subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, July 31, 2012

सन्मानाचा आनंद

संगीतकार आनंद मोडक यांनी स्वतः फेसबुकवर आपल्या पुरस्काराच्या निमित्ताने माहिती दिली आहे...त्यांच्या शब्दात काहीही बदल न करता ती माझ्या या ब्लॉगमधून देत आहे...संगीतकार आनंद मोडक यासाठी माझ्यावर रागविणार नाहीत याची खात्री आहे..

सुभाष इनामदार, पुणे





मित्रानो ,मला तुमच्याबरोबर माझ्या होणा-या सन्मानाचा आनंद वाटून घेताना खूप chhaan वाटतंय..अखिल भारतीयमराठी नाट्यपरिषद पिंपरीचिंचवड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त
शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २०१२ रोजी संध्याकाळी ५ वाजता रामकृष्ण मोरे नाट्य गृह ,चिंचवड ,पुणेयेथे संपन्न होणाऱ्या सोहळ्यात कै.बालगंधर्व स्मृती पुरस्कार माझ्या मराठी रंगभूमीवरील अमूल्य आणि अभ्यासू कार्याबद्दल मला प्रदान केला जातोय..



घाशीराम कोतवाल या नाटकापासून सुरु झालेल्या आधुनिक संगीत रंगभूमीच्या प्रवासात घाशीराम कोतवाल या नाटकात सहभागी झालेला रंगकर्मी इथपासून माझा प्रवास सुरु झाला तो महानिर्वाण ( लेखक-सतीश आळेकर ) या नाटकाचा संगीतकार म्हणून माझं पदार्पण झालं..

त्यानंतर बदकांचे गुपित ( लेखक - बा सी मर्ढेकर ) ,तीन पैश्याचा तमाशा ( लेखक- पु.ल.देशपांडे ) , मृगया ( लेखक- राजन मोहाडीकर ) , फिल्लम स्टुडिओ मुंबाय ( लेखक- राजन मोहाडीकर ) ,
पडघम ( लेखक- अरुण साधू ) , विठ्ठला ( लेखक- विजय तेंडूलकर )
तुमचे अमुचे गाणे ( लेखक- रत्नाकर मतकरी ) , अफलातून ( लेखक-विक्रम भागवत ) , संगीत म्युन्सिपालीटी ( लेखक- माधवराव जोशी ) अलीबाबाची हीच गुहा ( लेखक- दिलीप वि. चित्रे ) जळळी तुझी प्रीत ( लेखक - अभिराम भडकमकर ) , मदन भूल ( लेखक- प्रदीप ओक )
अशा १३ संगीतमय नाटका करीता मी शेकड्यांनी गाणी आणि पार्श्वसंगीत हि स्वरबद्ध केले.

तर शांतीदूत ( संहिता-वसंत बापट ) ,लीलावती ( संहिता -झेलम परांजपे ) , प्रीत गौरीगिरीशम ( लेखक- कृ. रा. अर्जुनवाडकर ), मेघदूत ( कुसुमाग्रजांच्या मराठी काव्यानुवादावर आधारित संहिता लेखक -
सदानंद डबीर ) या नृत्य नाट्याना संगीत दिलं... चंद्रकांत काळ्यांच्या शब्दवेध या संस्थेकरिता अमृतगाथा (१९८८), प्रीतरंग(१९९२) साजणवेळा(१९९७), शेवंतीच बन (२००२) आणि आख्यान तुकोबाराय ( २००४)
असे मराठी साहित्यातल्या विविध विशुद्ध कवितेच्या वाचिक अभिनयातून गद्द्यआणि गाण्याच्या रूपातील रंगमंचीय अविष्काराकरिता संगीतकार म्हणून योगदान दिले...



या सगळ्या कामाचे स्मरण " अमूल्य आणि अभ्यासू कार्याबद्दल " या उल्लेखामुळे मला झाले. अन्यथा एरवी हे माझ्या स्मरणात हि नसते...किंबहुना मी - स्वत: काही मिळवलेच नाही तर गमावणार काय- अशा विचार सरणीने येणारी प्रत्येक संधी पहिलीच समजून स्वत: ला नव्याने सिद्ध केले पाहिजे या एकमेव जिद्दीने त्या आव्हानाला सामोरा जातो...कधी फसलो हि असेन...पण त्यातून हि शिकण्याची वृत्तीच मला पुढे पुढे नव्या जोमानं काम करायला प्रेरणा देत असावीसे वाटते...शेवटच्या श्वासापर्यंत माझं हे विद्द्यार्थीपण अक्षय राहो अशा शुभेच्छा तुम्ही सर्वांनी मला द्याव्यात ही विनंती...

Friday, July 27, 2012

`शिवरायांचे आठवावे रुप`

महाराष्ट्राच्या मातीचा गंध म्हणजे मावळा गडी. महाराष्ट्राच्या भूमिचा कर्ताकरविता म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. कोणत्याही भूमिकेतून त्यांचे जीवन दर्शन घडविले तरीही ते तेवढेच रोमहर्षक आणि मनात शौर्य निर्माण होते. असाच काहीसा एक आविष्कार नव्याने पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित `शिवरायांचे आठवावे रुप` यातून झाला आहे. हृषिकेश परांजपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग रेखाटून त्याला पोवाडे आणि त्यांची स्फूर्तीगाथा सांगणारे लोकसंगीताचे प्रकार वापरून आपल्या लेखनातून शब्दरुपात मांडले आहेत.


इतिहासात नोंदल्या गेलेल्या प्रमुख घटनांपैकी कांहीचा ओझरता उल्लेख निवेदनात करुन आणि काही प्रसंगांची गाथा पोवाड्याच्या माध्यमातून दाखवून मोजक्या प्रसंगातून हे शिवराय इथे दिसू लागतात.

लोकसंगीतातून पुढे नेणारी ही एक वेगळी कथाकथन शैली असल्याचे मला वाटते..त्याला नाटक म्हणणे योग्य नाही. कधी प्रसंग प्रत्यक्ष सादर होतात..कधी निवेदन ऐकू येते..तर कधी मागच्या स्क्रीनवर विविध चित्रे दिसतात...कधी गोंधळी तर कधी शाहीर डफावर थाप मारून शिवाजीराजांची मर्दुमकी वर्णन करतात..

लेखकाने आधी सांगीतल्याप्रमाणे हा शिवाजीमहारांच्या कारकीर्दीचा इतिहास नाही...तर त्या घटनांच्या आधारे चितारलेले प्रसंग होत...खरयं..


भरतच्या या प्रसंगनाट्य दर्शनातून जे दिसते..ते फारसे परिणामकारक नाही..त्याची मालिका मधुनच लोकसंगीताच्या आणि इतर तांत्रिक कारणांनी खंडीत होते.. एक शिवाजीच्या भूमिकेतले दिपक रेगे आणि काही प्रमाणात मंजूषा जोशी हे कलावंत सोडले तर इतरजण पोशाखात दिसतात..पण त्यांच्या परिणाम दिसत नाही. जीजाऊंच्या भूमिकेत नटल्या आहेत लीना गोगटे ठिक पण त्यांचा आवाज, भाषा बोलण्याची पध्दत सारे काही कोकणस्थी..त्यात ठसका..मराठमोळेपणा नाही...त्यांच्या वावरण्यात आणि कधी कधी बोलण्यातही कृत्रिमता जाणवते.

दिग्दर्शक संजय डोळे यांनी हे सारे प्रसंग नाट्य उभे केले आहे..स्वतः एका प्रसंगात जिवा महाला बनून शिवाजीच्या वेशात पहताना अधिक बरे वाटते.
.
नेपथ्य, संगीत (अशोक काळे), वेशभूषा आणि मेकअप सा-यामुळे शिवराय आठवला सहज जातो..पण तो काही काळानंतर मनात रेंगाळत नाही..पुसटसा..अंधुकसा होत विरुन जातो..




-सुभाष इनामदार,पुणे

आनंद तरंग

गेली अठरा वर्षे `ललकार` या ध्वनीक्षेपक कंपनीचे कै. नानासाहेब आपटे व कै. कमलाबाई आपटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे कुटुंबिय त्यांची स्मृती जपतात ती एखाद्या कलाकारांच्या मैफलीतून . पुण्यातल्या अनेक कार्यक्रमांना उत्तम ध्वनीक्षपकाची व्यवस्था पाहणारी ललकार ही संस्था होती आज तिचे अस्तित्व फक्त जपले जात आहे.....आपटे यांची मुले यांनी तो व्यवसाय पुढे कायम ठेवला नाही..ते अन्य ठिकाणी कार्यरत झाले. पण वडीलांच्या ललकारची तुतारी दरवर्षी ते अशा पध्दतीने ऐकवत असतात.




यावर्षी आनंदगंधर्व नावाने सुपरिचित असलेला बालगंधर्व या चित्रपटाने नाट्यसंगीतात स्वतःचा ठसा उमटविणारा तरुण गायक आनंद भाटे यांची सायंकालीन मैफल आपटे कुटुंबीयानी २१ जुलै ला भरत नाट्य मंदीरात आयोजित करुन हाच संगीताचा आनंद आपल्या नातेवाईकांत आणि रसिकांमध्ये पसरविला...

सुरवातीला आनंद भाटे यांनी पूरिया धनाश्री रागातली `पार करो अरज सूनो` आणि त्यानंतर `पायलिया झंकार` या रसिकप्रिय बंदिशीने रसिकांना आपल्या शास्त्रीय संगीताच्या तयारीने खुश केले.

सौभद्र नाटकातील `कोण तुजसम सांग..`हे पद सादर करुन स्वरराज छोटा गंधर्वांची आठवण करुन दिली. या बहारदार पदानंतर मानापमान मधील `खरा तो प्रेमा,` `सौभद्र` मधील `वद जाऊ कुणाला शरण` ही पदे गाऊन बालगंधर्वांची आठवण करुन दिली.

सुधीर फडके यांच्या जंयतीनिमित्ताने गीतरामायणमधील `दशरथा घे हे पायसदान` हे गीतही भाटे यांनी अतिशय भाऊकतेचे दर्शन देत सादर केले. आपटे कुटुंबीयांशी बाबूजींचे घरोब्याचे संबंध असल्याने आणि बाबुजींच्या जाण्याला दहा वर्ष होत असल्याने या गीताचे महत्व जाणून रसिकांनीही तेवढीच मनसोक्त दाद दिली.

आनंद भाटे यांनी आपले गुरु भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वंदन करण्यासाठी `माझे माहेर पंढरी` ही भक्तिरचना आणि त्यानंतर संत तुलसीदास नाटकातली `राम रंगी रंगले` ही रचना भावपूर्ण रितीने सादर करुन रसिकांना भक्तिरसात न्हाऊन काढले.


संगीत `कान्होपात्रा` नाटकातील `जोहार मायबाप जोहार` या अभंगाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.कार्यक्रमाची सांगता त्यांनी `बालगंधर्व` चित्रपटातल्या कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेल्या `चिन्मया सकल ह्दया` या भैरवीने केली.

संपूर्ण कार्यक्रमात तबला साथ भरत कामत यांनी तर राजीव परांजपे यांनी हार्मोनियम आणि ऑर्गनची साथ केली...माऊली टाकळकर यांनी टाळाचा नाद देत अभंगांला उत्तम दर्जा प्राप्त करुन दिला. संपूर्ण कायर्क्रमाचे निवेदन सौ. शुभदा अभ्यंकर यांनी केले..

एकूणच रसिकांच्या मनात आनंद भाटे यांच्या कार्यक्रमाला जाण्य़ाचा जेवढा ध्यास होता..तेवढा सारा या गायनाच्या एक उत्तम मैफलीतून लाभला...एक सूरांचा लडीवाळ हार गुंफत रसिक तृप्त मनाने घरी परतले..


-रवीन्द्र आपटे, पुणे

Wednesday, July 18, 2012

शिवरायांचे आठवावे रुप -२२ जुलैला

नाट्य निर्मिती ही ज्यांची गरज नाही, एक हौस आहे...या भरत नाट्य संशोधन मंदिराने एका भव्य नाटकाची निर्मिती करण्याचा घाट घातला आहे...ते ही शिवधनुष्य ते पेलण्यासाठी पुण्यातले मान्यवर कलावंत दिपक रेगे यांना संस्थेचे सभासद करुन संजय डोळे यांच्या दिग्दर्शनाखाली नाटक सादर होत आहे...शिवरायांचे आठवावे रुप....


शिवाजी महारांच्या जिवनातले वेगवेगळे प्रसंग गुंफत लेखक ह्षीकेश परांजपे यांनी नाटक लिहले आहे..त्यात निवेदनासारखे प्रसंग पुढे नेणारे वेगवेगळे लोकसंगीताचे प्रकार येतात..त्यातले शाहिर, गोंधळी आणि इतर जण शिवरायांचे गुणगान करीत हा रंगमंचीय प्रयोग घडवत नेतात...हे शिवचरित्र सांगणारे नाटक नक्कीच नाही..असे लेखक आवर्जून सांगतात... हे नाटक म्हणजे इतिहास नव्हे..कर इतिहासातल्या घटनांची आदार घेऊन लिहलिल्या प्रसंगाची नाट्यमय गुंफण या नाटकात केली असल्याचे संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.


भव्य ऐतिहासिक नाटकाच्या निर्मितीतून संस्थेला पुन्हा एक नवे झळाळी येणार आहे. संस्थेचे कलाकार आणि काही इतर कलावंतांचा हा संच २२ जुलै २०१२ ला संध्याकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिरात या नाटकाच पहिला शुभारंभाचा खेळ करेल. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रभर सादर होईल, असे संस्थेचे अध्यक्ष विजय वांकर सांगतात. नाट्य मंदिर चालविणे हा एक संस्थेचा भाग आहे..तसेच नाटकांची निर्मिती करुन त्यांचे प्रयोग करणे हा ही संस्थेचा उद्देश आहे....

दिपक रेगे शिवाजी महारांजांच्या भुमिकेत असून त्याशिवाय मंजुषा जोशी, आशुतोष नेर्लेकर, विश्वास सहस्त्रबुध्दे, दादा पासलकर, संजय डोळे, आनंद पानसे आणि जिजाऊच्या भूमिकेत आहेत लिना गोगटे...
नाटकात मंदार परळीकर हे पोवाडे-गोंधळ सादर करुन त्यातून नाटक पुढे नेणार आहेत...



एकूणच हा वेगळा नाटयमय खेळ काय आहे..याची उत्सुकता माझ्याबरोबरच तुम्हालाही असेल..तर ते २२ जुलैला स्पष्ट होईल... दरम्यान तालमी सुरु आहेत ..
प्रयोगाला शुभेच्छा!



सुभाष इनामादार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276