subhash inamdar

subhash inamdar

Thursday, November 10, 2011

जगण्यासाठीची धडपड –पाऊलवाट

सांगलीच्या अनंत देव या गायकाची ही कथा. संगीत हा या चित्रपटाचा आत्मा. वेगळ्याप्रकारची आणि विविधतेने संगीताच्या बाजानी नटविलेली गाणी..हे या चित्रपटाचे वेगळेपण. चित्रपटात ६ गाणी आहेत. नरेंद्र भिडेंसह सात मराठी तरुणांनी एकत्र येवून केलेली ही निर्मिती. नरेंद्र भिडेयांच्या सांगण्यानुसार आशा भोसलें यांच्या गाण्यांच्या वेळी ते स्वतः भारावून गेले होते. यातल्या शेवटच्या कडव्याची ओळ गाताना आशाताईंच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहिले आहे.

दीड वर्ष लागले ही पाऊलवाट पूर्ण व्हायला. पण मराठी रसिकांची दाद नक्की मिलेल अशी आशा सारेच तंत्रज्ञ, कलावंत आणि चित्रपटासाठी आपलेपणाने झटणारे सर्वच करीत आहेत.

पाऊलवाटच्या पत्रकार परिषेदेत सुबोध भावे, ज्योती चांदेकर, मधुरा वेलणकर, किशोर कदम, हषीकेश जोशी, आनंद इंगळे सारेच उपस्थित होते.

आदित्य इंगळे यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट.

नरेंद्र भिडे यांच्या मते ह्षीकेश मुखर्जी आणि राजा परांजपे यांच्या पठडीतला वाटावा असा चित्रपट आदित्य इंगळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून साकारला आहे.




आपली वेगळी भूमिका या चित्रपटात आहे, हे सांगताना ...हा आपल्या आयुष्यातला स्ट्रगलचाच हा भाग आहे असे ज्योती चांदेकर बोलून गेल्या. पुण्यातून मुंबईकडे जाणारा हा प्रवास चार तासांचा..पण मला माझ्या आयुष्यात तो करायला तब्बल ४० वर्षे लागली....ही खंत त्या व्यक्त करतात. त्यातला अर्थ जाणकार नक्कीच ओळखू शकतील.

हा चित्रपट म्हणजे कलेसाठी जगण्याचा मार्ग दाखवितो असे मधुरा वेलणकर सांगतात. सुबोध भावे यांनाही हा आपलाच प्रवास वाटतो.. कलाकारांच्या स्ट्रगलचे हे चित्रण पुष्पांग गावडे यांनी केले आहे. सींमा देव यांनी सारंगीया उस्मान खॉं यांच्या पत्नीचा छोटा रोल केला आहे. तो सारंगीया झालाय किशोर कदम. त्यांना सीमा देव यांच्यासोबत काम करण्याचा वेगळा अनुभव गाठीशी आलाय.


अभिराम भडकमकरांची कथा असून त्यांचा पटकथा व संवादातही सहभाग आहे. वैभव जोशी या कवीच्या विविध कविता वेगवेगळ्या मूडमधल्या या चित्रपटात ऐकायला मिळणार आहेत.

१८ नोव्हेंबरला पुण्यासह मुंबई, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक इथं १७२ चित्रपटगृहात एकाचवेळी प्रदर्शत होतो आहे.. प्रतिक्षा आहे. या मनोरंजनाच्या बाजारु जगात पाऊलवाट...स्वतःचे स्थान कसे निर्माण करते ते.


सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276



Narendra Bhide

'Music is life' for Narendra Sadashiv Bhide (Creative Director, DSPL), one of the paramount contemporary music directors in the Marathi Film, Tele and Theatre Industry. His Civil Engineering degree has nothing to do with his profession as he has composed and arranged music for numerous films, serials and plays in his career.



Narendra comes from a family of great repute in Pune.

Narendra Bhide
Creative Director,
DAWn Studios Pvt Ltd.

His father, Shri. S.D. Bhide is a renowned teacher and was instrumental in setting up the Karve Stree Shikshan Sansthas' Cummins Engineering College .

Narendra's mother comes from a family, which has made a solid mark in the world of Marathi Theatre. Celebrated actor and director, Shri. Chintamanrao Kolhatkar is Narendra's great grandfather. Distinguished playwright Shri. Bal Kolhatkar and noted actor Shri. Chittaranjan Kolhatkar are his grandfathers. Eminent director and actor Shri. Dilip Kolhatkar is his uncle (Mama). Narendra's elder brother, Mohan lives in Vancouver , Canada and is an excellent classical harmonium player. He is a software engineer by profession and accompanies stalwarts like Pt. Jasraj, Sanjeev Abhyankar, Upendra Bhat, and many others when they tour the US and Canada. It is this traditionally strong institution which has infused talent and nurtured the art of music in Narendra.

Such a strong family structure can only be countered by Narendra's other half, Mukta Narendra Bhide (Managing Director, DSPL). Her great grandfather, Shri. Purshottamshastri Nanal was a leading Vaidya in Pune. The tradition of Ayurved runs in the Nanal family from the days of early Peshwai. Her grandfather, Shri. Madhuanna Nanal too was an esteemed name in the Indian medical field. Her father, Shri. Ramesh Nanal and uncle, Shri. Vilas Nanal are walking on similar paths and are considered to be extremely talented in the world of Ayurved.

Mukta's mother, Smt. Madhavi Nanal is a well known singer mainly of the Gwalior Gharana of Hindustani Classical Music. She has won the coveted Sur Singar Parishad's Soormani Award. She is extremely engrossed in the activities of the Sangeet Shikshak Sangh. She is the founder of Madahavi Prakashan, a publication dedicated to Classical Music and Ayurved. Narendra is an accomplished man in both Hindustani and Western classical music. He started learning Harmonium from Shri Balasaheb Mate at an early age. He sat at the feet of prima donnas such as Ustaad Mohammad Hussein Khan, Shri Sudhir Datar, Sou. Shaila Datar and Shri Suhas Datar and mastered Hindustani Classical vocals. He got his training in Western Classical Music from Shri Hemant Godbole. He had an opportunity to get valuable guidance from noted Indian Classical vocalist and a reputed name on Marathi theatre Swararaj Chhota Gandharva. Since then, Narendra is on his musical journey as a composer, music arranger and the Creative Director of 'Dawn Studios Pvt. Ltd.', a studio based in Pune. He is also an 'Approved Composer' for All India Radio.

A person who pays his dues certainly gets rewarded in life. Similarly, Narendra has won several accolades and awards for his work including the esteemed Ashtapailu Sangeetkar Puraskar (2000-01) by Akhil Bharatiya Sugam Sangit Sammelan, Ma Ta Sanman and Zee Gaurav Puraskars for the music of Makdachya Hati Champagne and another Zee Gaurav for the 2008 play 'Khelimeli'. And after all this, he definitely still has a long way to go through the rhythmic paths in life; on and on and on…

Apart from his love of music, Narendra enjoys travelling and is an avid reader. He is a keen lover of Marathi literature and poetry as well. He has composed many poems of Kusumagraj, Ba Bha Borkar, Govindagraj, Anil, Na Gha Deshpande, Grace, Shantabai Shelke, Na Dho Mahanor, Sudheer Moghe, Aruna Dhere and many others.These compositions are included in a show called Shrutichitre which is well appreciated in Pune and Mumbai. A concert of his compositions was recently telecast on a well known Marathi TV Channel 'Saam TV'
Awards & Achievements

- ‘Ashtapailu Sangeetkar’ Puraskar - 2000-01
By Akhil Bharatiya Marathi Sugam Sangeet Sammelan
- ‘Keshavrao Bhole’ Puraskar by Swaranand Pratishthan.
- ‘Zee Gaurav’ Puraskar -2007
(Best Music for the play ‘Maakadachya Hati Champagne’)
- ‘Ma–Ta Sanman’ - 2007
(Best Music for the play ‘Maakadachya Hati Champagne’)
- 'Shrikant Thakray' Puraskar
by ‘Kalarang’, Pimpri-Chinchwad.
- Best Music Award in ‘Madrid Film Festival’–2007
in all categories, for the film ‘Bayo’.
- ‘Zee Gaurav’ Puraskar -2008
(Best Music for the play ‘Khelimeli’)
- ‘Yatna’ Puraskar, by ‘Smruti Gandh’ Pune

Wednesday, November 9, 2011

“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी”


“तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” याची पहिली प्रत माझ्या हातात पडली आणि गेले काही दिवस हे लेखांचे संकलन झपाटल्यासारखे वाचून काढले. जयवंत दळवी, अरूण टिकेकर, श्री. पु. भागवत, वसंत बापट, शांताबाई शेळके, भारतरत्न भीमसेन जोशी किती म्हणून नावे घ्यायची? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व विंदा तर समीक्षानिपुण नाडकर्णी व कुळकर्णी अशा अनेक मनसबदारांची ही मांदियाळी आहे.

पु.लं.च्या पुस्तकांशी माझे नाते मॉडर्न हायस्कूलच्या खाकी हाफ पॅंटमध्ये असताना गुंफले गेले आहे. कोकणची पहिली ओळख अंतू बर्वेतून मला झाली. चितळे मास्तरांसारखे शिकवण्याचे वेड असणारे मास्तर आमच्याही शालेय जीवनात आम्हाला लाभलेले आहेत. टापटीप आणि मुंबईची शान म्हणजे काय मला नंदा प्रधानमुळे समजले. सोकाजी त्रिलोकीकर “ ए साला, कोचरेकर तू तो एकदम इडियट आहे रे”. यांच्यातून मला पारसी समाजाची पडछाया जाणवली .
बबडू व मुंबईंचे नाके यांचे अतूट नाते समीकरण पुण्यात राहून मला पु. लं. मुळे समजले. पुलंनी आमचे बालपण ख-या अर्थाने श्रीमंत केले.

मला माझे पुण्यातले लहानपण आठवते. त्या वेगवेगळ्या आंतरशालेय वक्तृत्वस्पर्धा, रानडे वक्तृत्वस्पर्धा, नगरची हिवाळे स्पर्धा अशा विविध भाषणबाजीच्या व्यासपीठावरुन पुलंच्या व तात्कालीन साहित्यिकांच्या दाखल्यामधून आम्ही मुलांनी वक्तृत्वाची मूळाक्षरे गिरवली आहेत. पण प्रतिभावान लेखक, भावनासमृध्द कवी अशा छापील खिळ्यांमधून व ठश्यांमधून पुलंची मुद्रित ओळख होऊच शकत नाही.



ते रंगमंचावर आले व नुसते उभे जरी राहिले तरी हास्याची लकेर पसरत असे. का कोण जाणे मला तर ते साक्षात श्री गणेशाचे रुपच दिसत असे.थोडेसे पुढे आलेले सशासारखे दोन दात, लुकलुकणारे बुध्दिमान असे डोळे. हे पाहिल्यावर हा माणूस जीवनाकडे व चराचर जीवांच्या अस्तित्वाकडे किती विलक्षण दृष्टीने पाहात होता याची साक्ष पटते. नेमकी शब्दयोजना, तीही नेमक्या वेळेस करणे हे कुशल लेखकाचे प्रमुख असे अस्त्र आहे. पु.लंचा भाता अशा अनेक दिव्य अस्त्रांनी सदा संपन्न होता. चितळे मास्तरांच्या आर्थिक विपन्नवस्थेचे वर्णन करताना, “ मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात कधी मोत्ये पडली नाहीत, पण डोळ्यात पडली”,..पुल सहज लिहून जात.

पुलंचे लिखाण ६०-८०च्या दशकांत घरा-घरात नव्हे तर मराठी मना-मनात पोहोचले याला कारण त्याची बैठक सच्चा, मध्यमवर्गातील जीवनमूल्यांवर आधारलेली होती. फ्लॅट सांस्कृतीचा उदय होत होता आणि मानवी वस्तीचा भूगोल जरी अपार्टमेंटमध्ये बंदिस्त होत असला तरी माणुसकीच्या मनाचा इतिहास मात्र चाळीतच अडकला होता. ते प्रेम, सौदार्ह, बंधुभाव पुलंनी अजरामर केले.

त्यांचा विनोद मर्मबध्द असायचा. त्या केवळ शाब्दिक कोट्या नव्हत्या. आजच्या दूरदर्शनवरच्या विनोदाचे दुर्दैवी दशावतार त्यांच्या साहित्यात कधीच दिसले नाहीत. त्या विनोदाला कारुण्याची झालर होती, उच्छृंखलतेची झूल पुलंनी कधीच पांघरली नाही.. काव्य, रसग्रहण, नाटक, चरित्र, व्यकितचित्रण... पारिजातकाचा सडा पडावा अन् नेमके कुठले फूल उचलावे याचा संभ्रम पडावा अशी अवस्था होती. पुणे-ते-मुंबई यापलिकडे जग न पाहिलेल्या आमच्या विश्वाला पुलंमुळे लंडन कळाले. अपूर्वाई, पूर्वरंग, निळाई या सा-या निर्मितींनी आम्हाला परदेशाची चटक लावली.



त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी त्यांना एक पत्र पाठविले होते. कालांतराने त्या पत्राचे टंकलिखित पोस्टकार्ड रुपाने उत्तर प्राप्त झाले. पत्राच्या अखेरीस पुलंनी स्वतःच्या हस्ताक्षरात “ उत्तम डॉक्टर हो हीच श्रीचरणी प्रार्थना”, असा आशिर्वाद दिला होता. गेल्या २५ वर्षात मुंबईत सार्वजनिक रुग्णसेवेतर्फे जे काही कमावले त्याच्या मूळाशी पुलंचा हा आशिर्वादच आहे अशी माझी श्रध्दा आहे.

देवाघरच्या या दूताने दोन्ही हातानी मराठी शारदेच्या ओंजळीत मौक्तिकमणी घातले. “घेता किती घेशील दोन कराने” अशी आम्हा वाचकांची अवस्था करणारा हा अवलिया साहित्य दरबारातला सम्राट होता.

परचुरे प्रराशनाने संकलित व संपादित केलेल्या या पुस्तकामुळे आम्हाला केवळ पुलच नव्हे तर, आज हयात नसलेले अनेक श्रेष्ठ नाटककार, लेखक, कवी भेटले व खरोखर “तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी” ही श्री चरणी प्रार्थना करावी असे मनापासून वाटते.

जोपर्यंत मराठी घरात मराठी वाचले जाते, संग्रह केला जातो, तोपर्यंत “ पु.ल. एक साठवण “ नंतर एक दुसरीही आठवण म्हणून हे पुस्तक संग्रही असणे आवश्यक आहे.


डॉ. संजय ओक
(“मला काही सांगायचय्” चे लेखक)


पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुण्यात परचुरे प्रकाशनने ८ नोव्हेंबर २०११ ला समारंभपूर्क तीन पुस्तकांची प्रकाशने कवीवर्य मंगेश पांडगावकरांच्या हस्ते केली. त्यात मला काही सांगायचय या पुस्तकाताही समावेश होता. या निमित्ताने डॉ. संजय ओक यांनी केलेल्या भाषणातील मनोगतातून..साभार...

Saturday, November 5, 2011

राजनभैय्या ६०

`गुरुकी कृपासे शब्द आ रहे है, तो वो उन्हीको अर्पित करना चाहिए`- या भावनेनं, स्वतः तरुणवयात रचलेल्या बंदिशींमध्ये आपले गुरू गायनाचार्य पं. बडे रामदासजी यांचे नाव गुंफणारे...पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांनी २८ आक्टोबरला एकसष्ट वर्षात पदार्पण केले.. या निमित्त रविवारी पुण्यात त्यांचा अनेक संस्थांच्या वतीने जाहिर सत्कार समारंभ झाला...त्यानिमित्ताने लेख..


अमानतअलि-फतेअलि, सलामत-नजाकतअलि, लताफत-शराफत हुसेन अशा सहगायकांच्या नामांकित व्दयी शास्त्रीय संगीतात होऊन गेल्या. एकेकाळी बनारस घराण्यातही अमरनाथ-पशुपतीनाथ ही व्दयी सहगायनासाठी प्रसिध्द होती. नंतरच्या काळात बनारस घराण्यानं ठुमरी- कजरीचं गाणं इतकं समृध्द केलं की त्या घराण्याची ख्याल गायनाची महान परंपरा कमी होते आहे की काय असं वाटू लागलं. त्याचवेळी पं. राजन व पं. साजन मिश्रा या बंधुव्दयानं ती महान गायकी आपल्या समर्थ खांद्यावर घेतली आणि सर्वार्थानं ती पुढं नेली. मातृ-पितृ दोन्हीही घराण्याच्या रक्तातून आलेला संगीताचा वारसा त्यांना दुसरं काही करुन देणारच नव्हता.

पं. सामताप्रसाद, पं. किशनमहाराजजी, आजोबा बडे रामदासजी, काका सारंगीस्रमाट पं, गोपाल मिश्रा, वडिल पं. हुनुमानप्रसाद मिश्रा अशा थोर गुरूंकडून राजन-साजन या बंधुंकडे संगीत विद्या आली आणि कठोर लगन आणि मेहनतीनं त्यांनी ती आत्मसात केली.


भारतरत्न पं. भीमसेनजींना पं. गोपाल मिश्रा सारंगीची साथ करीत. भीमसेनजींचा मुक्कामही बनारसला त्यांचेच घरी असायचा. त्याचवेळी गुरुंच्या सेवेप्रमाणे राजनभैय्या भीमसेनजींची सेवा करीत..अगदी पाय चेपून देण्यापर्यंत... साधारण १९७५ साली भीमसेनजींनी रेडिओवर मिश्राबंधुंचं गाणं ऐकलं आणि पं. गिरिजादेवींकडे ही कोण मुलं गाताहेत याची चौकशी केली. ते दोघे पं. गोपाल मिश्रांचे पुतणेच आहेत हे कळल्यावर त्याच वर्षी पुण्याच्या `सवाई-गंधर्व महोत्सवात` राजन-साजन मिश्रांचे सहगायन ठेवलं. त्यावेळी स्वतः भीमसेनजींनी मागे बसून तानपुरे जुळवून दिले....ही घटना सांगताना दोन्ही भावांचे डोळे पाणावले नवाहीत तरच नवल. पुढे या व्दयींचं गाणे पुण्यात असल्यावर काळी दोनची तानपु-याची जोडी भीमसेनजींकडून जात असे.

राजन-साजन मित्र परिवारात अफाट आणि समाजाच्या सगळ्या थरातील व्यक्ति आहेत....आमचा त्यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांच्या उमद्या स्वभावामुळे...त्याचं मैत्रीत कधी रुपांतर झालं व त्यांच्यामधल्या पद्मभूषण. पंडित अशा अनेक बिरुदावल्यांचा दबदबा कधी गळून पडला हे कळलचं नाही. आमच्यासाठी ते फक्त राजनभैय्या- साजनभैय्या होऊन गेले.
गेल्या सवाई-गंधर्व महोत्सवात,,रिहर्सलमध्ये पं. राजन-साजन बिभासचे स्वर आळवीत असताना, एक बाई बरीच मिनतवारी करून आत आल्या व त्यांनी पंडितजींना ..` मी इंदौरहून मुद्दाम आले आहे. २५ वर्षापूर्वी इंदौरला ऐकलेला तोडी परत ऐकण्याची इच्छा आहे`, अशी विनंती केली. त्यांच्या रसिकतेचा मान ठेबून दोघांनी ऐनवेळी अप्रतिम असा गुजरी तोडी सादर केला.

गेल्याच वर्षी कोल्हापूरला देवल क्लबच्या `अल्लादियॉ` संगीत महोत्सवात` राजन-साजनजींचं गाणं होतं. धुक्यामुळे पुण्यात सकाळी ११ ला पोचणारी फ्लाईट संध्याकाळी साडेपाचला आली. माझ्या गाडीतून आम्ही तडक कोल्हापूरला निघालो. तरी पोचायला ९ वाजले. तोपर्यंत सोलो तबलावादन करुन अरविंदकुमार आझादजी यांनी खिंड लढविली होती. पण १० वाजता कार्यक्रम बंद करण्याचा निर्बंध असल्यामुळे रसिकांची निराशा होणार होती. राजन-साजन भैय्यांनी स्वरमंचावर जावून उशीर झाल्याबद्दल संयोजक व रसिकांची माफी मागितली आणि दुस-या दिवशी संपूर्ण वेळ कार्यक्रम करण्याचं कबूल केलं. दुस-या दिवशी त्यांनी सादर केलेल्या `जोगकंस`ने तुडूंब भरलेल्या श्रोतृवर्गाचे डोळे वारंवार पाणावत होते. आजही रसिक त्या मैफलीची आठवण काढतात.

राजन-साजन हे पराकोटीचे अव्दैत आहे हे त्यांचं गाणं ऐकताना तर जाणवतंच पण त्यांच्याबरोबरच्या प्रवासात, गप्पांमध्ये त्याचा प्रत्यय येतो. कोणतीही गहन चर्चा असो की विनोद ही बंधुव्दयी त्यात रंगून जाते आणि तीही मैफल रंगवून टाकते. `सूरसंगम`या चित्रपटासाठी `धन्य भाग्य सेवा का अवसर पाया` हे गाणं फक्त राजनभैय्यांना गायलं आहे..श्रेयनामावलीत आग्रहानं राजन-साजन मिश्रा असं नमूद करण्यास भागं पाडलं आहे..हेच ते अव्दैत.
गेली ५० वर्ष हे बंधू सहगायनच करत आहेत. अनेकदा मनात योजलेला राग बाजूला ठेऊन रसिकांनी फर्माईश केलेला राग ते गातात आणि..” आम्ही गात नाही तर आमचे गुरुजन व ईश्वर आमचा माध्यम म्हणून वापर करुन तो राग प्रगट करतात”..असं विनण्रतेनं सांगतात. गुरुकृपेमुळं राजनभैय्यांचे सुपूत्र रितेश व रजनीश हेही सहगायन करत आहेत.
अजूनही एकत्र कुटुंब व्यवस्थेवर विश्वास ठेवून, मुलांबाळांसह सर्व कुटुंब बनारसला एकत्र नांदते आहे. यात त्यांच्या पत्नींचीही त्यांना मोलाची साथ आहे. अजूनही आमची चूल एकत्रच आहे हे दोघेही अभिमानाने सांगतात.

संगीताप्रमाणे इतर बाबतीतही राजनभैय्या अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल या खेळांच्या आवडीप्रमाणे ( कॉलेजमध्ये ते क्रिकेटचे कप्तान होते ) जंगलात-निसर्गात मनमुराद भटकण्याची त्यांना आवड आहे. त्याविषयाचेही ज्ञान आहे. ओशांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

या सर्व गोष्टींनी प्रेरित होऊन मकरंद ब्रम्हे यांनी या बंधूंच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारित `अव्दैत- संगीत` ह्या ९० मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली आहे. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या डॉक्युमेंटरी भागाचे उद्घाटन याच लघुपटाने होणार आहे.

एकमेकांच्या घराण्याविषटी अत्यंत आदर बाळगणारे असे महान कलाकार पाहिले की, जाणवतं की विविध घराणी- विविध गायवप्रकार असोत पण त्यांना बांधून ठेवणारं भारतीय संगीत हेच मूळात एक `अव्दैत` आहे.
राजनभैय्या!( आणि साजनभैय्याही) तुमच्याकडून ही संगीतसेवा अशीच वर्षानुवर्षे घडत राहो...अनेक उत्तमोत्तम शिष्यही त्यातून तयार होवोत..आणि तुमच्यातले हे संगीत अव्दैत अखेरपर्यत अखंड राहो..हिच इच्छा.....

-विजय मागिकर, पुणे
मोबा- ०९४२३५७७७५३

Monday, October 31, 2011

काळाप्रमाणे घडणारी नवी पीढी

- निर्मला गोगटे
आपल्या वयाला २ नोव्हेंबर २०११ ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठी संगीत रंगभूमिवर स्वतःची स्वतंत्र छाप पाडणा-या.. संस्कृत नाटकापासून वयाच्या १६ व्या वर्षी `मृच्छकटिक` नाटकात काम करुन सुमारे ३५ वर्षे अनेक संगीत नाटकात भूमिका केलेल्या सौ. निर्मला गोगटे आपल्या कारकीर्दीविषयी भरभरुन बोलत होत्या..



“आजच्यासारखी परिस्थिती असती तर माझ्यातली कलाकार स्त्री कुठच्याकुठे पोचली असती...ज्या काळात मी काम करायला लागले तो काळ स्त्रीयांना मानसिक दडपणात ठेवणारा आणि समाजाचा दबाव असेलला होता. तरीही मला जेवढे शक्य झाले तेवढ्या प्रामाणिक पणाने मी संगीत रंगभूमिवर अपार मेहनत घेऊन भूमिका केल्या. आज मी त्याबद्दल काही अंशी का होईना समाधानी आहे.. मात्र नवी पीढी शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटविणारी आहे. हुशारही आहे. काळाप्रमाणे स्वतःला घडविणारी मेहनती आहे.”...


सी. आर. व्यास, व्ही. आर. आठवले, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, जगन्नाथबुवा पुरोहित, कृष्णराव चोणकर, राम मराठे अशा गुरुंकडून तालीम घेऊन स्वयंवर, सौभद्र, मानापमान, सत्याग्रही, संशयकल्लोळ, शारदा, विद्याहरण, एकच प्याला, मृच्छकटिक, सुंदरा मनामध्ये भरली आशा अनेक संगीत नाटकात नायिकेच्या रुबाबात दिसणा-या आणि तेवढ्याच जिद्दीने नाट्यसंगीताचा खजाना संगीत रसिकांसमोर सादर करणा-या या कलावंत... आजही तेवढ्यात डौलाने वावरताहेत. उत्तम कांती, तजेलदार आणि आनंदी चेहरा, स्वरांशी नाते कायम ठेवत रंगभूमिवरच्या नाटकांबाबतच्या साक्षीदार असलेल्या निर्मला ताई बोलत होत्या.

शास्त्रीय संगीताची बैठक पक्की करुन नाट्यसंगीतात स्वतःचे नाव कमावले. आणि आज स्वरांशी नाते घट्ट पकडून ठेवत सुमारे दहाएक शिष्यांना ही कला शिकविण्यासाठी तत्परतेने उभ्या असलेल्या सौ. निर्मलाताई गोगटे यांच्याशी बोलताना त्यांनी पाहिलेल्या संगीत रंगभूमीवरच्या अनुभवांचे नमुने ऐकत मीही त्यात रंगून गेलो.

वसंतराव देशपांडे, राम मराठे, सुरेश पळदणकर, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, मास्टर दामले, सरस्वतीबाई राणे, नानासाहेब फाटक, मा. द्त्ताराम, परशुराम सामंत अशी कित्येक दिग्गजांची नावे बोलण्याच्या ओघात ओठी येतात.


नानासाहेब फाटकांसारखा नट होणे नाही...सांगताना त्या म्हणतात `त्यांचे गद्य संवाद हे पद्यासारखे लयदार असत. काय त्यांचे वावरणे. संवादातली ताकद तर औरच`.

आजवर शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या. अगदी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या दर्दी श्रोत्यांची दाद मिळविली. नाट्यसंगीत गायले. मात्र नाव मिळाले ते संगीत रंगभूमिवरच्या कामामुळे. माहेरी वडील डो. बापट यांच्या पाठिंब्यामुळे आणि इकडे म.ना. गोगटे यांच्या संमतीमुळे.

सुमारे ६३ वर्षे मुंबईत वावरल्यानंतर गोगटे पती-पत्नींनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. नबी पेठेतल्या भारतरत्न कै. भीमसेन जोशी यांच्या घरामागच्या परिसरात ते आज दोघेही शांततामय सहजीवनाचा आनंद घेताहेत. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी मुंबईत संसारात रमली आहे. आता संगीत दान हेच धेय्य मनाशी ठरवून ठराविक निवडक साधकांना शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे शिक्षण देत आहेत. त्यांच्याकडे शिकणा-यांना अट एकच स्वर तंबो-यावर लावायचा. सुगम जरी गायचे तरी सूर तंबो-यावर जुळला पाहिजे. आजही कुणी नाटकात काम करायला सांगितले तरी सगळी संगीत नाटके पाठ असल्यामुळे तयारी आहे... सहजच त्या उद्गारतात..

पती इंजीनियर. आता रिटायर्ड जीवन जगताहेत. मराठी विज्ञान परिषदेचे काम करत कार्यरत आहे.
निर्मला ताई...कधी कधी काही कविता, लेख लिहितात. त्यातल्या कांहींचा लाभही तुम्हाला कधी मी देणार आहे. आज मात्र त्यांच्या या ओळींनी या लेखाची सांगता करु या.... आणि त्यांच्या यापुढल्या जीवनात त्यांच्यातल्या जिद्दीला दाद आणि मनात ठरविलेल्या कार्याची महत्वाकांक्षा कायम रहावी अशी नटेश्वरापाशी प्रार्थना....


गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276

कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते

"कशी जाऊ मी यमुना, अडवितो कान्हा' या गवळणीनंतर हौसाबाईंच्या "शहर बडोदे सोडून दिधले वर्षे झाली बारा' या पारंपरिक बैठकीच्या लावणीतून लोककलेच्या सम्राज्ञीचे सौंदर्य उलगडले.

लता मंगेशकर यांची गजल ऐकून हा गानप्रकार शिकण्याची मिळालेली प्रेरणा आणि एकेक शब्द वीस-वीस वेळा घोटून पाठांतर केल्यावर शिकलेली "राजाओं का राज न रहा, न सुलतानोंकी शान, माटी में मिल जाएगा एक दिन माटी का इन्सान', ही गजल त्यांनी सादर केली. "गेले पयल्यानंच मी नांदाया', "जीव लावून माया कशी तोडली, सांगा पुरुषाची रीत ही कुठली', "बोल कन्हैया का रुसला राधेवरी', ही गवळण त्यांनी गायली.

लावणीगायनाला उस्ताद अल्लारखॉं यांनी केलेली तबलासाथ, पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी झालेली मैफल, वैजयंतीमाला यांनी केलेले कौतुक या आठवणींना याप्रसंगी उजाळा मिळाला. घोटकर यांच्यासमवेत हौसाबाईंनी सादर केलेल्या तमाशातील "झगडा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "श्‍यामसुंदर मदनमोहन जागो मोरे लाला' या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

डोक्‍यावरून घेतलेला साडीचा पदर, कपाळावर बंद्या रुपयाएवढे कुंकू, अशा सोज्वळ पेहरावातील वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या हौसाबाईंनी खड्या आवाजातील बैठकीच्या लावण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलेच; पण साळंत चार बुकदेखील न शिकलेल्या हौसाबाईंनी केवळ पाठांतरातून जतन केलेल्या गजल आणि कव्वाली सादर करीत उर्दू भाषेचा लहेजा गायकीतून उलगडला.

एका अपघातात पाठीच्या मणक्‍याला झालेल्या दुखापतीनंतर चालणे बंद झालेल्या हौसाबाईंच्या औषधोपचारासाठी मोठा खर्च येत असल्याची माहिती दादा पासलकर यांनी दिली. मात्र, या प्रतिकूलतेवर मात करून "कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते', हेच हौसाबाईंनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. रसिकांनी स्वयंस्फूर्तीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेला 16 हजार रुपयांचा निधी त्यांना प्रदान करण्यात आला.

"भरत नाट्य संशोधन मंदिर'तर्फे "गुजरा हुआ जमाना' कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ तमाशा कलावंत हौसाबाई जावळकर यांच्या गायनाची मैफल आयोजित केली होती. शाहीर दादा पासलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि या कलावतीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश पडला. हौसाबाईंना सुधीर जावळकर यांनी हार्मोनिअमची, पांडुरंग घोटकर यांनी तबल्याची, जयराम जावळकर यांनी ढोलकीची त्याचप्रमाणे सुलक्षणा जावळकर, पद्मा जावळकर आणि बेबीताई कोल्हापूरकर यांनी सहगायनाची साथ केली.

Friday, October 28, 2011

पुणेकर न्हाले स्वरांच्या नादात

दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज या दिवशी पुणे शहरात अनेक ठिकाणी 'दिवाळी पहाट'चे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी झालेल्या संगीत, नृत्य यांच्या रंगारंग कार्यक्रमाला रसिकांनी अतिशय उत्साहाने प्रतिसाद देऊन ते संस्मरणीय केले.

'बाबूजी आणि मी'
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके व श्रीधर फडके या पितापुत्रांतील सांगीतिक प्रवास उलगडणारा 'बाबूजी आणि मी' हा आगळा कार्यक्रम 'रंगयात्रा'चे शिरीष कुलकर्णी यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी या दोघांच्या स्वररचना श्रीधर फडके आणि शिल्पा पुणतांबेकर यांनी सादर केल्या. त्यांना सचिन जांभेकर, केदार परांजपे आदींनी वाद्यांची साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

नवा सण नवा प्रकाश, नव्या या दिवशी उजळू दे आकाश, नवी चाहूल नवी आशा, प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा, असा शुभेच्छा संदेश पं. जसराज व माधुरी जसराज यांनी पुणेकरांना दिला.

'स्वरनूपुर'ला उत्साही प्रतिसाद
युवराज शहा, महावीर जैन विद्यालय आणि सॅटर्डे क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या 'स्वरनूपुर' या पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. गोवर्धन दूध यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.
स्वरनूपुरचे केतन गोडबोले, प्राची ओक यांनी गणेशवंदनेने कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर त्याची रंगत वाढतच गेली. त्याच्या मेणबत्ती नृत्याला सर्वांत जास्त प्रतिसाद मिळाला.

सारसबागेत नेत्रदीपक दीपप्रज्वलन

दिवाळीचा पाडवा आणि नववर्षानिमित्त सारसबागेत नागरिक, सारसबाग मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच विविध संघटना यांनी 'दीपोत्सव' साजरा केला. पहाटे ४पासून सारसबागेत हजारो नागरिक जमले होते. आकर्षक रांगोळ्या आणि आकाशकंदील यांमुळे हा परिसर उजळून निघाला. सारसबाग मित्र मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या 'दीपोत्सवा'चे हे १६वे वर्ष होते.
सचिन वठारे ग्रुप, वंदेमातरम कबड्डी संघ, कलाअकादमी ग्रीनरी सीकर्स, पुणे एव्हरेस्ट, विश्‍व प्रतिष्ठान, वुई फॉर एव्हरीवन या संघटनांतर्फे सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या.

हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजक अनिल गेलडा, सारसबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष अँड. एन. डी. पाटील, कार्यवाहक अँड. शिरीष शिंदे, राणी गावडे, माधवराव चिरमे, पल्लवी जाधव, कल्पना रावळ, पोपट ओस्तवाल, शिवाजीराव भागवत, दिलीप तातुसकर, नितीन काकडे, शिवाजीराव डावळकर, दिलीप रायसोनी, अजित लुणावत, सुलक्षणा नाईक यांनी प्रयत्न केले.

राणी लक्ष्मीबाई उद्यानात संगीत समारंभ

सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई उद्यानात 'दिवाळी पहाट' साजरी करण्यात आली. सुनीता गोकर्ण, श्रीकांत कुलकर्णी आणि नरेंद्र डोळे यांनी या वेळी सुरेल गाणी सादर केली. त्यांनी भाव-भक्तिगीते, भजने ते लावणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली. त्यांना रेवती समुद्र, अभिजित जायदे आदींनी वाद्यांची साथ केली. ज्योती घोडके यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, वा. हे. कुमठे, कैलासराव कोद्रे, महेश देशपांडे आदी उपस्थित होते.

अरण्येश्‍वर मंदिरात भावगीते

अरण्येश्‍वर मंदिराच्या परिसरात वॉर्ड ६७च्या वतीने भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर, सिंधूताई सपकाळ, उल्हास पवार, राजेंद्र ढुमे, अशोक तावरे, जांभोरकरगुरुजी यांच्या हस्ते महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी महिलांना साड्यावाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, मंजूषा गोडसे उपस्थित होत्या. नीला व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


कस्तुरी पायगुडेंचा 'दीपस्वर'

निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहातली 'सांस्कृतिक पुणे'च्या सुभाष इनामदार यांनी आयोजलेली 'दिवाळी पहाट' कस्तुरी पायगुडे-राणे यांच्या अहिर-भैरव स्वरांच्या आवर्तनाने रंगत गेली.
कस्तुरी या प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम,भक्तिगीतेही त्या तेवढय़ाच तयारीने सादर करतात. नुकताच त्यांचा 'मी प्रेमिका' हा अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
या कार्यक्रमात त्यांनी 'रसिया म्हरो' ही बंदिश सादर केली. त्यानंतर 'बेग बेगा आओ मंदिर'द्वारे आपल्या आवाजाचा उत्तम आविष्कार सादर केला. शास्त्रीय गायनानंतर त्यांनी निगरुणी भजने सादर केली. 'अवघारंग एकचि झाला'ने त्यांनी मैफिलीची समाप्ती केली.
त्याना हार्मोनियमची साथ स्वानंद कुलकर्णी यांनी, तर तबल्याची साथ गणेश तानवडे यांनी केली. तंबोरा साथीला कल्याणी शेटे, आभा पुरोहित होत्या. सुभाष इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी 'रंगतरंग' या दिवाळी अंकाचे प्रकाशन रवी चौधरी यांच्या हस्ते झाले.

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=42&querypage=8&boxid=25846398&parentid=4485&eddate=10/29/2011

Monday, October 24, 2011

तेलाच्या वातीतून मंदता पसरविणारा.




प्रकाश...लखलखणारा...ता-यांसारखा अवकाश उजळविणारा
अंधार दूर सारुन आपली स्वतःची प्रतिमा स्पष्ट करणारा..

कधी मिणमिणता...अंधुकसा ठिपका तर कधी आसंमतात पसरणारा
मनाची चेतना शमविणारा..

रुसलेल्या धरणीवर स्वतःचे अस्तित्व जपणारा..
किती रुपात..किती आकारात...किती वेगात धावणारा

कधी तेलाच्या वातीतून मंदता पसरविणारा..
कधी मानवाच्या सामर्थ्याने लख्ख भासणारा..

नाना रुपात नवचेतना आणणारा...
नाना रंगांची उधळण करणारा...

कौलारु घरातही तेज देणारा...
चौकोनी वास्तुलाही अस्तित्व देणारा..

महाल, वाडे, बंगले तर किल्लेही पाहिले तर लांबून साक्ष पटविणारा...
रुसलेल्यांना हसविणारा...

गहिरेपण जपत शांतपणे तेवणारा..
सूर्यास्ताला नमन करत सूर्यादयाला अर्घ्य देणारा..

गरीब-श्रीमंत यांच्यातला भेद दूर करणारा..
वास्तवतेला स्विकारुन नवी जागृती देणारा...

प्रकाश वास्तवतेला स्विकारुन नवी जागृती देणारा...
...प्रकाश
आनंदाचा ठेवा उधळत...सा-या चिंता दूर करणारा सण प्रकाशाचा

सर्व वाचकांना, मित्रांना, स्नेहीजनांना....नवे रुप देत उजाळा देणारा हा प्रकाशसण....

आपल्या दारी उजळविणारा...
प्रकाशकिरण घेऊन दाखल झालेला... सुभाष इनामदार, पुणे


Subhash inamdar
9552596276
subhashinamdar@gmail.com