subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, January 25, 2012

स्वकुलतारक सुता...



जयमाला शिलेदार.. हे नाव नुसतं उच्चारलं तरी लगेच डोळ्यासमोर त्यांचा सदा प्रसन्न हसरा चेहरा उभा राहातो. अशी काही मोजकी व्यक्तिमत्व असतात की ज्यांच्या उपस्थितीनचं सगळं वातावरणा प्रसन्न होऊन जातं.... जयमालाबाई त्यातल्याच....

नुकताच त्यांना संगीत नाटक अकादमीचा रविंद्रनाथ टोगोर पुरस्कार जाहिर झाला. त्यांच्या गायनावर प्रेम करणा-या सर्वांनाच खूप आनंद झाला. आत्तापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रपातळीवरच्या या पुरस्कारानं आणखी एक मानंचं पान खोवलं गेलं. त्यांची आजपर्यंतची वाटचाल पाहिली की, त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वापुढं नतमस्तक व्हावसं वाटतं...



वडिलांच्या इच्छा पूर्ण करणरी लाडकी लेक. समानधर्मी कलावंताची पत्नी. गुणी कन्यांची माता. मोठा गोतावळा असलेल्या घरातली कर्तव्यदक्ष गृहिणी. संगीत रंगभूमीवर सतत २५ वर्षे नायिका रंगविणारी गानसम्राज्ञी.....अगणित शिष्यांना नाट्यसंगीताचं शिक्षण देणा-या आदर्श गुरु....किती म्हणून सांगू.......श्री एकवीरादेवीची, श्री स्वामी समर्थ यांच्या निस्सीम भक्त अशी जयमालाबईंची विविध रुपं आहेत...

महत्वाची गोष्ट म्हणजे या विविध रुपांची सरमिसळ कधीही झाली नाही. प्रत्येक रुपात त्या समर्थपणे, सहजपणे वावारल्या. रंगमंचावर रुक्मिणी, भामिनी, सिंधू साकारताना किंवा एखादी मैफल रंगवताना घरातली कोणतीही चिंता त्यांना स्पर्श करीत नाही. घरातल्या पाहुण्यांच्या आदरसत्कार करताना, त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनविताना, रंगभूमिवरची ही महाराणी साधीसुधी गृहिणी असते. लाडक्या लेकीचे मऊ पंचांनी केस पुसून देणारी ही आई.... पेटी काढून समोर शिकवायला बसली की काटेकोर गुरू होते.. मग मुलगी म्हणून सवलत नाही.

प्रत्येक काम करायचं ते मनःपूर्वक, नीटनेटकं...कशातच चालढकल नाही....असाच जयमालाबाईंचा स्वभाव !
म्हणूनच घरसंसार आणि नाट्यसंसार समर्थपणे सांभाळला गेला. अर्थातच याचं मोठं श्रेय जयराम शिलेदारांनीही तेवढचं जातं...कारण पत्नीच्या कलागुणांना प्रोत्साहन देणा-या दिलदार पतिचा पाठिंबा जयमालाबाईंवर नेहमीच होता.
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपत असताना शिलेदारांनी `मराठी रंगभूभी` ही संस्था स्थापन केली आणि कितीही संकटं आली तरीही न डगमगता संगीत नाटकांचे प्रयोग केले. आजच्या तरुण पिढीला जयमालाबाईंच्या रंगमंचावरच्या अदभूत कामगिरीची कल्पनाच नाही.

सुडौल बांधा, बोलके डोळे, चापूनचोपून नेसलेली नऊवारी साडी, प्रसन्न चेहरा आणि मधुमधुर अशी गायकी...त्यामुळं जयमालाबाईंना उदंड लोकप्रियता लाभली. अमाप यश मिळूनसुध्दा त्या नेहमीच विनम्रच राहिल्या. आजही गुरूजनांबद्दल तेवढाच आदर त्यांच्या मनात आहे.

त्यांच्या मैफली आणि नाटके रंगतात..याचं मर्म म्हणजे... शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया. तालासुरावर प्रचंड हुकूमत. कोणताही अभिनिवेश नसलेलं निर्मळ गाणं. ह्दयातून उमटलेले सूर .. आणि ते रसिकांच्या ह्दयापर्यंत पोचविण्याचा अनंद सोहळा म्हणजे..जयमालाबाईंचं गाणं...!

नाट्यसंगीताचा ख्याल न करता त्यातल्या अर्थाकडे, भावनेकडे लक्ष देऊन मर्यादित वेळेत ते कसं रंगवावं ही मोलाचा शिकवण त्यांच्या शिष्यवर्गाला मिळते.

आज या पदापर्यंत पोचताना त्यांनी केलेल्या कष्टाचं महत्व तेवढेच आहे. वेगवेगळ्या गुरुंकडून तालीम घेऊन. भरपूर मेहनत करुन स्वतंत्र गायकी निर्माण केली आहे.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा सगळ्या गतस्मृतींना ..झालेल्या अडचणींचा पाढा डळ्यासमोर येतो...मन हेलावते...
.
जयराम शिलेदारांसारखाय गंधर्वभक्त पतीच्या साथीने संगीत रंगभूमीची कीर्ती-लता वाढविणा-या या स्वकुलतारकसुतेला शतशः दंडवत....


वर्षा जोगळेकर, पुणे

email-varsha.joglekar3@gmail.com


जयमाला शिलेदार यांना अभिष्टचिंतन

आज शुभदिनी जमलो आपण सारे सुहृदजन
करावया अपुल्या जयमालाबाईंचे अभिष्टचिंतन.
एके काळी गंधर्वांच्या नंतर कोण ? असा प्रश्न पडला रसिकमनाला.
जणू तो सोडविला जयरामानी घालून वधूमाला जयमालेला.
लता - कीर्तीच्या रूपाने रंगभूमीची पूजा बांधिली या आठ हातानी.
सुगीचे दिवस पुनश्‍च आले रंगभूमी बहरली अभिनय गायनानी.
मृदु मितभाषी बाईनी विद्यादानही केले सढळ हातानी
त्याचेही स्वागत केले तरुण दमदार कलाकारानी.
सर्वांतर्फे देते शुभेच्छा माझे निर्मल मन
शिलेदार कुटुंबियांच्या सेवेचा पुणेकरांना सार्थ अभिमान.


-- निर्मला गोगटे ( पुणे, २६ जानेवारी २०१२ समारंभात)

राज्यामध्ये आपल्या कलेने मराठीपण जपणाऱ्याच नाट्यक्षेत्राला निश्चिषत प्रोत्साहन देऊ असे आश्वा्सन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृत्यर्थ आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण सोहळा व जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. गोपिनाथ सावकार व जयमाला शिलेदार यांना जीवन गौरव पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नाट्‌य संमेलनाध्यक्ष राम जाधव, नाट्‌य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे, डॉ. मोहन आगाशे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.