subhash inamdar

subhash inamdar

Monday, September 19, 2011

पं. शरद गोखले गेले


-निष्ठावान कलावंत

मराठी रंगभूमीवर फारच कमी नाटकात काम करूनही संगीत रंगभूमीची परंपरा निष्ठेने जपणारा कलावंत म्हणून पं. शरद गोखले यांचे नाव नक्कीच लक्षात रहाते. तशी उंची बेताची. बोलताना फारसा प्रभाव पडत नव्हता. पण गाण्यात तरबेज. शास्त्रीय संगीताची उत्तम तयारी.

अनाथ विद्यार्थी गृहातल्या शाळेत शिक्षणाचे अनमोल कार्य शेवटपर्यंत करून विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा गुरु. म्हणून त्यांनी ते काम तन्मयतेने अखेरपर्यंत केले.

शिलेदारांच्या मराठी रंगभूमीचा स्पर्श त्यांच्यातल्या गायकाला झाला. आणि जयराम शिलेदारांनी शरद गोखले यांना अभिनयासाठी, त्यातल्या गद्यासाठी तयार करुन रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर उभे केले. त्यांचे नाव आज संगीत गायक नट म्हणून आहे त्याचे सारे श्रेय शिलेदार मंडळींना आहे.

शिलेदारांच्या सर्वच पारंपारिक संगीत नाटकात शरद गोखले यांचे नाव कायमचे कोरले गेले. त्यांनीही ते अखेरपर्यंत राखले. आवाजाला बऴ देऊन त्यांच्यातल्या कलावंताला घडविले त्यांनीच. तीन वर्षापूर्वी त्यांना महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार प्राप्त झाला. तेव्हा त्यांनीही हे स्पष्टच म्हटले होते.

त्यांच्यातले वेगळेपण आणि भूमिकेत चपखल बसले ते स्वरसम्राज्ञी या विद्याधर गोखले यांच्या नाटकात. लावणी आणि शास्त्रीय संगीताची ही जुगलबंदी सादर करून कीर्ति शिलेदार आणि शरद गोखले यांनी नाटक तर गाजविलेच...पण त्यातली गाणीही लोकप्रिय केली. पं. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या संगीत मार्गदर्शनातून या नाटकातली पदे रंगली... त्यांच्या शिस्तप्रिय संगीतकाराने गोखले यांच्यातल्या गायकाला पुरते बाहेर काढले. रसिकांची पसंती आणि संगीत नाटकात गोखले यांचे नाव कायमचे कोरले गेले.

सुमारे पस्तीस वर्षापूर्वी भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत भेटता प्रिया या डॉ. वा. शं. देशपांडे लिखित आणि बाबुराब विजापुरे दिग्दर्शीत नाटकातून शरद गोखले यांनी पहिले पाउल टाकले. आणि खरे म्हणजे यातून त्यांच्या जीवनात प्रितीचे पाऊलही पडले. त्यांतली प्रिया त्यांच्या ख-या आयुष्याची जोडीदार झाली.

नटाकडे इच्छाशक्ति असेल आणि कष्ट घेण्याची इच्छा मनोमन असेल तर तो रंगभूमीवर आपवी छाप पाडू शकतो असे त्यांनी आपल्या भूमिकेने दाखवून दिले.

असा संगीतावर निष्ठा असणारा आणि आपल्यात जे नाही ते मिळविण्याचा हट्ट करुन जिद्दीने पाय रोऊन भक्कमपणे उभा राहिलेला हा कलावंत आज गेला. तोही कॅन्सरसारख्या दुर्घर आजाराने. शरीराने त्यांचा देह आपल्यात नाही. आठवणीत राहतील त्यांनी केलेल्या भूमिका आणि स्वरसम्राज्ञीतला कडक शिस्तप्रिय गुरू.
त्यांच्या प्रेमळ स्वभावाची प्रचिती घेतलेले अनेक जण हेच सांगतील.
त्यांना हिच आमची भावपूर्ण शब्दांजली.


सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com

Friday, September 16, 2011

तालावर रसिकांच्या टाळ्या

श्रीखोल या वाद्याबरोबर तबल्यानं ताल धरला, तेव्हा रसिकांना दोन्ही वाद्यांच्या ताकदीचा अंदाज आला. प्रत्येक तालावर रसिकांच्या टाळ्या पडत होत्या आणि या टाळ्यांचे मानकरी होते, शुभांकर बॅनर्जी आणि गोपाळ बर्मन हे दिग्गज कलाकार. सुरांमध्ये प्रेक्षक रंगून जातात, तशीच ताकद वाद्यांच्या तालांमध्येही असते, हे या दोघांनी 'डमरू तालवाद्य महोत्सवा'च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केले.


' महाराष्ट्र टाइम्स' आणि बँक ऑफ महाराष्ट्र प्रस्तुत 'डमरू- द ड्रम फेस्टिव्हल ऑफ इंडिया' हा तीन दिवसीय महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला. प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे 'ग्लॅड पीपल' आणि 'तालचक्र' हे संयोजक आहेत. कवेर्नगर येथील महालक्ष्मी लॉन्सवर हा तीन दिवसीय महोत्सव पुणेकरांसाठी यादगार ठरणार हे नक्की. या महोत्सवातून जगभरातील सुमारे २४ तालवादक एका रंगमंचावर येणार आहेत!


पं. कुमार बोस, पं. सुरेश तळवलकर, पं. अनिंदो चॅटर्जी आणि विद्वान विख्खू विनायक यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं शुक्रवारी उद्घाटन झालं. शुभांकर बॅनर्जी आणि गोपाळ बर्मन यांच्या श्रीखोल-तबला जुगलबंदीनं महोत्सवाची झोकात सुरुवात झाली. तब्बल एक तास रंगलेल्या या मैफलीत रसिक इतके रंगून गेले होते, की त्यांच्याही अंगात तालांची जणू जादूच भिनली होती!

या जुगलबंदीनंतर प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चॅटर्जी आणि त्यांचे शिष्य रूपक भट्टाचार्य यांच्या सत्रानेही महोत्सव रंगतदार केला. स्टार ड्रमर रणजित बारोट यांच्या ड्रमरने तर अक्षरश: तोडलेच!

येत्या रविवारपर्यंतचालणाऱ्या महोत्सवामध्ये तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी, शिवमणी, पखवाजवादक पं. भवानी शंकर, पं. कुमार बोस, घट्टमवर मास्टरी असलेले विख्खू विनायकराम आणि खंजिरा मास्टर व्ही. सेल्वा गणेश या कलाकारांचे सादरीकरण पुणेकरांना अनुभवता येणार आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10011768.cms

Monday, September 12, 2011

भक्तिची नशा...

सोमवार सकाळी १० ची वेळ... अनंतचतुर्थी निमित्त रविवारी सुरू झालेली गणपती विसर्जनाची मिरवणूक अद्याप सुरूच होती. मी टिळक रोडवरच्या स्पीकरच्या भिंतींनी हादरून गेलो. लांब उभे राहून नुसती नजर टाकली तर मिरवणुतील सजावटीच्या मखरात बसलेला श्री मंगलमूर्ती शांतपणे मांडी घालून ठामपण बसलाय.. माझ्या हाती काही नाही .कार्यकर्ते नेतील तसा मी पुढे सरकतो आहे,...असे सांगत.

अनेकांना ऑफिस गाठायची घाई. कुणाला दुकान सुरू करायची..तर कुणाला काही...पण या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याचे काय....

प्रत्येक गणपती मंडळाच्या ट्रॅक्टरमागे विजपुरठा करणारे जनरेटर लावलेले होते. एका गाडीत डीजे गाण्य़ांची निवड करून ठोका असणारी गाणी निवडत होते. लय आणि तालात धुंद होऊन मंडळी नाचत होती. अंगविक्षेप करीत होती. अंगात बळ आल्यासारखे त्यांचे अंग तालावर जणू थिरकत होते..

सा-या वातावरणाचा ताबाच जणू या मंडळाच्या कर्णकर्कश ( योपेक्षा दुसरा शब्द सापजत नाही) आवाजाने घेतला होता. वास्तविक श्री गणेशाचे विसर्जन अनंतचतुर्थीच्या दिवशीच पूर्ण व्हावे असे शास्त्र सांगते.... नंतर सुरु होतो पितृपंधवडा... तो अशुभ मानतात...पण त्याचे कोणाला काय....

आपल्याच मस्तीत नाचणारे इतके मश्गुल असतात की ठेका हेच त्यांचे लक्ष... आणि अंगाला हिसके देउन नाचणे हा त्यांचा धर्म.

गणपती बाप्पा मोरया... या निनादात बुध्दीचे हे आराध्य दैवत .. स्पिकरच्या भिंतीत अडकून गेले आहे. इथे नशा दिसते ती भक्तिची नाही तर आवाजाच्या नशेची.

खरं सांगतो..मी तर टिळक रोडवर चाललेल्या एका ट्र्रक्टरच्या मागे काही कार्यकर्त्यांच्या हातात दारूची बाटली बघीतली. ते सर्वजण अगदी त्यांचा डीजेही आस्वादात मग्न होता... ते काही मंडळी इतर कार्यकर्त्यांना आत बोलावित होता. आता ही खरी नशा चालू होती..


तसे पाहिले तर नाचणा-या तरूणांच्या डोळ्य़ात ती धुंदी कशाची आहे ते दिसत होते. त्यांचे पाय थिरकतच होते... अंग वळतच होते... हे सारे कुणासाठी... का ही संधी साधून हे सारे भक्त आपल्या दैवतासमोर हा आगळा खेळ करण्यातच धन्यता मानतात... (देवा गजानना पाहतो आहेस ना... हे काय चाललयं ते...)
पोलिसांचे एक पथक या मंडळींना पुढे येण्यासाठी सतत सांगत होते.. पण ते तात्पुरते ऐकत...पालिस पुढे गेले की लयीत..संथता आलीच.. एक पोलिस चौकात डीजेला स्पीकरचा आवाज कमी करायला सांगत होता. काही काळ लोटला की डीजे पुन्हा आवाजाची बटने वाढविताना दिसत होते...

हे सारे पाहिलेले तुम्हापर्यत पोचवावे वाटले. तुम्ही ते अनुभवलेलेही असेल..पण मला ते सांगावेसे वाटते... या माध्यमातून...

खरच...आपण सारे यातून काय मिळवितो.. समाधान..शांती..आराधना...

भक्ति की नुसतीच नशा..भक्तिची.....



सुभाष इनामदार, पुणे




( गणपती मिरवणुकीतील हे दृष्य...लक्ष्मी पथावरचे व संग्रहातले आहे.याचा या लेखाशी संबंध नाही)

Saturday, September 3, 2011

यांना शांततेचे महत्व कधी कळणार..


गायक आपले गाणे खुलवित होता. उपस्थित वर्ग त्याच्या त्या शास्त्रीय गाण्यात तल्लीन होऊन माना डोलावित होता. अस्वादकाचे विविध अनुभव घेत मीही मधुनच त्यांच्या चिजेच्या समेवर तालात सम पकडण्याचा प्रयत्न माझ्या देहबोलीतून करीत होतो. एकूणच एक गायक स्वरांची विविध आंदोलने विविध अंगाने नटवित होता. स्वरांचे आविष्कार किती पध्दतीने होऊ शकतात.. दाद देणारा जाणकार तारीफ करून वाहवाची पसंती अगदी खुल्या मनाने देत तल्लीन होऊन स्वरांचा आस्वाद घेत होता.

किती विलोभनिय गोष्ट. इथे शांतता भंग करणारा एक आणि त्याला तालाची आणि स्वरांची संगत करणारा पेटीवादक बस्स..एवढेच..बाकी सारा वर्ग ते सारे निशःब्दपणे साठवून ठेवीत....

भारतीय परंपरेचा हा थाट..भारतीय संस्कृतीतही आहे. मग गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक ठिकाणी....केवळ प्रकाशात शांतपणे विराजमान झालेली गणेशमूर्ती तुम्हालाही आकर्षित करते ना...

गोंगाटाच्या आणि स्पीकरच्या भिंतीतून ह्दय भेदून टाकणारा आवाज तुमच्या कानी ठसत जातो.. तेव्हा कुठेतरी असा मनोहारी आणि नयनमनोहर मंडळाच्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे तुम्ही कौतूक कराल ना...मला खात्री आहे..तुम्हालाही ते आवडते....

पण.... हा पण भारी खट्याळ...कधी मध्ये येईल काही सांगता येत नाही...
आज आपण सारेजण या गोंगाटाच्या अधिन झाले आहोत. नव्हे...तो सहन केल्याशिवाय पर्याय नाही... तोंड बाधून बुक्क्यांचा मारच जणू.

म्हणून अशा शांत..निवांत आणि तरीही प्रसन्न अशा गणपती मंडळांची माहिती करून द्यायला मला आवडेल.
आजच पुण्याच्या टिळक रस्त्य़ावरच्या सदाशिवपेठेचा भाग असलेल्या चिमणबाग गणेशोत्सव मंडळात डोकावले. इथली मूर्ती..शोभिवंत. प्रकाश..मूर्तीला उठाव आणेल एवढा.. मंडपात मूर्ती..एक कार्यकर्ता आणि तिचे सुंदर रूप..
कुठे स्पीकरवर गाणी नाहीत की, कुठलाही संदेश देणारी सजावट नाही. इथे आवाज येतो..आणि स्पीकर तोंड उघडतो तो फक्त आरतीच्यावेळी..

बाकी सारी प्रसन्न तरीही भारून राहिलेली शांतता. वर्गणी मागतानाही कुणी कितीही देवो..ती स्विकारली जाते. हुज्जत घातली जात नाही. सारा खर्च तेवढ्याच वर्गणीतून होतो...
तुम्हालाही असे मंडळ दिसले..तर मला मेल करा.. जमेल तर माहिती कळवा..शांततेतही सुख आणि मन रमते..फुलते आणि क्वचित नादावतेही...



सुभाष इनामदार,पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com