subhash inamdar

subhash inamdar

Sunday, July 14, 2013

नाटकावरुन चित्रपट...`श्रीमंत दामोदरपंत`

पुन्हा एकदा नाटकावरुन चित्रपट तयार करुन केदार शिंदे चित्ररसिकांना वेगळ्याच अनुभूतीची करामत पडद्यावर दाखविणार आहे.


१९९८ साली `श्रीमंत दामोदरपंत` हे नाटक गाजले ते वेगळ्याच पध्दतीने..त्याच्या सीडीची प्रचंड विक्री झाली. केदारच्या यानाटकाच्या सीडी भराभर घरोघरी दिसायला लागल्या ..नाटकानेही लेकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. ...आता मात्र केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश दत्त यांच्याकड़ून आपल्या या नाटकाचे विस्तारलेले रुप आकारात आणत पुन्हा एकदा नाटक विसरुन याचा चित्रपट तयार केला आहे. श्रीमंत दामोदरपंत या मूळ नाटकात भरतने दामू ही मध्यवर्ती भूमिका केली होती. अर्थातच केदारचा चित्रपट म्हटला की सुपरस्टार भरत जाधवची भूमिका असायलाच हवी. या चित्रपटातही भरत जाधवच नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.   
 'श्रीमंत दामोदरपंत' या चित्रपटाच्या निमित्ताने काही योगही जुलून आले आहेत. सुनील बर्वे हा अभिनेता आणि केदार शिंदे हा दिग्दर्शक असे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. कॉमेडीक्वीन निर्मिती सावंत हिचा मुलगा अभिनय सावंत या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. छोटा पडदा गाजवताना लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि दिग्दर्शक केदार शिंदे प्रथमच एकत्र आले आहेत. सोनू निगमच्या आवाजातले आणि वैशाली सामंत हिने संगीत दिलेले एक गाणे यात आहे आणि ते त्याच्या खास स्टाईलमधले असल्याने नक्कीच लोकप्रिय ठरेल यात शंका नाही.

अतिशय गंभीरपणे हा चित्रपट तयार केला आहे..मला खात्री आहे..ज्यांनी नाटक पाहिले आहे आणि ज्यांनी पाहिले नाही अशा सा-यांना श्रीमंत दामोदरपंत नक्की आनंद देईल...यात कोणताही उपदेश वा काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही..केवळ अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मध्यमवर्गींयांन दोन तास करमणूक देणे एवढाच उद्देश ठेऊन चित्रपट बनविल्याचे  केदार शिंदे सांगतात.
नाटकात रंगभूमीच्या मर्यादामुळे दामोदरपंतांच्या वाडयात हे सगळे नाट्य घडते. हे पंत म्हणजे एक काळ गाजवलेले आणि हयात नसलेले स्वातंत्र्यसैनिक असतात, मात्र रोज संध्याकाळी सहा वाजता ते दामूच्या अंगात संचारतात. एरव्ही व्यवस्थित असलेल्या दामूचे नकळत रूप बदलते. दिवसभर आईच्या पदराआड़ असलेला दामू संध्याकाळचे सहा वाजले की रुद्रावतार धारण करतो त्यामुळे सगळ्याचीच पंचाईत होते असा नाटकातला संदर्भ आहे, मात्र या चित्रपटात दामू वाड्याच्या बाहेर कोठेही असताना असे घडते त्यामुळे तो तेथून घरी पोहोचेपर्यंतच्या असंख्य धम्माल गंमती असलेले प्रसंग घडायला लागतात,हीच या चित्रपटाची रंगत असल्याने त्यातूनच हे सारे नाट्य खास केदार शिंदे स्टाइलने रुपेरी पडद्यावर फुलत जाते.


माहेरची साडी...सारख्या हमखास स्त्रीयांच्या डोळ्यातून अश्रू काढणा-या भावनाशिल चित्रपटांची नायिका म्हणून ...अलका कुबल ....यांची प्रतिमा बदलण्याचे काम या चित्रपटाने केले आहे..त्या सुध्दा या चित्रपटातून आपल्या नव्या भूमिकेचा रसिक कसा आस्वाद घेत आहात हे पाहण्यासाठी  उत्सुक आहेत.
याचे सारे श्रेय त्या केदार शिंदे यांना देतात..त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतूकही करतात..आणि सांगातात.....`केदार शिंदे यांना टायमिंग सेन्स आणि बिटवीन द लाईन्स वाचायची खूप चांगला समज आहे. त्यांच्यातला मास्तर ते नेमके अचूक हेरतो..`

रंगमंचावर जे शक्य होत नाही ते अशा सिनेमातून दाखविता येतं...आणि काळानुरुप बदल करून ती कलाकृती सादर करता येते..केदार याबाबतीत चांगली संकल्पना राबवित आहे. नाटाकाला सिनेमाच रुप देऊन ती कलाकृती अजरामर करण्याची केदारची संकल्पना भरताला खूप आवडली..यामुळे भावीपीढीला इतिहास समजेल.
चित्रपटाची कथा आणि संवाद तसेच दिग्दर्शन केदार शिंदे याचे आहे. पटकथालेखन ओंकार मंगेश दत्त यांचे आहे. संजय मेमाणे आणि अनिल कटके यांची सिनेम्याँटोग्राफी आहे. महेश कुडाळकर यांचे कलादिग्दर्शन आहे. ओंकार मंगेश दत्त आणि वैभव जोशी यांचे गीत लेखन असून सोनू निगमबरोबरच अभिजित कोसंबी यांच्या आवाजात ती ऐकायला मिळतात. या चित्रपटाला वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर या दोघा जानकारांचे संगीत आहे.

श्रीमंत दामोदरपंत २६ जुलै पासून प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने पुण्यात कलाकारांच्या उपस्थितीत केदार शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या चित्रपटाबाबत माहिती दिली..


`कॉट्सटाऊन पिक्चर्स`..च्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात विजय चव्हाण , भरत जाधव, अलका कुबस, पियुष रानडे, चेत्राली गुप्ते, मृणास दुसानील, अभिनय सावंत आणि खास खलनायक शोभावा असा सुनिल बर्वे यांच्या भुमिका आहे.

वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर यांनी संगीत देलेल्या चित्रपटाचे छायालेखन संजय मेमाणे अनिल कचके यांनी केले असून खरोखरी श्रीमंतीपट वाटावा असा देखावा दिसून हिंदीच्या तोडीचे सेट वापरून चित्रपट नटविला आहे.

सध्या प्रमोशनचा धुमधडाका सुरु असून काही दिवसातच त्याचा परिणाम चित्रपटगृहात दिसून येईल. केदार शिंदे हे यापुढेही जुन्या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट बनविण्याच्या कामात व्यस्त रहाणार हे आता नक्की झाले आहे.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
             
 

Saturday, June 29, 2013

नाट्यसंगीताचा बहारदार नजराणा....

पुण्याच्या ऐतिहासिक अशा हिराबागेतल्या टाऊन हॉल कमिटीच्या पेशवाई दिवाणखान्यात शुक्रवारी संध्याकाळी पावसाळी वातावरणाचा साज बाहेर सजत असतानाच नाट्यसंगीताच्या सुरावटींचा बहर एकामागोमाग  रंगत होता...ज्या वास्तुने अतिशय वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची व्याख्याने..ऐकली ..समाजातल्या धुरंदर मंडळींचे कौडकौतूक केले..त्या या वास्तुत रंगलेल्या मैफलीची आठवण आजही ताजी आहे..संगीत नाटकांच्या वैभवशाली पंरंपरेचा भरजरी नजराणा दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वतीने पूर्वी भावे यांच्या सुरेल निवेदनातून पुणेकरांच्या पसंतीस पडला...त्यांनी वन्समोअरच्या आणि टाळ्यांच्या निनादात नाट्यसंगीताच्या या पदांना दिलखुलास दाद दिली.


१८८० सालच्या `संगीत शाकुंतल` या संगीत रंगभूमीचा आरंभ समजल्या जाणा-या नाटकातल्या `पंचतुंड नर रुंड मालधर..`  या नांदीने कार्यक्रमाची सुरवात केली.. 


श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, गौतमी चिपळूणकर आणि ऋतूजा लाड या चार तरुण कलाकारांनी नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून आजही समर्थपणे ही युवापिढी किती तयारीने नाट्यसंगीताची ही परंपरा सांभाळते आहे याचे उदाहरण मिळते.


 
`नांदी ते भेरवी`... असा सतरा गीतांचा हा प्रवास या कलावंतांनी आपल्या ओजस्वी आवाजातून रंगतदारपणे सादर केला...यातही अमोल पटवर्धन या मुळातल्या सांगलीच्या पण सद्या पुण्यात राहणा-या कलाकाराने सादर केलेले ययाती-देवयानी या नाटकातले `प्रेम वरदान हे पद...`   तसेच सावनी दातार-कुलकर्णी यांनी भावगीत आणि नाट्यसंगीत यांचे एकत्रित मिश्रण असलेले ज्योत्स्ना भोळे यांनी कुलवधूसाठी गायलेले पद `खेळेल का देव माझा माझीया अंतरी...`आणि गायत्री वैरागकर-जोशी यांनी आवाजातली ..... दमदार तयारीतून सादर केलेले `आज सुगंध आला लहरत `...यातून आपली नाट्यसंगीतातली पकड सिध्द केली. 

`मंदारमाला` नाटकातली `बसंत की बहार आयी... `या श्रीरंग भावे आणि धनंजय म्हसकर यांच्या बहारदार सादरीकरणाने  दोन्ही कलावंताने आपली छाप पाडली.



`हे सूरांनो चंद्र व्हा..`हे ऋजूता लाड हिने गायलेले पद तर फारच आकर्षक होते..
त्यातला भाव आणि त्यातली आर्तता सारेच तिच्या सुरांमधून आतप्रोतपणे व्यकत झाले..यातून तिची तयारी आणि सादरीकरणातला दिमाखदारपणा साराच सूरांतून पाझरतो..
 




श्रीरंग भावे यांचे कट्यार मधले `घेई छंद...`आणि धनंजय म्हसकर यांचे `श्रीरंगा कमला कांता..`ही दोन्ही पदे रसिकांनी डोक्यावर घेतली...म्हणजे त्यांच्या पसंतीची पावती वन्समोअरच्या निनिदात मिळाली...दोघांचीही स्वरांची हुकमत आणि नाटयसंगीत गाण्यासाटी पुरेशी तयारी ..सारेच उत्तम...

ऋजूता लाड हिने अखेरीस सादर केलेले `कट्यार`मधील `लागी कलेजवा कट्यार`....चा परफॉमन्स तर खरोखरीच लाजवाज होता...

 `बालगंर्धव `चित्रपटातल्या ...`चिन्मया सकल ह्दया ..`या भेरवीने जेव्हा श्रीरंग भावे यांने मैफलीची सांगता केली  तेव्हा असा कार्यक्रम अजुन चालावा अशी चुटपूट लागून राहिली..

 

एकूणच नाट्यसंगीताचा हा बहारदार नजराणा इथे रसिकांसमोर सामोरा आला...त्यातली मैफलीची रंगत वाढविणारे पूर्वी भावे हिचे निवेदन होते..त्यात माहिती तर होतीच पण याविषयाची मांडणी आणि नाटकातल्या संगीत परंपरेचा असलेला अभ्यासही आर्वजून दिसत होता...सहजता आणि माधुर्यता याचीही यात तेवढीच ताकद होती..





ही मैफल रंगण्यापाठीमागे आहेत आणखी दोन कलावंत..खरे तर हे चारही गायक कलाकार मुंबईचे..पण त्यांना साथ करणारे आमचे पुण्याचे राजीव परांजपे यांचा ओर्गनवरचा बोलका हात जेव्हा स्वरांवर हळुवार फिरतो 







........
आणि प्रसाद जोशी यांचा तबला बोलाप्रमाणे नाद काढतो..तेव्हा रंगत अधिक वाढते...हे मान्यच करायला हवे.




एकूणच ज्यांनी या नाट्यसंगीत मैफलीचा आनंद घेतला ते रसिक भाग्यवान ठरले....असे कार्यक्रम करून दादार माटुंगा कल्चरल सेंटर आपल्या दिमाखदार परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत ती जोपासत ठेवण्याचे व्रत अंगीकारत आहेत...याचा अभिमान आहे..





- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276









Saturday, June 22, 2013

व्यंगचित्रही जिव्हारी लागते तेव्हा...

व्यंगचित्रात जो कुत्रा दाखविला आहे तो पिसाळलेला आहे..शिवसेनेकडे पाळलेला कुत्रा असल्यामुळे तो भुंकत नाही आणि कुणाला विनाकारण चावत नाही....मंगेश तेंडूलकरांच्या ७०व्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना संजय राऊत यांनी राष्टवादीचे आमदार अंकूश काकडे यांना अशा कोपरखळी देऊन व्यंगचित्रही राजकीय नेत्यांना कसे लागते आणि किती खुपते याचे दर्शनच घडविले..

ही घटना घडली ती बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात...जिथे राष्ट्रवादीचे अंकूश काकडे यांनी एका व्यंगचित्राचा उल्लेख करुन यात राष्ट्रवादीचा कुत्रा तीन वेळा भुंकतो..मनसेचा नुसतीच कोल्हेकुई करतो...असे विविध राजकीय पक्षांवर काढलेल्या व्यंचित्रात शिवसेनेचा यात उल्लेखही केलेला नसल्याचे दाखवून दिले...याचा दाखला देत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अशी शाब्दिक खेळी करत उत्तर दिले..

हे राजकीय लोक व्यंचित्रातला आनंद घेतानाही आपले राजकीय व्यासपीठ बिलकूल सोडत नाहीत..आम्ही तेंडूलकरांच्या व्यंगचित्राकडे पहाताना त्यातल्या आशयाकडे वेगळ्या पध्दतीने पाहतो...आम्ही ते सारे हसत हसत पचवितो असे म्हणतो..पण प्रत्यक्षात मात्र तसे व्यंग दाखविले की तुटूनही पडतो..कुठेतरी ते चित्र डोक्यात पक्के घेतो..आणि वेळ आल्यावर त्याचाही समाचार घेतो..हेच सिध्द केले.

खुद्द शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे ही सांगत ...अनेक लेखातून जे व्यक्त होऊ शकत नाही ते व्यगचित्र एका चित्रात करते...व्यंगचित्रात हिच परंपरा संभाळणारे आता केवळ मंगेश तेंडूलकरच शेवटचे शिलेदार उरले आहेत...त्यांच्या व्यंगचित्रातून अनेक विषय माडतात...त्यांच्या कलेला सा-यां रसिकांनी असाच प्रतिसाद देऊन त्यांची कला याही वयात बहरत रहो असा आशावादी सूर आळविला..

शनिवारी सकाळी या उदघाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर रसिक या क्षेत्रातले जाणकार उपस्थित होते..आपल्या हातून ही चित्रे काढली जातात..पण मी ती काढत नाही...आता चहा घेण्यासाठीही हात थरथरतो..पण ब्रश हाती घेतला की चित्र रेखाटना तो स्थिर रहातो...जोपर्यंत ती काढली जातात तोपर्यंत मी काढतच रहाणार...असे म्हणत...मंगेश तेंडूलकरांनी आत्तापर्यंत वाचकांनी केलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात.

वयाची एंशी पूर्णकरूनही अतिशय उत्साहाने  प्रदर्शन भरवितात...रसिक-वाचकही त्याला तेवढाच दिलखुलास प्रतिसाद देतात...त्यांची याही वयातली ही उमेद तरूणांना आणि नवीन कलावंतांना याकडे आकृष्ट करेल यात शंका नाही...

पुण्यात आजही खड्डे कायम आहेत...मी त्याबाबत व्यंगचित्रकार आणि जागरूक करदाता म्हणून प्रयत्न करतो...पण पुण्याचे हे चित्र महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आणि महापालिकेच्या अधिका-यांनी बदलण्याची गरज असल्याचे सांगत व्यगचित्रातून व्यंग दाखविले..पण ते समाजहिताचे काम व्हावे असाच उद्देश असतो...यात अनेक ठिकाणी अनेक विषयावर मी चित्राच्या भाषेतून मते व्यक्त केली आहेत...पण ती दूर व्हावीत आणि समाजहिताचे काम व्हावे ही आशादायक बाब घडावी ही तेंडूलकरांची विनंती आहे...


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, May 22, 2013

अभिनयासह नृत्याचा थाट...खो खो

सिध्दार्थ जाधवसह अनेक पूर्वज च्या आपल्या जुन्या वाड्यात रहायचे..त्या वाड्यात त्यांचा वंशज असलेला श्रीरंग देशमुख रहायला येतो..आणि एकेक पीढीचे एकेक पूर्वज आपला खेळ खेळू लागतात...
 लोच्या झाला रे... या नाटकावर आधारीत हा सिनेमा काही विलक्षण दृष्य़े..पारंपारिक पिढी बरोबर चालत आलेले लोकसंगीत आणि त्याला लाभलेला अभिनयासह नृत्याचा थाट...




केदार शिंदे यांच्या तीन वर्षाच्या खंडानंतर एक जंगी मराठी सिनेमाचा खेळ ते घेऊन येताहेत...खो खो...





हा सिनेमा हा पूर्वसुरींच्या साम्राज्यात जावून काही त्या त्या पिढ्यांचा घटना आणि प्रसंग  वेगवेगळ्या सिनेमॅटिक पध्दतीने यात दिसतात.. सारी खास दृष्ये तुमची नजर आणि मन प्रसन्न करतील..


 या महिन्याच्या ३१ तारखेला हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट वेगळीच गंमत मराठी प्रेक्षकांना या चित्रपटातून दाखविणार आहे. त्यांना प्रेक्षक आपला हा चित्रपट मनोरंजनाचा नवा खजाना म्हणून नक्कीच अनुभवतील याची खात्री वाटते.  पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास या चित्रपटाच्या प्रसिध्दी साठी उषा उत्थप यांनी तयार केलेले गीत ऐकविले..निर्मात्या शोभना देसाई यांनीही केदारच्या नेतृत्वाखालील ही टीम यांनी खो खो तून तयार केलेली कलाकृती मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद व्यक्त केला.
सिध्दार्थ जाधव यांनी एकही संवाद नसलेली भूमिका करताना केदारच्या दिग्दर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले.. माझ्या थोरल्या भावासारखा असलेला  भरत जाधव मोठा कलाकार तर आहेच पण आपल्या इतर सहका-यांनीही प्रत्यक्ष चित्रिकरणात पंचेस सांगून प्रसंग खुलवितो.हे ही स्पष्टपणे सांगितले.

विजय चव्हाण यांची भूमिका काही प्रसंगातून नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणेल इतकी उत्तम सादर केल्याचे प्रशस्तीपत्रक भरत जाधव यांनी दिले. त्याच्या मते केदारच्या गोष्टीत गंमत असते. त्यात तो परिपूर्ण असतो. गोष्ट स्वतःची असल्याने त्यात अनेकविध गोष्टीची भर सहजपणे पडते...आणि सर्वात महत्वाचे म्हणचे त्याच्या चित्रपटात काम करणे म्हणजे  उत्साहाला अधिक वेगळा आकार मिळतो..




सुवासिनी या मिलिकेत दिसलेली पुण्याची प्राजक्ता माळी हिचेही या चित्रपटाद्वारे पहिले पदार्पण आहे.तिच्या मते...केवळ चांगले दिसणे..छान कपडे घालून मिरविणे नाही..यात अभिनयाला भरपूर जागा आहे..केदार शिंदे यांनी अनेक प्रसंगी `वाह क्या बात है` असे स्पष्टपणे सांगावे उत्तमपणे सादर केले आहेत. माझ्याबरोबर सारीच मोठी कलावंत मंडळी यात असूनही त्यात माझा नवखेपणा  कधीच निघून गेला..मला खूप आवडले या चित्रपटात काम करायला.. प्राजळपणे प्राजक्ता बोलत होत्या..



भन्नाट कथानक...उत्तमोत्तम तांत्रिकता ..ओठांवर रेंगाळावीत अशी गाणी..आणि सुरेश देशमाने यांचे छायाचित्रण..शशांक पोवार यांचे संगीत आणि चेतन देशमुख यांचे स्पेशल इफेक्ट...सारेच खो खो या चित्रपटाला मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणारेच आहे..


पाहू या ३१ मे ला प्रत्यक्ष चित्रपटगृहात...




-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, April 26, 2013

शिवचरित्रातून आपण काय घेतले...?

 शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे य़ांचा सवाल..



गेल्या काही वर्षात मी १० ते साडे-दहाहजार व्याख्याने शिवचरित्रावर दिली. मात्र आज मला असे वाटते की, लोकांनी ती करमणूक म्हणून ऐकली. टाळ्या दिला. प्रसंगी जयजयकार केला..छत्रपती शिवाजी की जय..आणि त्यांच्या कर्तृत्वाची नोंद केवळ पुतळ्यांच्या स्वरूपात दिली..अश्वारूढ पुतळे पुण्यात सात आहेत..
पण त्या शिवचरित्रातून आपण काय घेतले...

आज मी व्यथित आहे. मध्यतरी मी इंग्लंडला गेलो असताना विल्स्टन चर्चिलचा पुतळा तुमच्या देशात नाही..असा प्रश्न माझ्या इंग्रजी मित्राला विचारला..त्याने काही काळ थांबून सांगितले...चर्चील आमच्या रक्तात आह..पुतळ्यांची गरज काय...

आज मला ते आठवते कारण...आज रोज टीव्ही आणि वृत्तपत्रातून लहान मुलींवर बलात्काराच्या बातम्या दिसतात. काय चालले आहे हे..तुम्हाला आणि मलाही पेटून उठावे वाटत नाही...
काय घेतले तुम्ही शिवचरित्रातून केवळ करमणूक करुन घेतली.

आज मला स्वतः बद्दलही चिड येते..आणि मी फुकट उतकी वर्षे वाया घालविली असे वाटते.

आपण फक्त शिवाजी महाराजांच्या गुणांची चर्चा करतो. त्यांच्या मोगलांशी केलेल्या लढाया पाहताना त्यांच्या धाडसी वृत्तीला दादा देतो.

मात्र, प्रत्यक्षात आपल्याला चंगळवाद आवडतो. अशी आपली वृत्ती असेल तर आपल्या राष्ट्राची प्रगती कशी होईल?
पुतळे उभारून आणि जयजयकाराच्या घोषणा देऊन आपली प्रगती होणार नाही. त्यासाठी शिवचरित्राचे वेड आपल्या रक्तात भिनण्याची आवश्‍यकता आहे.

माझी व्याख्याने लोकांनी करमणूक म्हणून ऐकली. त्यामुळे त्यांचा आणि माझा वेळ वाया गेला, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, शिवचरित्र वाचून किंवा ऐकून आम्ही नेमके काय मिळवले याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे.

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी श्रीनिवास कुटुंबळे लिखित, "विधाता हिंदवी स्वराज्याचा' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते खूपच व्यथित झाल्याचे दिसत होते. इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


त्यावेळी त्यांनी काढलेले शब्द आजही मला आठवतात..तसेच्या तसे देण्याचा मी यत्न केला आहे....आपण सर्वजण याचा विचार कराल अशी अपेक्षा करतो..




- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, April 22, 2013

संधीकाली रमणा-या त्या तीन यात्रा..

अगदी उन्हाळा असला तरी पुणेकरांसाठी सुखद असा हा काळ आहे. सध्या तापमानही ३६ पर्यत असते..रात्री तर थंडीही जाणवते..त्यातच भर म्हणजे संध्याकाळचे सुरेल वारे..
त्यातही अधिक सुखावह काळ म्हणजे रोज नवेनवे सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या डेव्हीड ससून वृध्दाश्रम चालवीत असलेल्या निवारा संस्थेने (१८६५ मध्ये पुणे येथे "डेव्हिड ससून इन्फर्म असायलम' ही संस्था स्थापन झाली. ही संस्था "निवारा' या नावाने आजही वृध्दांसाठी मदतकार्य करते आहे. )मराठी भावसंगीताची वाटचाल हा एक सर्वांना आवडेल असा भावगीतांचा नजराणा पेश केला.
`स्वरानंद `संस्थेने आपल्या अपर्णा संत, संजीव मेहेंदळे या दोन गायकांच्या संगतीत अरुण नूलकरांच्या निवेदनातून रंगत नेलेला हा कार्यक्रम रंगला..तो पराग माटेगावकर, अनय गाडगीळ, राजेंद्र साळुंखे आणि राजेंद्र दूरकर यांच्या दमदार साथीमुळे. तुडुंब भरलेल्या निवाराच्या सभागृहात वन्समोअरची अनेक गाणी मराठी चित्रपटांची ती जुनी मोहिनी किती होती याची साक्ष पटविणारी होती.
अपर्णा संत यांच्या  सुरेल आवाजाची जादूच या कार्यक्रमात रसिकांच्या मनावर अधिक पडल्याचे प्रतिसादातून दिसते होते.
काही रसिकांनी दूरकरांच्या ढोलकीच्या नादावर फिदा होऊन दौलतजादाही उधळली.

`राजा माणूस ......

राजा परांजपे जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे एक से एक चित्रपटाची उधळण होत असताना..२१ एप्रिलला `राजा माणूस`या अनिल बळेल लिखित आणि स्नेहल प्रकाशन निर्मित पुस्तकाचे प्रकाशन अवघे ८८ वर्षांचे तरुण नायक रमेश देव यांच्या हस्ते ऐतिहासिक केसरी वाड्याच्या सभागृहात झाले.
राजा परांजपे यांनी आपल्याला कुंभाराच्या मडक्याप्रमाणे घडविले असे अभिमानाने सांगणारे आणि ज्यांच्या नावातच राजा असणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या आठवणींने हेलावत समारंभ फुलत गेला.

रेसकोर्सवर राजा परांजपे यांची पहिली गाठ कशी पडली याचे साद्यंत वर्णन ऐकवून राजा परांजपे यांच्या पुस्तकाचे नाव देव माणूस असायला हवे..असे सांगून त्यांनी माडगूळकर आणि बाबुजी यांच्यात सुवासिनी चित्ररपटात कसे भांडण लावून ..दिवसामागू दिवस चालेले ऋतू मागूनी ऋतू..जिवलगा कधी रे येशील तू..हे अजरामर गीत कसे तयार झाले याची आठवण रंगवून सांगून राजा परांजपे हे दिग्दर्शक तर मोठे होतेच पण माणूस म्हणूस किती श्रेष्ट होते  याचे दर्शन घडविले.
रविन्द्र घाटपांडे यांनी राजा परांजपे यांच्या चित्रपटातल्या दोन गीतांना संपदा थिटे आणि  हेमंत आठवले यांच्या आवाजात सादर करुन त्या काळाचल्या चित्रपटांची आठवण करुन दिली.

वाहवा..क्या बात है..



आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे..
 किंवा

पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत सार्‍या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे ..
जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणार्‍याने जगता जगता मजेत गावे गाणे..


हे लिहणा-या कवी रमण रणदिवे यांच्या `स्वर चांदणे ` उमलविणा-या मराठी गझल रुजविणा-या कवीत ज्यांचे नाव सुरेश भट यांनी  पुढे आणले त्या या कवीच्या प्रतिभेचा आविष्कार...रंगला तो सोमवारी एस एम जोशी सभागृहातल्या रसिकांच्या साक्षीने.
हल्ली कलाकारांचेही मार्केटींग करावे लागते...पण ते न जमणारे दर्जदार कवी यांना आवलाच कार्यक्रम करण्यासाठी कांही मित्रांना गळ घालून तो घडवावा लागतो..ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...


उत्तम आवाज, संगीताचे ज्ञान आणि संवादिनीवरून फिरणारा संगीतमय हात ही रणदिवेंची आणखी एक ओळख. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला आहे.  त्यांचे घर म्हणजे संगीतघरच आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. गेली ४० वषेर् ते एका श्रद्धेने कविता आणि गझला लिहीत आहेत.


राजेश दातार आणि प्रियल साठे यांनी त्यांच्या गझलांना इतके सुरेल पेश केले की त्यातले शब्दन् शब्द सूरमयी पैठणी नेसून रसिकांच्या मनात घर करुन राहिले..संपल्यावर टांळ्यांच्या कडकडाटात आनंदही व्यक्त केला.
 


मात्र तरल.स्पर्शून जाणा-या शब्दांना मानणारे संगीतकार आणि त्यांच्या गझलांचे चाहते तरुण संगीतकार कौशल इनामदार यांची हजेरी..


केवळ उपस्थित नाही तर त्यांच्या दोन रचनांना अतिशय सुरेल असे सादरीकरण करुन रमण रणदिवेच्या श्रेष्ठत्वाचे दर्शन घडविले.
खरं तर हा सारा खेळच रणदिवे कुटुंबीयांनी रंगला...हार्मोनियमवर होते मेकॅनिकल इंजिनीअर असलेले एक पुत्र आणि दुसरा मुलगा  अतिशय उत्तम तबला साथ करत होते.




स्वतः संगीताचे ज्ञान असेलेल्या रमण रणदिवेंच्या रचना यामुळेच छंदबध्द होत असतील. त्यांना सुरातच शब्द सुचत असतील... विनय़ा देसाई यांनी या गझलकाराला बोलते केले आणि मुक्त छंदातल्या काही रचना त्यांच्या कडून आठवून सादर करायला भाग पाडले. तसे ते पेटी घेऊनच बोलत होते म्हणूनच एका गझलेची प्रचिती त्यांच्या आवाजातही ऐकायला मिळाली...आणि शब्द आले..वाहवा..क्या बात है..

आज जे सुरांचे चांदणे रसिकांनी टिपले तसे त्यांच्या रचनांचे अनेक कार्यक्रम व्हायला हवेत...आणि ते होतील याची खात्री वाटते.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Saturday, April 20, 2013

पाडवा ते रामनवमी सांस्कृतिक महोत्सव..

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता .
त्यात पहिल्या दिवशी गीत रामायणाने महोत्सवाची  सुरवात झाली. तो सादर केला दता चितळे यांनी..... सौ. मृणालिनी चितळे यांच्या निवेदनाने कार्यक्रमात गदीमांच्या गीतरामायणातली एकेक गीते उलगडू लागली..तुषार रिठे, प्रार्थना पटवर्धन, पूजा गाजरे या गायकांची संगत आणि चारुशीला गोसावी, श्रीरंग चासकर आणि अनघा वैशंपायन याच्या साथीने लक्षात राहणारा आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला.
 
दुसरा दिवस केदार मोरे यांचा वाद्यवृन्द जुन्या नव्या हिंदी गीतांचा रंगारंग नजराणा "जल्लोष २०१३" गायक हिम्मत कुमार पंडया, सुजित सोमण ,मंजुषा देशपांडे, ह्यांच्या  गायनाने व केदार मोरे,मंदार देव , अभिषेक काटे ह्यांच्या वादनाने गाजवला . 

तिसरा दिवस हा सदानंद चांदेकर ह्यांच्या "हसरी उठाठेव " ह्या अप्रतिम एकपात्री प्रयोगाने साजरा झाला.

चवथा दिवस सौ .चारुशीला गोसावी यांचा "व्हायोलिन गाते तेव्हा " हा कार्यक्रम होता. तबला –रविराज गोसावी, सिंथेथायजर -अमृता ठाकुर देसाई तालवाद्य - राजेंद्र साळुंखे व निवेदन सुभाष इनामदार यांच्या साथीने लक्षात राहणारा अप्रतिम आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला .

पाचवा  दिवशी "स्वरांजली" हा मराठी भावगीते, भक्तिगीते, ग़जल गीतांचा कार्यक्रम होता. सौ.सई पारखे,उमेश साळुंखे ,कल्याणी  शेटे यांचे दमदार गायन तबला-महेश साळुंखे ,सिंथेथायजर- किशोर कांबळे देसाई,बासरी - अजरुद्दीन शेख यांची बहारदार वादन साथ यामुळे रंगत गेला.
 
सहावा दिवस शिल्पा  नृत्यालय ट्रस्ट यांचा कथक  नृत्य अविष्कार  "परिक्रमा " हा देखणा कार्यक्रमास  रसिकांनी प्रचंड दाद दिली  त्यानंतर रत्नाकर शेळ्के डान्स अकादमीचा वेस्टर्न डान्स परर्फोर्मन्सेस सादर  करण्यात आले  
 
सातवा दिवस महिलांचे पारंपरिक खेळ शर्वरी दाते व १५ महिला सहकारी यांचा " जागर चैत्रागौरीचा " अतिशय पारंपरिक महिलांच्या खेळाची माहिती करून देणारा  देखणा नृत्य अविष्कार .
 
आठवा दिवस ख्यातनाम जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला संत रामदासांच्या जिवनावर आधारित रचनांचा " रामदास गुणगान " हा कार्यक्रम सादर झाला.  लवकुश रामायण गाती ह्या गीतानी कार्यक्रमाची सुरवात झालि या कार्यक्रमात कानडा राजा पंढरीचा, खेळ मांडियेला, दशरथा घे हे पायसदान,पायोजी मॆने, रामा रघुनंदना त्याचप्रमाणे यासारखी एकापेक्षा एक सुमधुर गीते व डॉ.राहुल देशपांडे यांनि स्वरबद्ध केलेल्या व जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या " रामदास गुणगान " या सिडी मधील गीते श्री राहुल घोरपडे, सौ धनश्री गणात्रा, श्रीपाद भावे यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ.राहुल देशपांडे यांनी केले .

याच कार्यक्रमात "रामदास गुणगान" या सिडिचा प्रकाशन समारंभ  "मनोरंजन पुणे" चे श्री मनोहर कुलकर्णी यांचे शुभह्स्ते संपन्न झाला. यातील गीते डॉ.राहुल देशपांडे यांची असुन याला जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केले आहे व या सीडीमधील १० गाणी असुन ह्या गाण्यांना गायक रविन्द्र साठे ,सौ धनश्री गणात्रा,श्रीपाद भावे यांनी स्वरसाज चढविला आहे . संगीत संयोजन योगेश तपस्वी यांनी केले असून निवेदन राहुल सोलापूरकर यांचे आहे.

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता.

रामनवमीला या "संगीत ,नाट्य,नृत्य " सांस्कृतिक महोत्सवाची सांगता स्थानिक  कलावंताच्या  कला -प्रदर्शनाने झाला यामध्ये की-बोर्ड वादन,गायन यामधे सौ .ललिता  मुळे, सौ.रेखा धंदरे कु.समृद्धि सोलंकी,कु निहारिका कदम,प्रीटी देशपांडे  ह्यांनी गायन व कु. याना निबजिया ,कु मिली  निबजिया,शॊनक देव ,यश धोका ,यांनी  की बोर्ड वादन  प्रकारात आपले कौशल्य दाखिवले  यानंतर  लहान  मुलांच्या    "झाली काय गम्मत"   या सई परांजपे लिखित नाटकाचा प्रयोग  समावेश होता.यामधे कु. सिद्धि पारखे,कु.अंजोर खोपड़े  ,कु. रुतुजा मोरे , कोमल डिकोळे,श्रुष्टि जगताप ,रिया चव्हाण ,कश्मीरा कोपरे,प्रीटी देशपांडे, शॊनक देव ,देवयानी तोष्णिवाल,नरेंद्र डिकोळे ,पद्मजा डिकोळे,शंतनू कदम,नंदिनी तोष्णिवाल,दुर्वा चोपड़े,अंतरा महाजन या बालकलाकाराचा सहभाग होता या नाटकाचे दिग्दर्शन सौ.प्रतिभा पारखे  व संगीत  सौरभ पारखे यांनी केले होते.

या कलाकाराना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय नगरसेवक श्री. श्रीनाथ भिमाले व चित्रपट अभिनेते श्री. सुनील देव उपस्थित होते . या प्रसंगी  युवा संदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पारखे यानी आभार मानले . हा  महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रशांत डिकोळे,ओमप्रकाश जैन ,पंकज कुलकर्णी , अविनाश चोपडे , अभिजित रानडे , भालचंद्र जोशी,प्रियदर्शी नरंजे, सतीश काळे,प्रमोद मोहिते ,महेश लादे ,कृष्णा मेहकरे ,विठ्ठल संगमे या कार्यकर्त्यांनी  विशेष परिश्रम घेतले.