subhash inamdar

subhash inamdar

Friday, July 27, 2012

`शिवरायांचे आठवावे रुप`

महाराष्ट्राच्या मातीचा गंध म्हणजे मावळा गडी. महाराष्ट्राच्या भूमिचा कर्ताकरविता म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. कोणत्याही भूमिकेतून त्यांचे जीवन दर्शन घडविले तरीही ते तेवढेच रोमहर्षक आणि मनात शौर्य निर्माण होते. असाच काहीसा एक आविष्कार नव्याने पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित `शिवरायांचे आठवावे रुप` यातून झाला आहे. हृषिकेश परांजपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग रेखाटून त्याला पोवाडे आणि त्यांची स्फूर्तीगाथा सांगणारे लोकसंगीताचे प्रकार वापरून आपल्या लेखनातून शब्दरुपात मांडले आहेत.


इतिहासात नोंदल्या गेलेल्या प्रमुख घटनांपैकी कांहीचा ओझरता उल्लेख निवेदनात करुन आणि काही प्रसंगांची गाथा पोवाड्याच्या माध्यमातून दाखवून मोजक्या प्रसंगातून हे शिवराय इथे दिसू लागतात.

लोकसंगीतातून पुढे नेणारी ही एक वेगळी कथाकथन शैली असल्याचे मला वाटते..त्याला नाटक म्हणणे योग्य नाही. कधी प्रसंग प्रत्यक्ष सादर होतात..कधी निवेदन ऐकू येते..तर कधी मागच्या स्क्रीनवर विविध चित्रे दिसतात...कधी गोंधळी तर कधी शाहीर डफावर थाप मारून शिवाजीराजांची मर्दुमकी वर्णन करतात..

लेखकाने आधी सांगीतल्याप्रमाणे हा शिवाजीमहारांच्या कारकीर्दीचा इतिहास नाही...तर त्या घटनांच्या आधारे चितारलेले प्रसंग होत...खरयं..


भरतच्या या प्रसंगनाट्य दर्शनातून जे दिसते..ते फारसे परिणामकारक नाही..त्याची मालिका मधुनच लोकसंगीताच्या आणि इतर तांत्रिक कारणांनी खंडीत होते.. एक शिवाजीच्या भूमिकेतले दिपक रेगे आणि काही प्रमाणात मंजूषा जोशी हे कलावंत सोडले तर इतरजण पोशाखात दिसतात..पण त्यांच्या परिणाम दिसत नाही. जीजाऊंच्या भूमिकेत नटल्या आहेत लीना गोगटे ठिक पण त्यांचा आवाज, भाषा बोलण्याची पध्दत सारे काही कोकणस्थी..त्यात ठसका..मराठमोळेपणा नाही...त्यांच्या वावरण्यात आणि कधी कधी बोलण्यातही कृत्रिमता जाणवते.

दिग्दर्शक संजय डोळे यांनी हे सारे प्रसंग नाट्य उभे केले आहे..स्वतः एका प्रसंगात जिवा महाला बनून शिवाजीच्या वेशात पहताना अधिक बरे वाटते.
.
नेपथ्य, संगीत (अशोक काळे), वेशभूषा आणि मेकअप सा-यामुळे शिवराय आठवला सहज जातो..पण तो काही काळानंतर मनात रेंगाळत नाही..पुसटसा..अंधुकसा होत विरुन जातो..




-सुभाष इनामदार,पुणे

आनंद तरंग

गेली अठरा वर्षे `ललकार` या ध्वनीक्षेपक कंपनीचे कै. नानासाहेब आपटे व कै. कमलाबाई आपटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे कुटुंबिय त्यांची स्मृती जपतात ती एखाद्या कलाकारांच्या मैफलीतून . पुण्यातल्या अनेक कार्यक्रमांना उत्तम ध्वनीक्षपकाची व्यवस्था पाहणारी ललकार ही संस्था होती आज तिचे अस्तित्व फक्त जपले जात आहे.....आपटे यांची मुले यांनी तो व्यवसाय पुढे कायम ठेवला नाही..ते अन्य ठिकाणी कार्यरत झाले. पण वडीलांच्या ललकारची तुतारी दरवर्षी ते अशा पध्दतीने ऐकवत असतात.




यावर्षी आनंदगंधर्व नावाने सुपरिचित असलेला बालगंधर्व या चित्रपटाने नाट्यसंगीतात स्वतःचा ठसा उमटविणारा तरुण गायक आनंद भाटे यांची सायंकालीन मैफल आपटे कुटुंबीयानी २१ जुलै ला भरत नाट्य मंदीरात आयोजित करुन हाच संगीताचा आनंद आपल्या नातेवाईकांत आणि रसिकांमध्ये पसरविला...

सुरवातीला आनंद भाटे यांनी पूरिया धनाश्री रागातली `पार करो अरज सूनो` आणि त्यानंतर `पायलिया झंकार` या रसिकप्रिय बंदिशीने रसिकांना आपल्या शास्त्रीय संगीताच्या तयारीने खुश केले.

सौभद्र नाटकातील `कोण तुजसम सांग..`हे पद सादर करुन स्वरराज छोटा गंधर्वांची आठवण करुन दिली. या बहारदार पदानंतर मानापमान मधील `खरा तो प्रेमा,` `सौभद्र` मधील `वद जाऊ कुणाला शरण` ही पदे गाऊन बालगंधर्वांची आठवण करुन दिली.

सुधीर फडके यांच्या जंयतीनिमित्ताने गीतरामायणमधील `दशरथा घे हे पायसदान` हे गीतही भाटे यांनी अतिशय भाऊकतेचे दर्शन देत सादर केले. आपटे कुटुंबीयांशी बाबूजींचे घरोब्याचे संबंध असल्याने आणि बाबुजींच्या जाण्याला दहा वर्ष होत असल्याने या गीताचे महत्व जाणून रसिकांनीही तेवढीच मनसोक्त दाद दिली.

आनंद भाटे यांनी आपले गुरु भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वंदन करण्यासाठी `माझे माहेर पंढरी` ही भक्तिरचना आणि त्यानंतर संत तुलसीदास नाटकातली `राम रंगी रंगले` ही रचना भावपूर्ण रितीने सादर करुन रसिकांना भक्तिरसात न्हाऊन काढले.


संगीत `कान्होपात्रा` नाटकातील `जोहार मायबाप जोहार` या अभंगाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.कार्यक्रमाची सांगता त्यांनी `बालगंधर्व` चित्रपटातल्या कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेल्या `चिन्मया सकल ह्दया` या भैरवीने केली.

संपूर्ण कार्यक्रमात तबला साथ भरत कामत यांनी तर राजीव परांजपे यांनी हार्मोनियम आणि ऑर्गनची साथ केली...माऊली टाकळकर यांनी टाळाचा नाद देत अभंगांला उत्तम दर्जा प्राप्त करुन दिला. संपूर्ण कायर्क्रमाचे निवेदन सौ. शुभदा अभ्यंकर यांनी केले..

एकूणच रसिकांच्या मनात आनंद भाटे यांच्या कार्यक्रमाला जाण्य़ाचा जेवढा ध्यास होता..तेवढा सारा या गायनाच्या एक उत्तम मैफलीतून लाभला...एक सूरांचा लडीवाळ हार गुंफत रसिक तृप्त मनाने घरी परतले..


-रवीन्द्र आपटे, पुणे