subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, July 27, 2011

कलावंत विवेकाला स्पर्श करतो

-कवी ग्रेस



कलावंत विवेकाला स्पर्श करतो त्याला आपण सृजनशिल विवेक म्हणतो. चित्रकलेला अंतरा नसतो.
कविता आणि शिल्पकलेला अंतरेची पार्श्वभूमी असते. देवाची आणि देवदूताची समीक्षा करण्याचा अधिकार
माणसाला असल्याचे कवी ग्रेस म्हणतात.
कुसुमाग्रजाच्या कविता आणि कवी ग्रेस यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी भरत नाट्य मंदिरात गदीर् केली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवर भाष्य करत त्याला कविताची जोड देत उपस्थितांची मने जिंकली.

अनन्वय फाउंडेशनतफेर् कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

गेस यांच्या कामाचा राज्य सरकार, केंद सरकारकडून गौरव व्हायला हवा होता. प्रत्येक साहित्य संमेलनात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रेस यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची आवश्यकता असल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.


यावेळी सादर झालेल्या शब्दोत्सव कार्यक्रमात कुसुमाग्रजाच्या कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये योगेश सोमण, माधवी वैद्य, राहुल धोंगडे, राहुल घोरपडे यांनी सहभाग घेतला.

Tuesday, July 26, 2011

आजी मी नवल पाहिले....

संगणक क्षेत्रात मोलाचे काम करणारे दिपक शिकारपूर यांना मसाप तर्फे गो.रा. परांजपे पुरस्कार ज्येष्ठ संगणक तज्ञ विजय भटकर यांचे हस्ते देण्यात मंगळवारी देताना गुरू-शिष्याचे एक वेगळे नाते मनाला अधिक भावले.

सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेतले शिक्षक तपस्वी सर. या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित होते.

त्यांनी दिपक माझा विद्यार्थी होता. पण मी आज त्याचा विद्यार्थी बनलोय. तो जेव्हा महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणच्या व्याख्यानात संगणकावर भाषण देतो. त्यांना संगणकाचे ज्ञान देतो. आणि मराठीत संगणक साक्षर व्हावेत यासाठी प्रयत्न करताना पाहिले की मला तो माझा विध्यार्थी नसून मी त्याचा विद्यार्थी असून हे शिक्षण त्यांच्याकडे घ्यावे असे वाटते.

गुरूदक्षिणा द्यायची पण ती घ्यायची ही वेगळी पध्दत मलाही भावली
आणि मसापत उपस्थित साहित्य रसिकांना न आवडली तरच नवल.


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, July 25, 2011

शब्दप्रधान गायकीवर भर देणारे आजचे संगीत

-आरती अंकलीकर-टिकेकर

‘‘शास्त्रीय संगीत म्हणजे स्वरप्रधीन गायकी, जी ख्याल गायकी म्हणूनही प्रसिध्द आहे. ती अतिशय सूक्ष्म आणि तरल आहे. तीला शब्दांची गरज नाही. पण आजचा प्रवास आत्मरंजनाकडून मनोरंजनाकडे उलट्या दिशेने सुरू आहे. म्हणूनच आज शास्त्रीय गायकालाही शब्दप्रधान गायकीकडे जावे वाटते. त्याचा अभ्यास करावा लागतो.,’’ असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.

‘सांस्कृतिक पुणे’च्या वतीने ‘आकांक्षा क्रिएशन’निर्मित ‘मी प्रेमिका’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन अंकलीकर यांच्या हस्ते रविवारी एस एम जोशी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक, ज्येष्ठ उद्योजिका लीला पूनावाला, फिरोज पूनावाला, अल्बमच्या गायिका कस्तुरी पायगुडे-राणे, संगीत संयोजक मिलिंद गुणे उपस्थित होते. अल्बमचे संगीतकार, गीतकार अभिजित कुंभार आहेत, मात्र ते कॅलिफोर्नियात असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे आई-वडिल हजर होते.

अंकलीकर म्हणाल्या, ‘‘जेव्हा माईक संगीतात आला, तेव्हा शास्त्रीय गायकही आपला आवाज त्यातून कसा जातो, फ्रिक्वेन्सी कशी आहे या गोष्टींचा विचार करू लागला. तेव्हा शास्त्रीय गायकीत शब्दांच्या उच्चारावर भर देण्याचे वळण आले. त्यावेळी शास्त्रीय गायकही शब्दप्रधान गाणे उत्तम गाऊ शकतो हे समोर आले. शास्त्रीय गायक तसेच रागधारीची साधना करणारा प्रत्येक गायक हा उत्तम संगीत दिग्दर्शक असतो. कारण प्रत्येक आवर्तन म्हणजे एकेक क्रिएशनच असते.``

आजकाल कोणतेही गाणे अनेक वेळा ऐकले की, आपल्याला त्याची सवय होते आणि तो गायक/गायिका उत्तम गातात, असा समज होतो. मात्र, आजकाल गाणे येत नसलेलेही या ‘हॅमरिंग’मुळे प्रकाशझोतात येतात व त्यांचे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. त्यामुळे पालकांना कळकळीचे सांगणे आहे की, मुलांना उगाच काहीही न ऐकवता दर्जेदार संगीत ऐकवा, अशी सूचना ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी केली.

`कस्तुरीचा नितळ, निकोप व ताजा आवाज असून तो ध्वनीमुद्रणासाठी अतिशय उत्तम आहे.ही दैवी देणगीच आहे,`` असे मत आनंद मोडक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सध्या ताजेपणा, ताजगी सहसा सापडत नाही. कृत्रिमता वाढत आहे. जेव्हा माणसातील विद्यार्थी संपतो त्यावेळी त्यातील कलावंतही संपतो. कस्तुरीचा विद्या शिकण्याचा हा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत सुरू रहावा,’’ असा आशिर्वादही मोडक यांनी दिला.

आपण अल्बममधील सर्व गाणी ऐकली असून पूनावाला म्हणाल्या, ‘‘.कलाकाराला सर्व प्रकारचे गाणे गाता येणे आवश्यक आहे. ज्यांना रसिकांच्या पसंतीप्रमाणे गाता येते तो खर्‍या अर्थाने कलाकार आहे असे मला वाटते. रसिकांना समाधान देता येणे आवश्यक आहे ’’ तशीच ती झाली असल्याचे मतही त्यांनी बोलून दाखविले.


प्रकाशनानंतर या सीडीमधली तीन गाणी कस्तुरी पायागुडे-राणे यांनी प्रत्यक्ष सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवून आपली गायकीतली तयारी सिध्द करून दाखविली. .आपल्या गायकीचा प्रवास व सीडीच्या वाटचालीबद्दलचे मनोगतही सूत्रसंचालक अरूण नूलकर यांनी विचारलेल्या प्रश्नातून व्यक्त झाले .
संगीत संयोजक मिलिंद गुणे हे ही या संवादात सामिल झाले होते.
सीडीसाठी सहाय्य केलेल्या सर्वांचाच सक्तार यावेळी करण्यात आला. सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी एस एम जोशीत गर्दी केलेल्या उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार प्रकट केले.

http://www.facebook.com/?sk=lf#!/photo.php?fbid=196818063706914&set=a.132694696785918.32502.100001361659055&type=1&theater

Saturday, July 23, 2011

बॉलिवूड हे सांस्कृतिक परंपरेचे भक्ष्यस्थान

नृत्य, संगीत या क्षेत्रात वैयक्तिक योगदान देणारे कलावंत चित्रपटसृष्टीकडे धावत असून ते बॉलिवूडच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अभिजात कलेची हानी होते आहे, असे मत पॉप गायक रेमो फर्नांडिस यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटाला संगीत देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

रेमो फर्नांडिस हे "मॉन्टे व्हर्ट इस्टेट्‌स'ने आयोजित केलेल्या संगीत रजनीसाठी पुण्यात आले आहेत. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. बॉलिवूड, सध्याचे संगीत, परदेशातील संगीत क्षेत्र याबाबत त्यांनी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, 'पूर्वी पॉप, रॉक अल्बमचे प्रमाण जास्त होते; परंतु आता हे अल्बमसाठी कष्ट घेणारे गायक, संगीतकार पूर्णवेळ बॉलिवूडमध्ये दाखल झाले आहेत. प्रसिद्धी, पैसा हे त्यामागील कारण आहे. यामुळे दर्जेदार अल्बम बाजारात येणे बंद झाले आहे. भारतीय पॉपची प्रगती खुंटली आहे. कलाकारांनी चित्रपटसृष्टीत काम करायला हरकत नाही; परंतु आपली कला त्यांनी वेगळी जोपासली पाहिजे.''

'मला चाकोरीबाहेरचे संगीत द्यायला आवडते. त्यासाठी मी प्रयत्न करतो. मग त्याला भाषेचा अडसर येत नाही. अगदी मराठी असो वा हिंदी, विषय वेगळा असेल, तर त्या चित्रपटाला संगीत द्यायला आवडेल. प्रथम मला कॅसेट कंपन्यांनी नाकारले होते. परंतु, मी स्वत: कॅसेट ध्वनिमुद्रित करून स्कूटरवरून विकल्या आहेत. लोकांनी त्या ऐकल्यानंतर माझी ओळख निर्माण झाली. श्‍याम बेनेगल यांनी माझ्या संगीतरचना ऐकून मला त्यांच्या चित्रपटात संधी दिली होती,'' असे ते म्हणाले.

पुण्यातील फसलेल्या पहिल्या कार्यक्रमाची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. 'लहान असताना मला पुण्यात येण्याची संधी मिळाली. एका व्यक्तीने आमच्या बॅंडच्या संगीत रजनीचे आयोजन केले होते. परंतु, येथे आल्यानंतर तो गायब झाला. त्या वेळी पुरेसा पैसाही आमच्याकडे नव्हता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. आमची कानउघाडणी केल्यानंतर मग आम्हाला गोव्याला पाठविण्यात आले,'' असे ते म्हणाले.
http://www.esakal.com/esakal/20110724/5335040805023219889.htm



'संगीत क्षेत्रातही कलावंत हि-यांची परंपरा'

' राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' असे वर्णन केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दगडांच्या खाणीतील हिरेही निर्माण होतात. इतर सर्व कलाक्षेत्रांसोबतच संगीत क्षेत्रातही अशीच कलावंत हिऱ्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो,' असे मत ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक राजदत्त यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे भारत गायन समाजातर्फे आयोजित (कै.) सौ. वसुंधरा पंडित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राजदत्त बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते संगीतकार अशोक पत्की यांना या वर्षीच्या कै. सौ. वसुंधरा पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कै. वसुंधरा पंडित ट्रस्टच्या विश्वस्त अरुणा गवाणकर, पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष सुधाकर जोशी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

खरा कलावंत हा आपली कला कायम समृद्ध करायचा प्रयत्न करीत असतो. तेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते. आपल्याकडे चांगल्या कलावंतांची खूप मोठी परंपरा आहे. त्यातल्याच एका आदर्श कलाकाराचा आपण आज गौरव करीत आहोत. अशाच माध्यमातून चांगल्या कलाकारांची उदाहरणे नव्या पिढीसमोर येणे आवश्यक आहे, असेही राजदत्त यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना पत्की यांनी, 'अजून शिकण्याची आवड असल्याने मी स्वत:ला कधीच मोठे मानले नाही. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक गोड धक्का आहे,' असे सांगितले. पत्की यांनी संगीत दिलेल्या गाण्यांसोबतच त्यांच्या प्रकट मुलाखतीचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9340288.cms

संगीत सावित्री- अभिनव आविष्कार-३१ जुलैला

संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त नटसम्राट बालगंधर्वांनी रंगमंचावर आणलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवार

संध्याकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिरात सादर होणार आहे
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा) यांच्या वतीने होणा-या या अभिनव प्रयोगाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि प्रस्तुती पं. जयराम पोतदार यांची आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत पोतदार अधिक माहिती देताना सांगतात, या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस या थिएटरमध्ये ६ मार्च 1932 रोजी करण्यात आला. नाटकात सत्यवान- गंगाधरपंत लोंढे, नारद-मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि सावित्रीच्या भूमिकेत स्वतः बालगंधर्व अशा भूमिका होत्या. नाटकाचे पहिले काही प्रयोग हाऊस फुल्ल झाले याचे कारण ही सारी तेव्हाची स्टार कास्ट. मात्र १९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे बोलपट पाहण्यासाठी नाट्य रसिकांचाही तिकडे ओढा वाढला.सहाजिकच नाटकाकडे रसिक येईनासा झाला.
संगीत सावित्री हे संगीत आणि कथानक दोन्ही दृष्ट्या उत्तम असूनही रसिकांनी याकडे पाठ फिरविली. नाईलाजाने बालगंधर्वांना या नाटकाचे प्रयोग बंद करावे लागले.

साबरमती नदीकाठी एक वर्षाची कारागृहाची शिक्षा भोगत असताना १९२९ साली या नाटकाची गद्य संहिता खाडिलकरांनी लिहून काढली होती. पण नंतर बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांनी नाटकातील गाण्यांना चाली देण्याचे मान्य केल्यावर १९३३ साली खाडिलकरांनी नाटकातली पदे रचली.

नाटकाचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने त्यातल्या गाण्यांचा दर्जा उत्तमच होता. मात्र या नाटकाचे पुन्हा प्रयोग झाले नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. रसिकांच्या विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर यावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे पं. जयराम पोतदार यांनी सांगितले.

सादरीकरणात संगीत नाटकातील पारंपारिक पध्दतीप्रमाणे सूत्रधार-नटीच्या संवादातून नाटकाचे कथानक कथन केले जाणार आहे. संवादातून कथा पुढे सरकत राहिल आणि गायक-गायिका त्यातली पदे सादर करतील. संगीत नाटकाप्रमाणे ऑर्गन आणि तबला साथ पिटात असणारच आहे. कार्यक्रम नाट्यमय करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. अवघ्या अडीच तासात संगीत रसिकांना संगीत नाटकाचा पूर्ण अनुभव देण्याची ही पध्दत पुण्यात पं. पोतदार रूढ करू इच्छीत आहेत.

रविवार ३१ जुलैला संध्या. ५ वा, भरत नाट्य मंदिर,पुणे

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा)
डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटक
संगीत सावित्री- कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार
संगीत दिग्दर्शन- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि बालगंधर्व

संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व प्रस्तुती- जयराम पोतदार

संगीत मार्गदर्शन- संजय हरिभाऊ देशपांडे
गायक- सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी
सूत्रधार- सुभाष इनामदार, नटी- विनया देसाई
तबला- संजय कंरदीकर. ऑर्गन- जयराम पोतदार



Friday, July 22, 2011

रूपांतरीत अनुवादाचा वेगळा प्रकार आवडला

-प्र. के घाणेकर

मला हे पुस्तक खरोखरीच आवडले. रुपांतरीत अनुवादाचा हा वेगळा साहित्य आविष्कार या निमित्ताने अनुभवता आला. त्यातल्या कथा केवळ `बीज` घेतात बाहेरचे पण त्यातला परिसस्पर्श मात्र अस्सल, या मातीतला आहे....
इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटन विषयावरचे लेखक प्रा. प्र.के घाणेकर यांचे हे मत आहे
`एका परिसाची कथा` या पुस्तकाविषयीचे....


पुस्तक प्रकाशनाचा अनौपचारिक कार्यक्रम पुण्यात मराठा चेंबरच्या एका सभागृहात झाला. मेहता पब्लिशींग हाऊसने
प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा सोहळा लेखक मिलिंद जोशी यांनी स्नेहमिलनाचा आनंद म्हणून पुण्यात भरविला.
मिलींद जोशींचे घाणेकर सर हे महाविद्यालयात शिकवायला होते...गुरूने आपल्या एका शिष्याच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मानच या निमित्ताने केला. शिष्याने त्यांना पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावून गुरूदक्षिणाच दिली.

इतर भाषेतल्या चांगल्या लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत साहित्य मराठी वाचकांना आवडेल. मेहता प्रकाशनाने असा साहित्याचा ठेवा या पुस्तकाच्या रूपाने दिला याबद्दल आणि रूपांतरीत साहित्याला तो अनुवाद न ठरवता मराठीतले समर्पक नाव द्यावे अशी अपेक्षा घाणेकरांनी व्यक्त केली.

सारे मोठे लोक बेशिस्त वागतात. चाकोरीतले जीवन सोडून मोकळे-ढाकळे वागायला लागलात तर तुम्हाला नवीन आनंद घेता येईल. साचेबंदपणा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यत आयुष्याचा वेगळा अनुभव घेता येणार नाही..
मिलिंद जोशी यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले. लेखकाने तर माणसे, निसर्ग आणि आजुबाजुचे निरिक्षण करणे ही तर अत्यावश्यक गरज आहे. मीही लहानपणी खूप भटकलो. हिंडलो. पश्चिम घाटात, कोकणात निसर्ग पाहिला. कोकणातल्या माणसात त्यांचा बनलो. मनुष्यस्वभावाच्या छटा पाहिल्या.

यातूनच इतर भाषेतल्या साहित्याचा आस्वाद घेतला. त्यांतल्या काही कथा भावल्या त्यातले बीज घेऊन तयार झालेल्या काही कथा अस्सल मराठी वातावरणात लिहल्या. त्यातल्याच २० कथांचे `एका परिसाची कथा` हे पुस्तक तयार झाले.
ते मेहतांनी प्रकाशित केले याचा आनंद मिलिंद जोशींनी व्यक्त केला.
चांगले लेखक आणि चांगले वाचक मिळावेत यासाठी प्रकाशक संस्था नेहमीच अशा लेखकांच्या शोधात असते. मिलिंद जोशी हे असेच लेखक. आम्हाला यापुढेही ते सहकार्य देतील आणि आणखी पुस्तके प्रकाशनासाठी मिळतील अशी आशा सुनिल मेहता यांनी व्यक्त केली.

समारंभात साधेपणा होता. बडेजाव वगळला होता. अनेक वर्षानंतरचे मित्र भेटले. सध्या ते मुंबईत असातात.
तसे जोशी पुण्यातले. नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या या भेटीने भारावलेल्या मिलिंद जोशींच्या काकांनीही
यात सहभाग घेऊन मिलिंद जोशींच्या आई-वडीलांना साहित्याची आवड होती पण ती आज मुलाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा आनंद शब्दातून व्यक्त करून त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आशिर्वाद दिला.


सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276
subhashinamdar@gmail.com

Tuesday, July 19, 2011

रंगली झाकीरची मैफल

' बेटा अच्छे शागीर्द बनो, उस्ताद बनने की कोशिश न करो,' असा वडील अल्लारखाँ यांनी दिलेला गुरूमंत्र, अथक रियाज, बालपणातच पं. रविशंकर यांच्यासारख्या दिग्गजांकडून मिळालेले धडे आणि अथांग संगीतसागरातील एक साधक असल्याची प्रांजळ भावना...

मंत्रमुग्ध करणारा तबला-डग्गा नव्हता, तरी उस्ताद झाकीर हुसेन यांनी मैफल रंगवली. या खेपेस ठेका होता स्मरणरंजनाचा!

निमित्त होते पु. ल. देशपांडे बहुरूपी पुरस्कारप्रदान सोहळ्याचे. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतफेर् झाकीरजींचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश लळित, उपाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, सुहासिनी पुजारी, दादासाहेब नाईकनवरे आदी या वेळी उपस्थित होते. पं. योगेश सम्सी यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान झाकीरजींचे स्मृतिताल रंगले.

बेटा अच्छे शागीर्द बनो. उस्ताद बनने की कोशिश न करो, हे अल्लारखाँ यांचे बोल अजूनही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, असे सांगून झाकीर म्हणाले की, संगीताच्या क्षेत्रात अजूनही बरेच काही करायचे आहे. वडिलांचा हा गुरूमंत्रच कलेचा साधक म्हणून आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो. उस्ताद म्हणून तुम्ही गौरवित असला, तरी उस्तादगिरी गाजविण्यासाठी कधीच तबल्यावर थाप मारली नाही.

मोठ्या कलाकरांच्या सहवासातून संगीत शिक्षणास सुरवात झाली. विद्याथिर्दशेत पं. रविशंकर यांचे मार्गदर्शन लाभले नि त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच कलेची वाटचाल सुरू आहे. संगीत ही एका कप्प्यात बंद राहणारी कला नसून, तिला सागराची उपमाही थोडकीच आहे. भारतीय संगीताची परंपरा पुढे नेणाऱ्या माझ्यासारख्या कलासाधकांनी तिचा अहंभाव न मानता आंतरराष्ट्रीय संगीतातील नव्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. उत्तम तालीम हा जसा संगीताचा आत्मा आहे. त्याचप्रमाणे चांगली साथसंगत कलाकाराला पैलू पाडते आणि मैफल खुलविते, असेही झाकीर म्हणाले.


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9276601.cms

Monday, July 18, 2011

पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक

कस्तुरी पायगुडे-राणे

कॅलिफोर्नियातला गीतकार, कवी आणि संगीतकार अभिजित कुंभार यांच्या मी प्रेमिका या अल्बममधून २४ जुलैच्या प्रकाशन समारंभानंतर गायिका म्हणून वावरणारी. तसेच सुगम संगीताकडे लक्ष वेधणारी . उद्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणारी. मूळात शास्त्रीय संगीतात करियर करण्यासाठी तयार असलेल्या कस्तुरी पायगुडे-राणे हिच्या करियरविषयी घेतलेला हा धावता आढावा.



इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर लहानपणापासून आवड असलेल्या शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवून ललित कला केंद्रात एमए साठी कस्तुरीने नाव दाखल केले. तेव्हापासून विद्यापिठीच्या गुरू म्हणून मार्गदर्शिका लाभल्या सौ. आरती अंकलीकर-टिकेकर हे आपले भाग्य असल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात वारंवार येतो. त्यामुळेच खरा गुरू आणि शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाल्याची कबुली त्या देतात.



थिएरीसाठी ललित केंद्राचे दालन मात्र गुरूकूल पध्दतीने त्यांच्या घरी जावून शिक्षण घ्यायचे असल्याने आपल्या गाण्यात सहाजिकच तोच बाज पक्का रुळला. त्यामुळेच त्यांच्या विविध मैफलीत तंबोरा साथ करताना गाणे कसे गावे, काय गावे आणि मैफल कशी रंगवावी याचे प्रत्यक्ष ज्ञान कस्तुरीला झाले. ज्यामुळे आजही नेहमीच गुरू म्हणून त्यांचे नाव आपल्या आयुष्यात कामय जोडले गेल्याचा आनंद कस्तुरीच्या बोलण्यात दिसतो.

पण ज्यांचे शास्त्रीय़ संगीत ऐकून आपणही यात सखोल अभ्यास करावा असे वाटले ते प्रसिध्द गायिका सौ. विणा सहस्त्रबुध्दे यांच्याकडे गेल्यामुळे. कस्तुरी म्हणते, बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी मला त्यांच्या घरी रियाज ऐकायची आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकविताना बसायची परवानगी दिली. त्यांच्यासमोर मी कधी गायले नाही. पण महाविद्यालयाचे तास संपले की, त्यांच्याकडे जावून ते अध्ययन मी ऐकायची. त्यांच्या या गाण्याने . आवाजातल्या भावाने मी भारावून गेले. आपल्याला असे गाता आले पाहिजे असे मनाने घेतले आणि संगीत विषयात मास्टरी करण्यासाठी ललित कला केंद्रात मी दाखल झाले.

`मी प्रेमिका`च्या निमित्ताने सुगम संगीत गायची संधी मिळाली. त्यामुळे आपल्याला पार्श्वगायनाची नवी संधी अचानक हाती आल्याचे कस्तुरी अभिमानाने सांगते. `मी प्रेमीका`ची पार्श्वभूमि सांगताना ती बोलते, `अभिजित कुंभार हा माझ्या नात्यातला. तो खूप कविता करतो. त्याला संगीतातही गोडी. आपल्या कविता लोकांना माहित व्हाव्या अशी त्याची इच्छा. जाने. २०११ ला त्याने ती माझ्याजवळ व्यक्त केली आणि आठ गाण्यांचा अल्बम पूर्ण करण्यापर्यतचा हा टप्पा यशस्वीपणे आज पूर्ण झाला`.

कस्तुरी पायगुडे-राणे हिला आज जरी शास्त्रीय संगीताची गायिका म्हणून या क्षेत्रात ओळखले जाते तरी त्यामागचा संगीतविषयक प्रवासही तेवढाच ऐकण्यासारखा आहे.

ती सांगते, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की माझी हा आवड निर्माण होण्याचे कारण घरातले वातावरण. माझे वडील शरद पायगुडे यांना संगीत ऐकण्याचे भारी वेड. घरात कित्येक गायकांच्या कॅसेटचा खजिना असायचा आजही आहे. घरात रोज वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतातील गायकांच्या मैफली कानावर पडत. त्यातले स्वर
,त्याचा मोह कायमचा जडला गेला. सहाजिकच त्याकडे लक्ष देऊन आपणही त्याप्रमाणे गायची खोडी करायला लागले.
पुढे तिच सवय जडली.

पाचवी पासून ज्ञानप्रबोधिनीत दाखल झाल्यावर तर काय माझ्यातल्या कलेला पोषक वातावरण तिथे लाभले. शाळेची प्रार्थना तर कित्येक वर्ष मीच म्हणायचे. समूहगीते,वेगवेगळ्या स्पर्धात माझा सहभाग वाढला. आत्ता संगीत संयोजन करणारे मिलिंद गुणे तेव्हा शाळेत गाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत काही दिवस आल्याचेही आठवतात.

पुढचा प्रवासही सांगताना त्या आठवणीत रमून जावून सांगतात, अकरावी-बारावीसाठी गरवारेमध्ये सायन्सला दाखल झाल्यानंतरही इचलकरंजीत सुगम संगीत गाण्यासाठी महाविद्यालयातर्फे माझी निवड झाली. महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धांनाही माझी हजेरी गृहित धरलेली असायची.

बारावी नंतर विचारांती गाण्याला प्राधान्य मिळावे यासाठी कला शाखेची निवड केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल होऊन विविध कार्यक्रमांच्या आयोजनात कस्तुरीचा सहभाग वाढला गेला. २००१-२००१ च्या फिरोदिया करंडक स्पर्धेत तीला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही प्राप्त झाला. त्यातच तिच्यावर `स्पिक मॅके`च्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली.त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांचे गाणे जवळून ऐकता आले.

दरम्यान संगीताचे रितसर शिक्षण सुरू राहिलेच. अलका थिटे, निलम दिक्षित (जोशी), यांच्याकडे मध्यमापर्यंत तर निता भाभे यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण होईतो महाविद्यालयातील पदवी कस्तुरीला प्राप्त झाली.

पदवीनंतर एमएचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लिला पूनावाला ट्रस्ट आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रची स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे संगीताच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च घरच्यांना फारसा करावा लागला नाही.


संगीतात एमएची पदवी संपादन केल्यानंतर कस्तुरीने एका खासगी शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी धरली. पण तिथे गाणे शिकविण्यापेक्षाही मुलांना शांत बसविण्यातच आवाजाचा वापर अधिक करावा लागण्याचा अनुभव आला. स्वतःची साधना करायला वेळ आणि निवांतपणाही मिळेनासा झाला. कस्तुरीने ती नोकरी सोडली. मात्र त्यानंतर संगीताची एक मार्गदर्शक म्हणून कर्नाटक शाळेच्या संगीत विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.

आता मात्र शास्त्रीय संगीताचा रियाज. काही संगीताच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून, शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा ध्यास कस्तुरीने घेतला आहे. आजही त्या आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याबरोबर साथीला असतात. त्यांचे मार्गदर्शन आहेच. तिच ओढ आजही कायम आहे. हे सारे आनंदी दिवस दाखविण्यासाठी ज्यांचे नाव घ्यायचे ते आई-वडिल. त्यांचे प्रोत्साहन कायम आहे. आजही. लिला पूनावाला आणि कस्तुरीचे पती निखील राणे यांचे.

आजवर कस्तुरीचे पुण्यात आणि बाहेरही , तसेच परदेशात दोनशेच्यावर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. आता शास्त्रीय संगीतातच करियर करायचे असे तिने मनोमन ठरविले आहे. आता शास्त्रीय संगीत हेच धेय्य .
त्यातही सुगम संगीत गायची संधी जर मिळाली तर नक्कीच ती सोडायची नाही. त्यातूनच पार्श्वगायनाचा रस्ताही दिसू लागेल, असा विश्वास कस्तुरीला वाटतो.


सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
email. subhashinamdar@gmail.com

`मी प्रमिका`-सीडीचे प्रकाशन २४ जुलैला

पुणे-18, रचनाकार आणि संगीतकार अभिजित कुंभार कॅलिफोर्नियात तर गायिका कस्तुरी पायगुडे-राणे पुण्यात असताना आजच्या काळातल्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाची जोड घेऊन तयार झालेल्या `मी प्रमिका` या ध्वनिफितीचा प्रकाशन समारंभ २४ जुलैला पुण्यात होणार आहे,याबाबतची माहिती सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार आणि शरद पायगुड़े यांनी सोमवारी पत्रकारांना दिली .

आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या कस्तुरी पायगुडे-राणे यांनी प्रेमगीतांच्या ८ रचनांच्या ध्वनिफितीमधून आपल्या गायनाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आकांक्षा क्रिएशन्स निर्मित या सीडीचे प्रकाशन आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या हस्ते होत आहे. एस एम जोशी सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणा-या समारंभाचे प्रमुख पाहुणे संगीतकार आनंद मोडक असणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून लीला पूनावाला व फिरोज पूनावाला उपस्थित राहणार आहेत.

कस्तूरी पायगुड़े यांच्या बाबत सांगताना, शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करत कस्तुरी पायगुडे-राणे यांनी पुण्यात ,पुण्याबाहेर आणि परदेशात २००च्यावर कार्यक्रम सादर केले आहेत. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त त्यांनी गायलेला हा मराठी प्रेमगीतांचा हा अल्बम गायनाच्या वेगळ्या क्षेत्रातील आपले स्थान निर्माण करील अशी खात्री असल्याचे शरद पायगुड़े यांनी सांगितले.

`मी प्रमिका`चे संगीत संयोजक मिलिंद गुणे आहेत.ध्वनिमुद्रण शिवरंजनी स्टुडीओत करण्यात आले आहे.
अभिजित कुंभार यांचेही हे पहिलेच पाऊल आहे. आज ते परदेशात असले तरी या निमित्ताने मराठी भाषा जपण्याचा आणि ती टिकविण्याचा प्रयत्न होत आहे.
याकार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक पुणे (सुभाष इनामदार) यांचे मार्फत केले गेले आहे. सर्वासाठी २४ जुलैचा कार्यक्रम विनामुल्य आहे.

Saturday, July 16, 2011

आनंद : रसिका जोशी




गहिवरलो
वाचलं
कॅन्सरने निधन
परवा - परवा पाहिलं तुला टीव्ही वर
आनंदाने बिनधास्त
मुलाखत देत होतीस
बिनधास्त हिंदी डायलॉग टाकत
तुझ्याच हिंदी चित्रपटातला
पुसटशीही कल्पना नव्हती
कॅन्सर तुला छळतोय
कणाकणाने घटवतोया
राजेश खन्नाचा "आनंद"
कॅन्सर पेशंटची भूमिका
फक्त भूमिका
तू ती जगलीस
गेली नऊ वर्षे
आनंदाने
टवटवीतपणे
खट्याळ, दिलखुलास हसू
लोपू न देता
उर्जेची अखंड ज्योत ;
जीवननिष्ठा
जागवित
खरंच ; आज तू
" आनंदला"
पोरकं केलंस
स्वः तास स्वीकारून
दुसर्यांना स्वीकारायला लावणारी
रणरागिणी
'स्व' त्व जपून
"माणूस" मूल्य जपणारी
हिरकणी
तुझ्यातली सृजनशील लेखिका
कोणास कळली ?
जुनाट सिस्टीम
यांत्रिकीकरणाचा रेटा
माणसाचं एकाकीपण, तुटलेपण
अस्थिरता
तुझ्या भेदक सत्यान्वेषी दृष्टीने टिपले
व्हाईट लिली नाईट रायडर
तुझ्या प्रतिभेचा उच्चतर आविष्कार
असा बोल्ड, हरहुन्नरी, कसदार अभिनय
आता कोण करणार ?
झालीस तू तुझ्या चाहत्यांच्या कुटुंबातली
एक सदस्य
असं यश - - - - - - -
तुला मोलाची साथ देणारे
गिरीश जोशीस सलाम
तुला सलाम
आता तुझी परवानगी घेऊन थांबतो
नाही तर म्हणशील :
किती लांबड लावली !


सुरेश टिळेकर


पुणे.

Friday, July 15, 2011

गुरूपौर्णिमेचा भक्तिरंग फुलला

भारत गायन समाजात


गुरूपौर्णिमा आणि बालगंर्धवांचा स्मृतिदिन एकाच दिवशी आल्याने शताब्दि वर्ष साजरा करित असलेल्या पुण्याच्या भारत गायन समाजाने संगीत शिकविणा-या गुरूजनांचा सत्कार शुक्रवारी केला. मास्टर कृष्णरांवांना संगीत दिलेल्या पदांची बहारदार मैफल भक्तिरंग या नावाने समाजात रंगविली.



अतुल खांडेकर या तरूण गायकाला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या हस्ते मालती पांडे पुरस्कार दिला गेला. त्यांनी गायलेली मजला घडावी ही सेवा, पतित तू पावना ही दोन्ही पदे मास्टर कृष्णरावांची आठवण ताजी करून देण्याइतकी समर्थपणे सादर करून रसिकांची दाद घेतली.

जोहार मायबाप जोहार हे पद शिल्पा पुणतांबेकर (पूर्वाश्रमीची दातार. म्हणजे भास्करबूवा बखले यांची नातसून सौ. शेला दातार यांची कन्या) यांच्या आवाजात ऐकताना त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या तयारीची कल्पना येते. शिवाय स्वर-भाव दोन्ही तालांच्या लयीत इतके चपखल बोलत होते की सहज दाद येते...क्या बात है.त्यांनी गायलेला समर्थ रामदास यांचा अभंग तर इतका रंगत गेला की तो संपूच नये असे वाटत होते ...फारच उत्तम गायला. त्याची वहावा द्यायची
तर ती समर्थपणे साथ केलेल्या साथीदार यांचेकडे श्रेय जाते .


बोलावा विठ्ठल..पहावा विठ्ठलाच्या गजरात रसिकांना तृप्त करणा-या सौ. सावनी कुलकर्णी यांच्या भक्तिपूर्ण रचनेने सारी सभा नादवून गेली होती.

समीर पुणतांबेकर (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज), राहूल गोळे ( ऑर्गन), आणि नितिन जाधव(तालवाद्ये) यासाथीदारांची साथ ज्या ताकदीचा झाली त्यामुळे गायकांच्या स्वराला वाद्यांचा हा ताल सही सही मैफल कानात साठवत राहिला.

शंकर तुकाराम शिंदे (तबला), भालचंद्र दामोदर देव (व्हायोलिन), सुहास दातार , मधुकर जोगळेकर,सौ. मैत्रेयी बापट आणि सुधिर दातार यांना गुरूपौर्णमेनिमित्त समाजाचे अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले.

काळ बदलला... तरी संस्कृतिच्या पाऊलखुणा आजही कायम आहेत. पुण्यात आता आजपासून विविध कलावंतांच्या शिष्यांकडून गुरूपौर्णिमा साजरी होईल . कुणी जाहिर तर कुणी खासगीत गुरूंना वंदन करेल.
आपण कुणाचे तरी फॉलोअर आहोत. हे समजून स्वतंत्र पायवाट निर्माण करणारे शिष्य हे गुरूंचे भाग्य.

सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com

Wednesday, July 13, 2011

नव्या पिढीची गायिका

कस्तुरी पायगुडे-राणे

काळाबरोबर चालणारी. नव्या विचारसरणीची. संस्कृतिची, संस्कारांची आणि सामाजिक बदलाची जाण असणारी. उद्याच्या संगीताच्या क्षितीजावर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी पुण्यातली गायिका म्हणजे सौ. कस्तुरी पायगुडे-राणे.

कस्तुरी सुप्रसिध्द गायिका सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या. त्यांच्या मार्गदर्शनातून पध्दतशीर रियाज करून गळ्यावर शास्त्रीय संगीताचे झालेले संस्कार कस्तुरीच्या गाण्यातून दिसतात. तालमीतून तयार झालेला आवाज. वेगवेगळ्या रागांची सौंदर्यतत्व सांभाळत केलेली मांडणी. गमक, तान, मींड अशा गायनातल्या विविध प्रकारांवर प्रभुत्व मिळविलेला आवाज .ज्या सहजतेने ती सादर करते तेव्हा रसिकांची मिळालेली दाद तिच्या संगीताच्या सादरीकरणातून मिळते.



शास्त्रीय बरोबरच अशास्त्रीय संगीताचे प्रकारही कस्तुरी तेवढ्याच तयारीने गाते. उदा. दादरा, झुला, गझल, भजन इ.
पुण्यात, पुण्याबाहेर आणि परदेशात असे मिळून दोनशेच्यावर कस्तुरीचे कार्यक्रम झाले असून तिच्या गायकीची प्रशंसा सर्वत्र झाली.

जुलै २०११ मध्ये मी प्रेमिका हा मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बमही प्रकाशित झाला आहे.
पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रातून कस्तुरीने A ग्रेडसह एम.ए. (संगीत) ची पदवी संपादन केली आहे. विशेष योग्यतेसह अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे विशारद आणि पुणे विद्यापीठातून बी.ए. (इंग्रजी साहित्य) पदवी प्राप्त केली आहे.
कस्तुरीला उच्चशिक्षणासाठी लीला पूनावाला फौंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती मिळाली होती. ती २००५ पासून स्पिक मॅकेची पुणे चॅप्टरची प्रमुख समन्वयक तर २००९ ते २०११ पर्यत या चळवळीची नॅशनल एक्झीक्यूटीव्ह म्हणून काम केले आहे. या काळात तिने मान्यवर कलाकारांचे ५०० हून अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
पत्ता-
१२/ अ, श्री विष्णुबाग हौसिंग सासायटी,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे,
शिवाजीनगर, पुणे- ४११०१६
फोन- + ९१ (२२०) २५६६११००
+ ९१ (०) ९८८११३६९४६
ई-मेल- paigude.kasturi@gmail.com

पुरस्कार आणि पारितोषिके-
- आकाशवाणी, पुणे. सुगम संगीत कलाकार म्हणून मान्यता.
- सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार फिरोदिया ट्रस्ट- २००१-२००२
- सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन २००६-२००७ (आम्ही मूमविय करंडक)
- पीस ऐम्बेस्डर २००८- लिला पूनावाला फौंडेशन व आशा फौंडेशन
भारतात सादर झालेले कार्यक्रम-
-य़शवंतराव चव्हाण कल्चरल सेंटर, मुंबई
रत्नागिरी
-अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंदौर
-अंबड संगीत महोत्सव, अंबड
-गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव, अक्कलकोट
-सांगवी संगीत महोत्सव, पुणे
-विद्या प्रतिष्ठान , बारामती
-पीपल फौंडेशन, पुणे
-नंदनंदन प्रतिष्ठान, पुणे
- स्वरवेद, नागपूर

परदेशातील कार्यक्रम-
-नेहरू सेंटर, लंडन
-महाराष्ट्र मंडळ, लंडन
-तारा आर्टस्, लंडन
-बैठक, बर्मिंगहम
-ऑक्सफर्ड युनिव्हरसिटी, ऑक्सफर्ड



x

विठ्ठल गीती गावी -राजेंद्र दिक्षित

पुण्यात आषाढी एकादशीचा विठ्ठल नामाचा गजर प्रत्यक्ष विठ्ठलवाडीच्या पांडुरंग-रूक्मिणीच्या दर्शनाने तर झालाच.
पण त्याही पेक्षा पांडुरंगाच्या नावाचा स्वरगजर चहुभागात नादावला गेला. आषाढी म्हटली की लक्षात रहाते ती
कै.भारतरत्न पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेली अभंगवाणी. संतांचे अभंग त्यांच्यामुळे समाजात ऐकले गेले. त्यांच्या ओठी रूळले. आजही त्यांच्याच अभंगवाणीच्या रेकॉर्डनी पुण्यातली विठ्ठल मंदीरे स्वरभास्करमय होऊन गेली होती.



पंडीतजींचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी हाच हरिनामाचा गजर विठ्ठल गीती गावी या नावाने सोमवारी ११ जुलैला आळवला. दिक्षितांकडून अभंगाचा आस्वाद घेताना त्यांच्याच स्वरमेळींचा स्पर्श आणि त्यांच्या शैलीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पंढरी निवासा...माझे माहेर पंढरी आणि तिर्थ विठ्ठल सारख्या अभंगातून ओतप्रोत भक्तिचा मळा फुलविण्यात राजेंद्र दिक्षित भक्तांना नादविण्यात य़शस्वी झाले होते. गाण्यातला भाव आणि शास्त्रीय संगीताच्या नादस्पर्शी बनलेल्या स्वरांनी अभंगांला सुरेलशा नादाचा स्पर्श झालेला आढळला.. या अभंगाच्या प्रवासात कधी जनाबाईंचा ( जनीच्या घरी पांडुरंग आला) तर कधी अवघाची संसार सुखाचा करीन ( संत ज्ञानेश्वर) म्हणत भक्ति पागे यांनी आपल्या आवाजाची तयारी दाखविली. त्यातच अमृताहूनी गोड यातला लडीवाळ स्वर कुरवाळत माणिक वर्मांची आठवण रसिकांच्या मनात जागविली.

रेझोनन्स ऑडिऑ स्टुडीऑच्या वतीने हिमांशू दिक्षित यांनी हा विठ्ठल नामाचा गजर बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात आयोजित करून कोथरूड परिसरातल्या भक्तांना आणि रसिकांना भक्तिचा नजराणा बहाल केला होता. चित्रकार रवी परांजपे, बासरी वादक राजेंद्र तेरेदेसाई, राघवेंद्र भीमसेन जोशी, आशाताई किर्लोस्कर अशा मान्यवरांनी दोन तासांचा हा कार्यक्रम पूर्णपणे अनुभवला, यातूनच हे सिध्द होते.

ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, नामदेव , कान्होपात्रा, एकनाथ अशा संताच्या अभंगाबरोबरच ग.दि.माडगुळकरांच्या इंद्रायणी काठीचा उदोउदो झाला नाही तरच नवल. निरुपणकार रविंद्र खरे यांनी हा सारा प्रवास अध्यात्मापासून ते संसार-परमार्थ या सा-याचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करून संतांच्या रचनात लपलेला भावार्थ रसाळपणे कथन करून रचनांता सार्थकता आणली.


भाव-भत्किचा हा मळा स्वरांनी जरी नटवला राजेंद्र दिक्षित आणि भक्ती पागे या गायकांनी तरी तो स्वर अधिक नादमय, श्रवणीय बनविला तो संजय गोगटे (हार्मोनियम), चारूशीला गोसावी (व्हायोलिन), प्रसाद भावे (तालवाद्य), अमीत अत्रे (टाळ) आणि विनित तिकोनकर( तबला) अविनाश तिकोनकर( पखवाज) या साथिदार कलावंतांनी.

आरंभी जय जय राम कृष्ण हरी चा गजर करून नंतर किर्तन परंपरेला साजेलसा जय जय कार करून विठ्ठल गीती गातीचा नाद रसिकांच्या नास्मरणात अळवून संतरचनांचा हा स्वरमेळा सुस्वर बनविला.

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Tuesday, July 12, 2011

योग्य गुरूकडून गाणं शिका-सानिया पाटणकर




सानिया, तुझ्या शास्त्रीय संगीताच्या प्रवासाबद्दल


- घरात सगळ्यांनाच संगीताची आवड होती. त्याचप्रमाणे मलाही शास्त्रीय संगीताची आवड होती. आताही मी या क्षेत्रात कार्यरत आहे. खरं तर, वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच मी संगीत शिकतेय. मी संगीताचं प्राथमिक शिक्षण लीलाताई घारपुरे यांच्याकडे घेतले. त्यानंतर मी डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे तेरा वर्षं संगीताचे धडे घेतले. मी परदेशात जाऊन शास्त्रीय संगीताच्या अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. सध्या मी डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतेय.

शास्त्रीय संगीतामधल्या अनेक प्रकारांपैकी तू कुठले संगीत प्रकार सादर करतेस?


- मी माझ्या मैफलींमध्ये ठराविक प्रकार सादर न करता, शास्त्रीय संगीताचे विविध प्रकार सादर करते. त्यामध्ये मग ख्याल, ठुमरी, दादरा, गझल, नाट्यगीत, टप्पा, तराणा यांचा समावेश आहे. या प्रकारांबरोबरच मी काही प्रमाणात अभंग, भक्तीगीतं व भावगीतंदेखील गाते. थीमवर आधारित काही कार्यक्रम आम्ही बरेच वेळा सादर करतो. त्यात वर्षाऋतू, कृष्णलीला आदी कल्पनांवर आधारित कार्यक्रमही सादर केले आहेत.

आतापर्यंत तुझे कोणते अल्बम प्रकाशित झाले आहेत? कोणते पुरस्कार मिळाले आहेत?

- शास्त्रीय संगीतावरच आधारीत "अनुभूती' या अल्बमचे दोन भाग, बंदिशींवर आधारीत "रागरसनांजली' आणि नुकताच प्रसिद्ध झालेला "रसिया' असे अनेक अल्बम मी केलेत. पुरस्कारांबाबत सांगायचं झालं, तर मला पं. जसराज ट्रस्टचा "पैंगणकर पुरस्कार', "राजीव गांधी पुरस्कार', "सूरमणी पुरस्कार' आदी पुरस्कार आतापर्यंत मिळालेत.

शास्त्रीय संगीतामध्ये शब्दाला असलेल्या महत्त्वाबद्दल तू काय सांगशील?

- स्वर हा शास्त्रीय संगीताचा पाया आहे; पण त्यामध्ये शब्दांनाही तितकंच महत्त्व असतं. आकार, उकार आणि इकार शब्दांशिवाय येणं शक्‍यच नाही. अर्थ असलेलं काव्यच योग्य प्रकारे फुलू शकतं, असं मला वाटतं. बंदिशींमध्ये तर शब्दाला फार महत्व असतं.

शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी तू कुठले प्रयत्न करते आहेस?

- वर्कशॉप्स, ऑनलाइन टीचिंग, लेक्‍चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन्स यावर मी सगळ्यांत जास्त भर देते. युवा पिढीला आवडत असलेलं हिदी संगीत, त्यामध्ये वापरले गेलेले राग आणि कुठल्या रागावर आधारित हे गाणं आहे, हे मी सांगायचा प्रयत्न मी कायमच करते. फ्युजन आणि नृत्यप्रकारांमध्ये शास्त्रीय संगीताचा कसा उपयोग होतो, हे सांगण्याचाही मी प्रयत्न करते.

या क्षेत्राची आवड असलेल्या युवा पिढीला काय सांगशील?

- खूप मेहनत घ्या. दिग्गजांचे संगीत सतत ऐका. योग्य गुरूकडून गाणं शिका. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करा. कारण शास्त्रीय संगीत हा संगीताचा पाया आहे.

-स्वप्नील रास्ते
(swapnilraste@gmail.com)
http://72.78.249.107/esakal/20110712/5017117233068200285.htm

Sunday, July 10, 2011

जी ए जागविताना...

स्त्रीच्या विविध रूपांना जागविताना जीएंचे साहित्य आजही वेगळेपणाचे वाटते. स्त्रीच्या असाह्यतेचा. त्यांच्या सहनशक्तिचा सभोवतालच्या परिस्थतीचा आणि त्यांच्यातल्या भावनांचा खोलवर घेतलेला मागोवा वस्त्र या कथेच्या नाट्यवाचनाच्या माध्यमातून त्यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त पुण्यात घेतला गेला. अनुराधा जोशी, उत्तरा बावकर आणि गजानन परांजपे यांनी केल्ल्या अभिनाचनातून त्यांची व्यक्तिरेखा मांडण्याची रित आणि त्यातली वीण रसिकांसमोर उलगडली गेली.


आपल्या भावाच्या कौटुंबिक आठवणीतून नंदा पैठणकरांची जीएंचे खासगी रूप उलगडताना त्यांना अवडणा-या दडपे पोहे-खूप खोबरे घातलेले..पुरणपोळी कटाची आमटी...सारेच .

जीएंच्या कथेतल्या स्त्री व्यक्तिरेखांबाबत बोलताना डॉ.विणा देव यांनी त्यांच्यात असलेल्या विलक्षण निरीक्षण शक्तिचे आणि संवेदनाशिल मनाचे दर्शन कथेतल्या स्त्री पात्रांतून कसे पाझरत रहाते याचा उदाहारणासह खास उल्लेख करताना कथांचे दाखलेही दिले. समाज, परंपरेने स्त्रीच्या ठायी अनंक बंधने लादल्याचे आणि तिच्या वाट्याला आलेल्या भोगाचे कथेत केलेले वर्णन करताना वाचताना डोळ्यात अश्रु येतात..आपण त्या व्यक्तिरेखेबरोबर गुंतत जातो. तिच्या वेदनेत..भोगाचा एक भाग बनतो. त्यांच्या दुःखात सहजपणे विरघळून जातो.



आज त्यांच्या कथेत जी दुःखे स्त्री भोगत आहे त्याचे चित्रण आजच्या काळात थोडे परंपरावादी वाटते पण तिच्या कौटुंबिक बंधनात आजही फारसा फरक झाला नसल्याचे डॉ. विणा देव सांगतात.

कधीही समाजाला प्रत्यक्ष न दिसलेला पण आपल्या साहित्याने घरात आणि मनात पोचलेल्या
जीएंच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम नंदा पैठणकर गेला काही वर्षे सातत्याने करीत आहेत.
यंदा त्याच्या सोबत पुण्याची साहित्य परिषद सहभागी झाली. या निमित्ताने जीएंच्या साहित्याविषयीची चर्चा घडते . त्यावर विचार होतो. या सांस्कृतिक भूमित त्यांची आठवण होते.
जीएंच्या लेखणीचे मोठेपण ( जे अनेकांना ठाऊकही नाही) ठसविले जाते. हेच महत्वाचे .

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Mail- subhashinamdar@gmail.com

Wednesday, July 6, 2011

बेळगावचा नवा चेहरा सई लोकूर

प्लॅटफॉर्म

करियर संपवून निघालेल्या तरूणीला एका प्लॅटफॉर्मवर दोन मुलींना गाडीत सोडून निघालेले आई-वडिल दिसतात. मुली झाल्या म्हणून सोडलेल्या या दोघींचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय ती घेते. घरचा विरोध..म्हणून घरही सोडते...स्वतःचा स्वतंत्र प्रवास सुरू ठेऊन..त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी स्वतःचे करियर जिवन वेगळ्या मार्गाने नेणा-या या धेय्यवादी नायिकेने एका वेगळ्याच बाबीकडे चित्त वेधून घेतलेला हा चित्रपट.

एका अर्थाने मुलगी झाली म्हणून नाके मुरडणा-या..मुलींना फुटपाथवर, रस्त्यावर सोडणा-या या मुलींच्या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारा हा धाडसी चित्रपट घेऊन बेळगावच्या मराठी भाषिक विणा लोकूर यांनी या चित्रपटातून आपल्या मुलीला या चित्रपटात नायिका बनवून प्लॅटफॉर्म...मध्ये आणून सोडले आहे. आता तिचा पुढचा कलेचा प्रवास तिचा तिने करायचा असा संदेशही न सांगता दिला आहे.


गेली तिस वर्षे बेळगावात नाट्यक्षेत्रात कार्य करणा-या विणा लोकूर यांनी मिशन चॅम्पियन नंतर हा आणखी एक चित्रपट कानडी प्रांतातून मराठी भाषिकांसाठी तयार केला आहे. या चित्रपटातून त्या कथा, संवाद आणि दिग्दर्शनाच्या तिनही मुख्य गोष्टी स्वतः करून ह्या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. (यात त्यांच्या जोडीला अरिफ वडगामाही आहेत) हिंदीत जसे नट, दिग्दर्शक आपल्या मुलांना संधी देतात त्याप्रमाणे मुलगी सई लोकूर हिच्या साठी यातून लॉन्च केले .
सई आता झीवर निवेदनही करते. शिवाय पारंबी आणि आम्ही तुमचे बाजीराव या चित्रपटात भूमिका करून अभिनयाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द करण्यासाठी आता सिध्द झाली आहे. प्लॅटफॉर्म ही त्याची सुरवात आहे..नव्हे हे पहिले पाऊल आहे...आईनेच धाडसाने पुढे हाउन टाकायला लावलेले.
शिवानी देशमुखच्या आयुष्यातल्या या खडतर प्रवासाचे साक्षिदार आहेत..नायक तथा खलनायक अस्ताद काळे, सोबत आहेत मोहन जोशी, शरद पोंक्षे, प्रशांत पाटील, वीणा लाकूर आणि अक्षता आळतेकर, रविना पाटील हे दोन बालकलाकार.
छायाचित्रण सुरेश देशमाने यांचे असून..अश्विनी शेंडेयांच्या गीतांना निलेश मोहरीर यांनी संगीत दिले आहे.
१५ जुलैपासून तो पुण्यात आणि मुंबईत एकाच वेळी प्रदर्शीत होत आहे...
पाहू या तो नक्की प्लॅटफॉर्म..वर आलाय की ट्रॅकच्या बाहेर जावून ऑफबिट बनलाय...



सुभाष इनामदार, पुणे

Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com

Tuesday, July 5, 2011

'गुरु वंदना'

पुणे मराठी ग्रंथालयाच्या शताब्दी निमित्त श्री संत दर्शन मंडळ निर्मित 'गुरु वंदना' कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आलं होतं. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या तसंच स्वरबद्ध केलेल्या रचना या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.
प्रारंभी सुधीर मोघे यांची राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली 'हे नायका जगदीश्वरा'-पुणे आकाशवाणी साठी ध्वनिमुद्रित रचना श्रीपाद भावे यांनी सादर केली.
गोपालकृष्ण भोबे यांच्या 'धन्य ते गायनी कळा' या नाटकाचं संगीत दिग्दर्शन भीमसेनजींनी केले आहे, या नाटकातील 'दान करी रे गुरुधन' आणि कलाश्री रागातील 'धन धन भाग सुहाग' या रचना संपदा थिटे यांनी तर 'हे करुणाकरा' हे गीत श्रीपाद भावे यांनी सादर केले.
श्री राजेश दातार यांनी 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा (समर्थ रामदास),'रम्य ही स्वर्गाहून लंका' जयश्री कुलकर्णी यांनी 'नामाचा गजर'(संत नामदेव महाराज) आणि श्रीपाद भावे यांच्या सह 'बाजे रे मुरलिया बाजे' (पंडित नरेंद्र शर्मा), अविनाश लेले यांनी 'रसिका गाऊ कोणते गीत'(पतिव्रता), 'काया नही तेरी'(संत कबीर), भीमसेनजींचे सुपुत्र श्री. आनंद भीमसेन जोशी यांनी 'श्रीनिकेतना'( जगन्नाथ दास यांची कन्नड रचना), 'सून सून जाओ जी' (संत कबीर),
तर श्री संत दर्शन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीराम साठे यांनी 'मन हे राम रंगी रंगले' (नाटक तुलसीदास ) या रचना सादर केल्या. विजय दास्ताने (तबला), जयंत साने (हार्मोनियम),

राजीव माचीकर आणि प्रसाद भावे (ताल वाद्ये), चारुशीला गोसावी (व्हायोलीन) यांनी साथसंगत केली. निवेदन मंगेश वाघमारे यांनी केलं.

Sunday, July 3, 2011

अस्सं सासर सुरेख बाई...

महिन्याभरात श्रावण येईल. मुली, महिला आणि नव्याने लग्न झालेल्या नवरीकडे मंगळागौर पूजली जाईल. आणि त्यातल्या भोंडल्यात हे नक्की म्हटले जाईल..


अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोंनी मारीतं....
ऐकायला या भोंडल्याच्या ओळी चांगल्या वाटतात. भोंडला म्हणणा-या मुली हासून वेळ मारून नेतात.. पण मला मात्र सासरचा अनुभव अतिशय चांगला मिळाला . म्हणूनच तो शब्दात मांडायचा हा प्रयत्न केला आहे.
मुलगी सासरी आली की, ती सतत ताणतणावाखाली. घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली . मान खाली घालून वावरत असे..पण मला मात्र सासरी आल्यानंतर माहेरची आठवणही होऊ नये इतके प्रेमळ सासू-सास-यांकडून लाभले. आणि मी सतत अस्सं सासर सुरेख बाई ..म्हणत त्या घरात रममाण झाले. माहेरून व्हायोलिन वादनाच्या कलेचे रोप घेऊन आले आणि सासरी त्याचा वटवृक्षात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये..
मुलगी सासरी आली की, त्या घरातल्या रीतीभाती समजून घेऊन, घरातल्या माणसांचे स्वभाव ओळखून त्या घराला समजून घेत हळूहळू त्या घरात रुळते. मी माझी कला घेऊन त्या घरात आले. आणि सर्वांना कलाकार सून मिळाली म्हणून खूप आनंद झाला.
तुम्हाला सागते..माझ्या यजमानांनी तर मला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूनच पसंत केले. मग काय कलाकार बायको मिळल्याच्या त्यांना केवढा अभिमान. तो आजही आहे. ते तर सतत माझ्या पाठीमागे खंबीर उभे असतात. माझे दीर, जाऊ, नणंदा या सर्वांनाही माझ्या कलेचे काय कौतूक केले . ते सारेच माझ्या कलेला नेहमीच देतात आजही...
आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजावून घेऊन, सर्वांच्या आवडी-निवडी जपून सगळे सण, समारंभ, वाढदिवस खूप छान त-हेने साजरे करतो. सासू-सासरे जुन्या वळणाचे असल्यामुळे सुरवातीला थोडे मतभेद झाले. वादही झडले. पण आम्ही आणि त्यांनी दोघांनीही काही गोष्टींशी तडजोड करून त्यातून सुवर्णमध्य काढून पुढे गेलो. कोणत्याही गोष्टी जास्त विकोपाला जाणार नाहीत याची खबरदादारी घेतली. माझी थोरली जाऊ आणि मी तशा एकाच कार्यालयात . म्हणून का म्हणाना आमचे नाते बहिणीसारखे बनले. टिकले. वाढले. कायम राहिले.
माझा कुठेही कार्यक्रम असला तर ही सारी सासरची माणसे कौतूकाने आवर्जून हजर राहतात. दाद देतात. सारी मदत करतात.
आम्हा दोघी सुनांना सासूबाईंनी मुलाप्रमाणेच वागवले. आमच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. आमच्या मुलांनाही त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. त्यामुळेच तर आम्हाला नोकरीसाठी बाहेर पडताना कधीच मुलांची काळजी करावी लागली नाही. मुलांनाही आजी- आजोबांचे प्रेम भरपूर मिळाले. सहवास मिळाला. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले.
आजकाल ब-याच मुलींना एकत्र कुटुंब नको असते पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे मुलींनी नक्कीच पाहिले पाहेजेत.
अशा माझ्या प्रेमळ हौशी, संगीतप्रेमी सास-यांना नुकतीच ११ जूनला देवाज्ञा झाली..पण त्यांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील याची खात्री आहे.
असचं सासर सगळ्या मुलींना मिळावे. त्यांनी ते जपावे. वाढवावे. संस्कार हेच धन पुढच्या पुढीपर्यंत द्यावे यासाठी कसोशिने प्रयत्न करावा...
अखेरीस मी म्हणेन...अस्सं सासर सुरेख बाई...सर्वांना मिळावे.....




सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com

Saturday, July 2, 2011

विंचुरकर वाडा काळाच्या पडद्याआड


एकेकाळचे वैभव समजले जाणारे पुण्यातील वाडे एकापाठोपाठ अस्ताला जात असताना त्यामध्ये
आता विंचुरकर वाड्याचीही भर पडणार आहे.
मोडकळीला आलेला हा वाडा ही पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची गंगोत्री असली तरीही काळानुसार राहण्यासाठी ही वास्तू आता पाडली जाणार आहे.
इतिहासाचा मोठा वारसा सांगणाऱ्या या वास्तूतून भविष्यामध्ये हा वारसा जपला जाणार का हाच प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.


लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला, ती सरदार विंचूरकर वाड्याची वास्तू
बिल्डरला विकण्यात आली आहे. सदाशिव पेठेत सरदार विंचूरकर यांचा पेशवेकालीन वाडा
अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार आहे. लोकमान्य टिळक यांचे काही काळ येथे वास्तव्य होते. तसेच 'केसरी'चे कार्यालयही येथेच होते आणि लोकमान्यांनी 'केसरी'तील अनेक अग्रलेख
याच वास्तूमध्ये लिहिले.
लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद या युगपुरुषांची ऐतिहासिक भेटही याच वाड्यात झाली होती.
येथील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात लोकांना प्रेरणा देण्यासाठी
लोकमान्य टिळक यांनी याच वाड्यात गणेशोत्सवास प्रारंभ केला.
आजही लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्टच्या (सरदार विंचूरकर वाडा) वतीने येथे
गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
दोन महिन्यांपूवीर्च या वाड्याचे मालक कृष्णकुमार दाणी यांनी ही वास्तू परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शनला
विकली आहे. वास्तूचा पुनर्विकास होताना हे स्मारक काळाच्या पडद्याआड जाऊ नये,
अशी अपेक्षा ट्रस्टचे खजिनदार रवींद पठारे, तसेच विश्वस्त जयंत मठकर आणि शीला घैसास
यांनी व्यक्त केली. या वाड्याच्या स्मृती जतन कराव्यात आणि भव्य स्मारक उभारावे,
अशी मागणी त्यांनी केली आहे.

या ऐतिहासिक वास्तूचा संरक्षित स्मारकांच्या यादीत (हेरिटेज) समावेश करावा,
असा प्रस्ताव पुढे आला.
सध्या महापालिकेकडून ऐतिहासिक वास्तूंची यादी अपडेट करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये
विंचूरकर वाड्याचा समावेश करण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.
लोकमान्य टिळकांशी संबंधित असलेल्या पूवीर्च्या गायकवाड वाड्याचा
म्हणजे आताच्या टिळक वाड्याचाही या पूवीर्च पुर्नविकास करण्यात आला आहे.

विंचूरकर वाडाही त्याच मार्गाने जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकमान्य टिळक यांच्यावर आमची पिढ्यानपिढ्या भक्ती असून या वाड्याचे
ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन लोकमान्यांच्या कार्याला साजेसे स्मारक येथे उभारण्यात येईल,
असे परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शनचे एमडी शशांक परांजपे यांनी स्पष्ट केले.
सध्या या वाड्याचा ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समावेश नाही.
तसेच त्या वास्तूची पडझड आणि दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे तेथे डागडुजी करून ऐतिहासिक स्मृती जतन करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9056089.cms