच्या पत्नी डॉ. वीणा देव आपले मन मोकळ्या करत होत्या.
राज्यशास्त्र, मराठी, नाटक, संगीत यांच्या सोबतीनेच आमचा संसार सुरू झाला. कलाप्रेम दोघांकडून जपले गेले. ते स्वतः कलाकार. नव नवे उपक्रम करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यासाठी सतत मोठी ऊर्जा त्यांच्यापाशी होती. उपजत कलाकाराची वृत्ती, लोकनृत्य, कथाकथन आणि संगीत या सगळ्यांना पोषक वातावरण आम्ही एकमताने, आनंदाचे जिवंत ठवल्याचे त्या सांगत होत्या. वडील कसे असावेत याचा आदर्श माझ्यापाशी आप्पांच्या रूपाने होता. दुसरा आदर्श त्यांनी निर्माण केला .जितक्या आवडीने ते राज्यशास्त्र शिकवायचे तितक्याच आवडीने ते कादंबरीवाचन करायचे. आम्हा सगळ्यांचे मायेचे छत्र गेले पण तुमच्या मनात बाबांच्या विषयीचे प्रेम जिव्हाळा आहे, अतिशय भावुक होउन वीणा देव प्रकट होत होत्या.

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने मोहन शेट्ये यांनी ,दुर्ग साहित्य संमेलनाची भन्नाट कल्पना त्यांनी तेवढ्याच ताकदीने यशस्वी केली. बहुआयामी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत.. सदैव प्रसन्न रहाणे . जो वसा वारसा आहे तो पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले.

सप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संज्योत आपटे यांनी.. देव सरांच्या सोबत दोन पुस्तकांच्यासाठी काम करण्याचे भाग्य लाभले. त्यामुळेच त्यांचे राज्यशास्त्राचा व्यासंग, चिंतन आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व याचे आपणाला जवळून दर्शन झाल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

अभिरुप न्यायालय, अभिरुप संसद, गडावर जाणे आणि तिथला सगळा इतिहास सरांकडून ऐकणे ही मेजवानी असायची, असेही त्या म्हणाल्या. सर विद्यार्थ्यांत रमायचे. विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिदू होता. प्रत्येक विद्यार्थ्यांना काहीतरी गुण असतात ते समजून त्याला प्रोत्साहन देत.

सपच्या मानसशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. अलका देव यांनी देव यांच्यावर एक कविता करून आपल्या भावना वाचून दाखविल्या.
देवघराची यशोगाथा उजळू दे आंबरी..
मनी ठेवुनी एक आस ही विजयश्री गेले देवाघरी..
विद्यार्थी या नात्याने बबन मिंडे यांनी आपल्याला बाबांनी कसे मार्गदर्शन केले हे सांगून त्यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन आता मिळणार नाही याची हळहळ व्यक्त केली.

योगवर्गातले स्नेही अरुणभाई शहा श्रद्धांजली वाहताना म्हणाले, त्यांचा सोशिक स्वभाव, कोणावर टीका नाही असा होता .
जयप्रकाश सुराणा सांगतात, बारा तेरा वर्षे आम्हाला दर रविवारी सिंहगडावर जाताना चार तास साधूसारखा
त्यांचा सत्संग लाभला. दोन तीन वेळा मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ती पूर्णही केली. हे वेगळेपण माहीत करून दिले.
ज्ञान मार्गाचे ते साधक होते, त्यातूनच त्यांचा सारा विकास होत गेला असावा असे लेखक भरत सासणे सांगतात. रसिक आणि आनंदी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते म्हणायचे प्रेम हा पाचवा पुरुषार्थ आहे आणि तो प्रत्यकाने मिळवायला हवा . त्यांनी तो साधला होता आणि ते आपल्या वागण्याबोलण्यातून प्रेम पसरवीत होते.

उमदे व्यक्तिमत्व, प्रसन्न हास्य, प्रभावी अध्यापक, समाजमनस्क मन आणि खेळकर लोकव्यवहार या पाचिचे मिश्रण म्हणजे विजय देव असे न. म. जोशी यांनी देव यांचे वर्णन केले.
उद्योजक आणि स्नेही अरुण फिरोदिया म्हणाले,
अशा काही व्यक्ती असतात त्यांना जाणीव असते आपले पृथ्वीवरचे कार्य संपले आहे. आता आपण दुसरीकडे अनंतात विलीन व्हायचे. असे भाग्यवान असतात त्यातले देव होते.
पंचायतीला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या पूर्ण अधिकार बहाल करण्याचा कायदा लोकसभेत मंजूर होणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत फिरोदिया यांनी मांडले.

दुर्ग म्हणजे केवळ इतिहास नाही तर ती एक परिसंस्था आहे. त्यात इतिहासाबरोबर,पर्यावरण, निसर्ग आहे, तो समाज आहे. तिथे रहाणारे वस्ती वाड्यातले लोक आहेत. त्यांची वेशभूषा, खाद्यसंस्कृती, इथली गुरे, पिके, शेती, खाली हवा, पाणी हा सर्व त्या दुर्गाचा एक भाग आहे.. अशी संकल्पना देव यांनी मांडली. या संकल्पनेला व्यासपीठ देण्याचे काम गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाने केले. त्यांची ही संकल्पना तो विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत या मंडळाचे अभिजीत बेल्हे यांनी व्यक्त केले.

दुर्ग साहित्य संमेलन ही एक छान संकल्पना ते महाराष्ट्राला भेट देऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यात माणसे उभी करण्याची ताकद होती. गड या विषयातले ते विद्यापीठ होते ,असे बेल्हे म्हणाले. त्यांचा वारसा आम्ही पुढे नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाविद्यालयात देव सरांनी सुरू केलेले , संकल्पना राबविलेलले उपक्रम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे वचन सपचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी दिले.

दिलेल्या अभ्यासक्रमा शिवाय विद्यार्थ्याना मनापासून देणारा हा प्राध्यापक होता. शिक्षण प्रसारक मंडळींचे ते वैभव असल्याचा अभिमान शिप्र मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्या महाविद्यालयात डॉ. विजय देव यांनी प्राध्यापकी केली आणि प्राचार्य पद भूषविले या ठिकाणी शेकडो सुहृदांच्या साक्षीने झालेल्या श्रद्धांजली सभेचे संचालन स्नेहल दामले यांनी केले .



-सुभाष इनामदार .
subhashinamdar@gmail.com

24 April 2019

Wednesday, September 23, 2020

सैनिकांसाठी जेव्हा..व्हायोलिन गाते तेव्हा...!'



फेब्रुवारी १७ , २०१९...रविवारची संध्याकाळ, 
स्थळः निवारा सभागृह पुणे. 

सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी कंबर कसलेल्या #SIRF संस्थेला मदत करण्यासाठी चारुशीला गोसावी आणि आम्ही सहकारी यांनी व्हायोलिन गाते तेव्हा...!'' हा कार्यक्रम सादर केला.
#SIRF संस्थेचे संस्थापक प्रमुख योगेश चिथडे, सुमेधा चिथडे यांनी त्यांच्या संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. 
संस्थेच्या माध्यमातून अनन्यसाधारण कार्य करणारे हे पती-पत्नी जवानांसाठी काय करता येईल या निस्वार्थी विचारातून गेले अनेक वर्षं काम करत आहेत. योगेश चिथडे हे स्वतः भारतीय हवाई दलातले निवृत्त अधिकारी असून, त्यांचा मुलगा भारतीय सैन्यात 'मेजर' या पदावर कार्यरत आहे. आपल्या झेंड्यामधला पाचवा अदृश्य रंग हा आपल्या सैनिकांच्या रक्ताचा रंग आहे हे विसरून चालणार नाही, हे त्यांचं वाक्य नक्की विचार करायला लावणारे आहे.

कार्यक्रमाची सुरवात 'सूर निरागस हो' या गणेश वंदनेनी झाली

कोहिनूर या यित्रपटातले..मधुबन मे राधिका .हे गीत पुण्याच्या व्हायोलीनवादिका चारुशीला गोसावी यानी असे सादर केले..


आणि त्यानंतर भजन, भावगीत, भक्तीगीत, विरहगीत, प्रेमगीत, युगुलगीत, ठुमरी, लावणी, कव्वाली, देशभक्तीपर गीत अशा अनेक ढंगाची, अनेक बाजाची गाणी एकामागून एक सराईतपणारे व्हायोलिनवर सादर केली गेली. 

टाळ्या, शिट्ट्या, वन्स मोअर चा जल्लोष झाल्यावर शेवटच्या 'ए मेरे वतन के लोगो...' गाण्याच्या सुरवटींनी कवी प्रदीप यांचे शब्द डोळ्यासमोर उभे केले आणि अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. 'भारत माता की जय' च्या नाऱ्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. नीरजा आपटे यांनी निवेदन केले.

-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com


१७ फेब्रुवारी, २०१९

समाधानाचा पेला पुरता भरलाय..!




सामान्य कुटुंबातील या मुलाला कितीतरी हातांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदतीचा टेकू दिला..
नादारीतून शिक्षण .. इतरांचे घरात आपलेपणाचा ओलावा लाभला..

आईची कडक शिस्त आणि तेवढीच प्रेमाची छाया.. वडिलांचे सौम्य पण बोलके पाठबळ..





साताऱ्यात बरीच कमी जास्त धडपड करून आपल्यापुरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला..
तरुणपणात धाडस केले..तडक पुणे गाठले..तरुण भारत आयुष्यात पहिले पाऊल कसून टाकण्यास उपयोगी पडला..
जिद्द आणि साधना.. दोन्ही होती..
भरत नाट्य मंदिरात नाटकाची नांदी सुरू झाली..भूमिका मिळत गेल्या..





नाटकाची भाषा पचनी पडली..रंगभूमीचे आकर्षण वाढले..रात्री बाबूराव विजापुरे.. 










आणि तिकडे पुलाच्या पलिकडे पीडीएचे भालबा केळकर..यांच्या सोबत रात्री रुंगू लागल्या...

 भालबा केळकर
नाटकावर आपल्या भाषेत समीक्षण सुरू झाले..
कला आणि साहित्याची आवड जोपासली गेली..वि ना देवधर यांच्यामुळे पुण्याचा फेरफटका 
आणि अशा उद्याची..दोन सदरे तरुण भारत मधून लिहली.
साहित्यविशारद झालो..
प्रा.एन डी आपटे सरांमुळे पदवीधर .








आयुष्याला स्थिरता आली..विद्याधर गोखले यांचा आशीर्वाद मिळाला..पुणेरी रंगमंच, पुणे तिथे काय उणे..  लोकसत्ता, चतुरंग, सांज लोकसत्ता इथे सदरे, लेखन सुरू झाले..जेष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांच्या प्रोत्साहनामुळे बातमीदारी आणि लेखन सुधारले..






मात्र कारकुनी वृत्ती सोडून संपादन क्षेत्रात फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्या दूरदर्शीपणाने  pune flash. com साप्ताहिक  आणि फ्लॅश  म्युझिक.. मध्ये कारकीर्द बनविली..

एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रातली मुशाफिरी केली..कलावंत जवळ आले..अंतरंग समजू आले..



वयाच्या ४५ व्या वर्षी सकाळ सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राची इ आवृत्ती सुरू करण्याची संधी आली.. त्याचा वृत्त संपादक झालो..बातमी, सदर लेखन आणि चलत चित्रणाचा अनुभव गाठीशी पडला..अखेरीस त्यांना नकोसा झालो.. राजीनामा देवून बाहेर पडलो..

मंदार जोगळेकर, अरुण खोरे, सुनील मेहता..यांच्याकडे काही लुडबुड केली. 






www.subhashinamdar.blogspot.com यातून लेखन सुरू ठेवले..  
काही सांस्कृतिक  कार्यक्रमाना यातून प्रसिध्दी दिली गेली..

यातून सातत्याने घटनांची नोंद सुरू ठेवली..





सोशल मीडिया मधून सतत नोंद करीत गेलो..





आयुष्य सोपे झाले..संसार स्थिरावला.. मुले ,सून आपापल्या कामात व्यग्र आहेत.. सौभाग्यवतीची साथ खंबीर आहे..तिची चाकरी आजही सुरू आहे..नात मनाला उभारी देत आहे..





संगीत, साहित्य आणि नाटकाने भरभरून समाधान दिले..माणसे पहायला ओळखायला शिकविले..













जमेल तशी मदत करावी..मित्र जोडावेत.त्यांचा सहवास घ्यावा.. फिरण्याचा छंद जपून ठेवलाय.. मनात बेचैनीचा विचार आला तर मागचे सारे आठवून त्यातून हुरूप आणतो..






आपल्या क्षमतेपेक्षाही खूप काही मिळाले.. आता हेच समाधान टिकवायला हवं!
रक्ताची आणि जोडलेली नाती टिकवून ठेवायला हवीत..









समाजाने भरभरून दिले..ते समाजाला परत करायला हवे..तेवढी शक्ती आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे एवढीच प्रार्थना!
तुमचा आशीर्वाद आणि सहवास लाभावा हीच मनोकामना!



आपलाच,







सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com