subhash inamdar

subhash inamdar

Friday, January 13, 2012

उदयन काळे- आठवणीतील साठवण

उदयन काळे या संगीत रंगभूमिवरच्या उमद्या गायक अभिनेत्याचे ३० डिसेंबरला पुण्यात अचानक निधन झाले. त्याला श्रध्दांजली म्हणून रविवारी..१५ जानेवारीला `संगीत सौभद्र ` या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही शब्दांजली....



संगीत रंगभूमीवर पहिली एंट्री `संगीत शाकुंतल` या नाटकात दुष्यंताची घेताना मनात धाकधुक होत होती. तरीही आपल्या आवाजात गायलेल्या पदांनी त्याने रसिकांना मोहवून टाकले. साथीला शकुंतलेच्या भूमिकेत होती..क्षमा वैद्य. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या त्या रंगभूमीवर नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे तालमी घेत. बाबूराव त्या पौराणीक कथानकातला नेमके भाव येण्यासाठी संवाद घटवून घेत. पण पहिल्यांदाच पाऊल टाकलेल्या उदयन काळे यांना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने ती घेतलीही...पुढे तीच मेहनत कामी आली. .अनेक नाटकातून त्यांने विविध संगीत भूमिकांना न्याय दिला.

आज जेव्हा वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने मन गलबलून उठते. आठवणी येतात त्या त्याच्यासोबत `शांकुतल` नाटकात काम करताना घालविल्या दिवसांच्या.

दिसायला गोरा-गोमटा...गोल चेहरा..कोकणातून आल्याने आवाजात ती कोकणस्थी खास शैली.. त्यातही नाजुकता... पाठांतराला थोडे कष्टही पडत... फारसे गंभीर न होता जेवढे जमेल तेवढे मनापासून करण्याचा त्याचा स्वभाव...मात्र एक नक्की...तो गायला लागला की सुरांशी एकरूप झालेला आवाज..अभिनयाकडे कमी पडल्याचे मग कुणालाच जाणवित नसे..अगदी स्पर्धतही ...नाटकाला प्रथम तर उदयनला वैयक्तिक रोप्यपदक जाहिर झाले. एका त्या शाकुंतल नाटकाने उदयन काळे हे नाव पुण्यतल्या आणि संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात ओळखू यायला लागले.

तसा हळवा आणि काहीसा लाजरा त्याचा स्वभाव...बोलायलाही मितभाषी आणि मृदु. काही काळ तो बिबवेवाडीतल्या त्याच्या भावाच्या घरी तो रहात...तेव्हा मी जात असे...चंद्रकांत काळे उदयनचा थोरला भाऊ. बेतास-बात शिक्षण घेतल्यामुळे थोडा आत्मविश्वास कमी पडायचा...तरीही त्यांने जिद्द सोडली नाही...संगीतातल्या लयकारी आणि गाणे नटविण्याची त्याची शैली त्याला पुढे अनेक भुमिका मिळविण्यासाठी उपयोगी पडली. काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकींकडे संगीताचे शिक्षण त्याने घेतले.


`लावणी भुलली अभंगाला` मधल्या वेगळ्या भूमिकेने त्याला एक वेगळा रसिक मिळाला. यातली `निळोबाची` भूमिका त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोगांमध्ये केली . जीवनात स्थेर्य आले...मात्र नट म्हणून करीयर घडविण्याचा मनसुबा काही त्याला पूर्ण करता आला नाही.

अखेरीस `आकाशवाणी`च्या दप्तरी `तंबोरा वादक` म्हणून तो चाकरी करु लागला. आणि संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली..नव्हे ती त्याच्याकडे चालून आली.. . शिलेदार कुटुंबीयांच्या "मराठी रंगभूमीद्वारे' त्यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. . संगीत सौभद्र व स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्सगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्वीनशेठ हे काही वानगीदाखल सांगता येईल.

तसा सन्मान आणि कीर्ती फारशी नव्हे अपुरीच मिळाली..मा. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेला नाट्य परिषदेचा आणि छोटा गंधर्व यांच्या नावाने कोरेगाव (सातारा) इथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार उदयन यांना मिळाला..
ऐन उमदीच्या काळात अचानक त्याचे या जगातून नाहीसे होणे ही सर्वांच्या दृष्टीने धक्कादायक घटना.. त्याच्या जाण्याने संगीत नाटकात रुपाने देखणा आणि पदांना खुलविणारा एक मनमोकळा दिलदार अभिनेता नाहिसा झाला....त्याच्या कुटुंबियांना बळ आणि भविष्यकाळासाठी यथायोग्य शक्ती मिळावी हिच मनोकामना......त्याची स्मृती रसिकांच्या ठायी सदैव रहावी हिच अपेक्षा..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

`या गोल गोल डब्यातला`

वृध्दांसाठी दिशादर्शविणारा



वृध्दांनी केलेल्या कष्टाची जाणीव न ठेवता तरुण मुलगा जेव्हा त्यांना न विचारता . त्यांच्याकडे न लक्ष देता स्वतःला वाटेल तसे जगत रहातात.. त्यात ना स्वतःला आनंद..ना आपल्या आई-वडिलांना समाधान..सारेच आधंतरी... मग त्यांनी मुलाकडे रितसर कोर्टाकडून पोटगी घेऊन स्वतंत्र व्हावे काय?

कितीतरी प्रश्न..वृध्द आणि तरुण पिढीतला संघर्ष दाखविणारा तुमच्या घरचा चष्माच वाटावा असा चित्रपट २० जानेवारी पासून येतोय.


चित्रपटातली भूमिका वेगळ्या बाजाची आहे.. माझ्या संवादातून अशोक सराफ डोकावेल..पण थोडा गंभीरतेकडे झुकणारी भूमिका...जरा वेगळा रोल...म्हणून मी या चित्रपटाकडे पहातोय..असे अशोक सराफ सांगतात.

त्यांची पत्नी झालेल्या स्मिता तळवलकरांना आई-वडिलांचे करियरच अमान्य करणारा..आणि मुलाचीही घुसमट दाखविणारा हा चित्रपट ..आणि ही वेगळी कलाकृती वाटते...तर असा रोल मी यापूर्वी केलाच नव्हता असे त्या सांगतात.


संतोष जुवेकर यांना या दोन दिग्गज कलावंतासमवेत भूमिका करण्याचे भाग्य लाभल्याचा अधिक आनंद होतो आहे.. आत्तापर्यंतच्या चित्रपटांतल्या भूमिकांपेक्षा वेगळा टाईपबाज कॅरेक्टर न करता स्वतःला सिध्द करणारी भूमिका करायला मिळाली असा वेगळा हा चित्रपट आणि आज्या तरुण पिढीचे नेतृत्व करायला मिळाल्याचे समाधान वाटतेय..
एकूणच स्मिता तळवलकर सांगतात त्याप्रमाणे आज आई-वडिलांया मुलांशी संवादच हरविला आहे...हे स्पष्टपणे दाखविणारा आजच्या काळाशी सुसंगत चित्रपट आहे.

गोवोगावी फिरून मुलांना डबड्यातला चित्रपट दाखविणारा बजाबा या चित्रपटातून प्रथम मराठी पडद्यावर नायक होतोय..हे वेगळेपण...

आसित रेडीज यांची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन...सारेच..ते याबाबत फारच समाधानी आहेत. हा प्रश्न घेऊन ते आलेत. अशोक सराफ असल्यामुळे यात मनोरंजन तर नक्की मिलेल..पण वेगळ्या बाजाची ही कथा तुम्हाला स्वतःकडे पहायला लाविल असा विश्वास वाटतो. मुख्य तीन कलाकारांशिवाय स्मिता शेवाळे, आसालता वाबगावकर, विजय चव्हाण, आकांक्षा ठाकूर या कलावंताच्या यात भूमिका आहेत.

रिध्दी एन्टरटेन्मेंटची ही निर्मिती सतीश चंद्र यांनी संगीत दिले आहे. समीर आठल्ये यांचे छांयांकन आहे तर राजेश राव यांचे संकलक आहेत...आता उत्सुकता आहे ती पर्त्यक्ष प्रदर्शित होण्याची..

पुण्यातल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती सांगण्यात आला...त्यावरुन चित्रपट वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडणार हे नक्की वाटते.. पाहू..




सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276