subhash inamdar

subhash inamdar

Friday, May 20, 2011

भेट दोन गंधर्व युगांची

मी नाटकाचा वेडा माणूस...बालगंधर्व मुंबईला आमच्या मामाकडे यायचे. त्यावेळी लांब बसून त्यांना ऐकायचो...मध्येच खुळ्यासारखा एखादा प्रश्न विचारायचो...आमच्यातले अंतर कमी होत गेले. १९३२ मध्ये एका चटईवर बसून गप्पा मारण्याइतके आमचे संबध जमले...माझं आणि बालगंधर्वाचे नात हे भक्त आणि दैवतासारखे होते ...

आयुष्याची शताब्दी गाठलेले बुजूर्ग कलाकार अण्णासाहेब शिरगावकर जुन्या आठवणींना उजाळा देत होते...हेच बालगंधर्व समर्थपणे साकारणारा अभिनेता सुबोध भावे समीप आला आणि अण्णासाहेबांनी त्याला चक्क वाकून नमस्कार केला!


बालगंधर्व चित्रपटातील सुबोध भावे, आनंद भाटे, माधव वझे, अथर्व कवेर्, राहुल सोलापूरकर या कलाकारांचा सत्कार संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते रामदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

बालगंधर्वाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी प्रेक्षकांना गंधर्वयुगात नेले. बालगंधर्व आणि शाहू महाराज यांची झालेल्या भेटीपासून ते त्यांच्या संगीताच्या बैठकांचे वर्णन करत त्यांनी कार्यक्रमात रंग भरला. त्याकाळात महाराष्ट्रात बालगंधर्वांचा फोटो नाही असं एकही घर नव्हतं. बालगंधर्वांची फॅशन त्या काळातल्या बायका करायच्या. शिरगावकरांनी सांगितलेल्या बालगंधर्वांच्या या आठवणीने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. बालगंधर्वांची भूमिका केलेला सुबोध भावे प्रेक्षकातून उठून शिरगावकरांकडे गेला. त्यावेळी आताच्या चित्रपटातील बालगंधर्व हेच, अशी ओळख त्यांना करून दिल्यावर या बुजूर्ग कलाकाराने चित्रपटातल्या बालगंधर्वांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सभागृहातले वातावरण नि:शब्द झाले होते.

राज्यात शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व हे तीन युगपुरुष होऊन गेले, त्यांचे कर्तृत्त्व मराठी माणसाच्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचे पांडुरंग हे जसे दैवत आहे, तसेच संगीत नटांचे बालगंधर्व दैवत आहे. शास्त्रीय संगीतातला अवघडपणा बालगंधर्वांनी नाट्य संगीतात जोपासला. शास्त्रीय संगीत रसिकांपर्यंत पोहोचवले ते बालगंधर्वांनीच, असा गौरव या वेळी कामत यांनी केला.

"पांगिरा' -20 मेपासून

"आयड्रीम प्रॉडक्‍शन'चा "पांगिरा' हा  बहुचर्चित  चित्रपट येत्या 20 मेपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. 

किशोर कदम, प्रशांत पाटील प्रमोद पवार, शशांक शेडे, मीता सावरकर, नंदिनी जोग यांच्यासह संगीतकार विजय नारायण उपस्थित होते.

"जोगवा'सारखा आशयघन चित्रपट बनविणाऱ्या टीमनेच "पांगिरा' हा चित्रपट बनविला आहे. प्रसिद्ध साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्या "पांगिरा' या कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केले आहे. संवाद-गीते, कविता तसेच प्रस्तुतकर्ते संजय पाटील आहेत. पटकथा राजीव आणि संजय पाटील यांनी लिहिलेली आहे. उपेंद्र लिमये, किशोर कदम, प्रमोद पवार, मिता सावरकर, स्मिता तांबे आदी कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत.

बदलत्या गावपांढरीची कहाणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वेदना त्यात मांडण्यात आली आहे. चित्रपटाला विविध महोत्सव आणि स्पर्धांमध्ये चोवीस नामांकने आणि अकरा पारितोषिके मिळालेली आहेत. विश्‍वास पाटील यांनी 1980 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. सोन्यासारखा घाम मातीत गाळून धरतीला हिरवा शालू नेसविणाऱ्या भूमिपुत्रांची ही उद्‌ध्वस्त जत्रा अजून किती पिढ्यांनी कोडग्या नजरेने बघायची, असा प्रश्‍न पाटील यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.