subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, July 13, 2011

नव्या पिढीची गायिका

कस्तुरी पायगुडे-राणे

काळाबरोबर चालणारी. नव्या विचारसरणीची. संस्कृतिची, संस्कारांची आणि सामाजिक बदलाची जाण असणारी. उद्याच्या संगीताच्या क्षितीजावर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी पुण्यातली गायिका म्हणजे सौ. कस्तुरी पायगुडे-राणे.

कस्तुरी सुप्रसिध्द गायिका सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या. त्यांच्या मार्गदर्शनातून पध्दतशीर रियाज करून गळ्यावर शास्त्रीय संगीताचे झालेले संस्कार कस्तुरीच्या गाण्यातून दिसतात. तालमीतून तयार झालेला आवाज. वेगवेगळ्या रागांची सौंदर्यतत्व सांभाळत केलेली मांडणी. गमक, तान, मींड अशा गायनातल्या विविध प्रकारांवर प्रभुत्व मिळविलेला आवाज .ज्या सहजतेने ती सादर करते तेव्हा रसिकांची मिळालेली दाद तिच्या संगीताच्या सादरीकरणातून मिळते.



शास्त्रीय बरोबरच अशास्त्रीय संगीताचे प्रकारही कस्तुरी तेवढ्याच तयारीने गाते. उदा. दादरा, झुला, गझल, भजन इ.
पुण्यात, पुण्याबाहेर आणि परदेशात असे मिळून दोनशेच्यावर कस्तुरीचे कार्यक्रम झाले असून तिच्या गायकीची प्रशंसा सर्वत्र झाली.

जुलै २०११ मध्ये मी प्रेमिका हा मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बमही प्रकाशित झाला आहे.
पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रातून कस्तुरीने A ग्रेडसह एम.ए. (संगीत) ची पदवी संपादन केली आहे. विशेष योग्यतेसह अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे विशारद आणि पुणे विद्यापीठातून बी.ए. (इंग्रजी साहित्य) पदवी प्राप्त केली आहे.
कस्तुरीला उच्चशिक्षणासाठी लीला पूनावाला फौंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती मिळाली होती. ती २००५ पासून स्पिक मॅकेची पुणे चॅप्टरची प्रमुख समन्वयक तर २००९ ते २०११ पर्यत या चळवळीची नॅशनल एक्झीक्यूटीव्ह म्हणून काम केले आहे. या काळात तिने मान्यवर कलाकारांचे ५०० हून अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
पत्ता-
१२/ अ, श्री विष्णुबाग हौसिंग सासायटी,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे,
शिवाजीनगर, पुणे- ४११०१६
फोन- + ९१ (२२०) २५६६११००
+ ९१ (०) ९८८११३६९४६
ई-मेल- paigude.kasturi@gmail.com

पुरस्कार आणि पारितोषिके-
- आकाशवाणी, पुणे. सुगम संगीत कलाकार म्हणून मान्यता.
- सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार फिरोदिया ट्रस्ट- २००१-२००२
- सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन २००६-२००७ (आम्ही मूमविय करंडक)
- पीस ऐम्बेस्डर २००८- लिला पूनावाला फौंडेशन व आशा फौंडेशन
भारतात सादर झालेले कार्यक्रम-
-य़शवंतराव चव्हाण कल्चरल सेंटर, मुंबई
रत्नागिरी
-अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंदौर
-अंबड संगीत महोत्सव, अंबड
-गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव, अक्कलकोट
-सांगवी संगीत महोत्सव, पुणे
-विद्या प्रतिष्ठान , बारामती
-पीपल फौंडेशन, पुणे
-नंदनंदन प्रतिष्ठान, पुणे
- स्वरवेद, नागपूर

परदेशातील कार्यक्रम-
-नेहरू सेंटर, लंडन
-महाराष्ट्र मंडळ, लंडन
-तारा आर्टस्, लंडन
-बैठक, बर्मिंगहम
-ऑक्सफर्ड युनिव्हरसिटी, ऑक्सफर्ड



x

विठ्ठल गीती गावी -राजेंद्र दिक्षित

पुण्यात आषाढी एकादशीचा विठ्ठल नामाचा गजर प्रत्यक्ष विठ्ठलवाडीच्या पांडुरंग-रूक्मिणीच्या दर्शनाने तर झालाच.
पण त्याही पेक्षा पांडुरंगाच्या नावाचा स्वरगजर चहुभागात नादावला गेला. आषाढी म्हटली की लक्षात रहाते ती
कै.भारतरत्न पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेली अभंगवाणी. संतांचे अभंग त्यांच्यामुळे समाजात ऐकले गेले. त्यांच्या ओठी रूळले. आजही त्यांच्याच अभंगवाणीच्या रेकॉर्डनी पुण्यातली विठ्ठल मंदीरे स्वरभास्करमय होऊन गेली होती.



पंडीतजींचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी हाच हरिनामाचा गजर विठ्ठल गीती गावी या नावाने सोमवारी ११ जुलैला आळवला. दिक्षितांकडून अभंगाचा आस्वाद घेताना त्यांच्याच स्वरमेळींचा स्पर्श आणि त्यांच्या शैलीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पंढरी निवासा...माझे माहेर पंढरी आणि तिर्थ विठ्ठल सारख्या अभंगातून ओतप्रोत भक्तिचा मळा फुलविण्यात राजेंद्र दिक्षित भक्तांना नादविण्यात य़शस्वी झाले होते. गाण्यातला भाव आणि शास्त्रीय संगीताच्या नादस्पर्शी बनलेल्या स्वरांनी अभंगांला सुरेलशा नादाचा स्पर्श झालेला आढळला.. या अभंगाच्या प्रवासात कधी जनाबाईंचा ( जनीच्या घरी पांडुरंग आला) तर कधी अवघाची संसार सुखाचा करीन ( संत ज्ञानेश्वर) म्हणत भक्ति पागे यांनी आपल्या आवाजाची तयारी दाखविली. त्यातच अमृताहूनी गोड यातला लडीवाळ स्वर कुरवाळत माणिक वर्मांची आठवण रसिकांच्या मनात जागविली.

रेझोनन्स ऑडिऑ स्टुडीऑच्या वतीने हिमांशू दिक्षित यांनी हा विठ्ठल नामाचा गजर बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात आयोजित करून कोथरूड परिसरातल्या भक्तांना आणि रसिकांना भक्तिचा नजराणा बहाल केला होता. चित्रकार रवी परांजपे, बासरी वादक राजेंद्र तेरेदेसाई, राघवेंद्र भीमसेन जोशी, आशाताई किर्लोस्कर अशा मान्यवरांनी दोन तासांचा हा कार्यक्रम पूर्णपणे अनुभवला, यातूनच हे सिध्द होते.

ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, नामदेव , कान्होपात्रा, एकनाथ अशा संताच्या अभंगाबरोबरच ग.दि.माडगुळकरांच्या इंद्रायणी काठीचा उदोउदो झाला नाही तरच नवल. निरुपणकार रविंद्र खरे यांनी हा सारा प्रवास अध्यात्मापासून ते संसार-परमार्थ या सा-याचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करून संतांच्या रचनात लपलेला भावार्थ रसाळपणे कथन करून रचनांता सार्थकता आणली.


भाव-भत्किचा हा मळा स्वरांनी जरी नटवला राजेंद्र दिक्षित आणि भक्ती पागे या गायकांनी तरी तो स्वर अधिक नादमय, श्रवणीय बनविला तो संजय गोगटे (हार्मोनियम), चारूशीला गोसावी (व्हायोलिन), प्रसाद भावे (तालवाद्य), अमीत अत्रे (टाळ) आणि विनित तिकोनकर( तबला) अविनाश तिकोनकर( पखवाज) या साथिदार कलावंतांनी.

आरंभी जय जय राम कृष्ण हरी चा गजर करून नंतर किर्तन परंपरेला साजेलसा जय जय कार करून विठ्ठल गीती गातीचा नाद रसिकांच्या नास्मरणात अळवून संतरचनांचा हा स्वरमेळा सुस्वर बनविला.

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com