subhash inamdar

subhash inamdar

Thursday, March 3, 2011

महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांची स्मृती लष्करी संग्रहालयात

भारतीय सैन्य दलात ३० रेजिमेंट आहेत. त्यापैकी महार रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंट या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यापैकी महार रेजिमेंट ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून उभारली गेली आहे. त्यासाठी १९२२ ते १९४१ या कालावधीत प्रयत्न करण्यात आले. जुलै १९४१ मध्ये या रेजिमेंट विषयीचा शेवटचा मसुदा डॉ. आंबेडकरांनी दिला. ब्रिटिश शासनाकडून सप्टेंबर १९४१ मध्ये याविषयी आदेश निघाले आणि एक महिन्याच्या अवधीतच पहिली महार बटालियन स्थापन झाली. महार रेजिमेंटच्या २३ बटालियन आज कार्यरत आहेत. महार रेजिमेंटच्या अनेक आठवणी, कागदपत्रे, महत्त्वाचा दस्तऐवज, दुर्मिळ छायाचित्रे, पदके सुधाकर खांबे यांनी या वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवली आहेत. महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांची स्मृती जपणारे पुण्यातील हे लष्करी वस्तुसंग्रहालय मालधक्का चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात ‘सुभेदार धर्माजी खांबे स्मरणार्थ राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय’ या नावाने साकारले आहे. यासाठी त्यांचे चिरंजीव सुधाकर खांबे अथक प्रयत्न करीत आहेत.

या संग्रहालयाच्या माध्यमातून अभ्यासक, कलाप्रेमी आणि संग्राहक यांना मोठे सहकार्य होणार आहे. श्री. सुधाकर खांबे यांनी या लष्करी संग्रहालयात भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटमधील आपल्या पूर्वजांच्या शौर्यगाथेचा इतिहास चित्रमय रूपात मांडला आहे. त्यात रेजिमेंटच्या स्थापनेपासूनच्या विविध प्रसंगांची लष्करी छायाचित्रे, लष्करी अधिकाऱ्यांच्या व सैनिकांच्या वापरातील रुबाबदार पोशाख व कॅप्स, कॅप बॅजेस, शोल्डर बॅजेस, बटन्स, बेल्ट्स, रेजिमेंटच्या स्थापनेपासूनचे कमांडंट, तसेच आपल्या पराक्रमाच्या बळावर शौर्यपदके मिळवून दिलेल्या वीर योद्धय़ांची छायाचित्रे, शौर्यवान व कर्तृत्ववान अधिकारी/ सैनिकांना मिळालेली शौर्य व सेवापदके (मेडल्स), भारतातली आणि परदेशातील वेगवेगळ्या मोहिमेत शौर्य गाजविल्याबद्दल बहाल करण्यात आलेली पदके, सन्मान व प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह, सरसेनापतींच्या हस्ताक्षरातील पत्र, ग्रीटिंग कार्ड्स, सेवापुस्तके, विविध सोहळ्याप्रसंगी काढलेली प्रथम दिवस अनावरण पाकिटे याशिवाय लष्कराशी संबंधित अनेक वस्तू श्री. खांबे यांनी अतिशय परिश्रमाने प्रसंगी भटकंती करून मिळविल्या व तितक्याच समर्पकरीतीने त्यांची मांडणी या लष्करी संग्रहालयात केली आहे.

देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या वीर जवानांचे सदैव स्मरण राहून भारतीय लष्कराची स्मृती चिरंतन राहावी या उद्देशाने या संग्रहालयाची स्थापना केली आहे.

हवालदार राऊ कांबळे १९४७ मध्ये जम्मू-काश्मीर युद्धात शहीद झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठविलेले त्यांच्याच हस्ताक्षरातील सांत्वनपत्र, तसेच सर्वात जुने आणि दुर्मिळ असे १८९० दरम्यानचे मूळ सेवापुस्तक श्री. खांबे यांचे आजोबा (आईचे वडील) यांचे आणि पहिल्या जागतिक युद्धातील १९१७ च्या दरम्यानचे सेवापदक उपलब्ध आहे. तसेच १०९ बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रन्ट्री व नंतर १११ महार बटालियन १९१७ च्या दरम्यान पहिल्या महायुद्धात सहभागी झाले त्यांचे त्यावेळचे सेवापदक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे दुर्मिळ छायाचित्र, १८८० च्या अफगाण युद्धात शौर्य गाजविल्यामुळे पनवेलची जहागिरी व राव बहादूर हा खिताब मिळालेले सुभेदार गंगाराम भातनकर यांचे रुबाबदार छायाचित्र तसेच  पहिल्या जागतिक युद्धात तुर्कस्तान येथे रणांगणावर शहीद झालेले जमादार सवादकर यांचे तुर्कस्तान येथील स्मारक व कोरोनेशन पदक, १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भीमा-कोरेगाव येथील स्तंभास दिलेली भेट तसेच जुलै १९४२ मध्ये कामठी (नागपूर) येथील महार रेजिमेंट मुख्यालयास दिलेली भेट, १९४९ रोजी महार रेजिमेंटच्या २ बटालियनला दिल्ली येथे सहपत्नी दिलेली भेट, महार रेजिमेंटचे १९४५ मध्ये इराक येथील मोहिमांचे चित्र, १९४७ दरम्यानचे फाळणीचे फोटो,

 १९६२ च्या युद्धातील दुर्मिळ फोटो तसेच परमवीर चक्र ते वीरचक्र यांना शौर्य पदके म्हणतात. ही पदक मिळविलेल्या विरांची तसेच परमवीरचक्र, महावीरचक्र, कीर्तिचक्र, अशोकचक्र यांची छायाचित्रे. महार रेजिमेंटचे अधिकारी/ सैनिक यांनी संग्रहालयासाठी दिलेले स्मृतिचिन्ह, मानचिन्ह, मानपत्र त्याचप्रमाणे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची पत्रे व त्यांनी दिलेले अभिप्राय, महार रेजिमेंट असोसिएशन (यूके) येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांचे छायाचित्र व पत्र आदींचा समावेश या संग्रहात आहे.
ले. कर्नल करंदीकर यांच्या वापरातील १९५३ सालातील लष्करी गणवेश, तसेच ब्रिगेडियर बजीना (वीरचक्र) यांच्या वापरातील लष्करी गणवेश, डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषद लंडन येथून (महार रेजिमेंट स्थापनेसाठी प्रयत्न करीत असताना) पाठविलेले त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र, माजी लष्करप्रमुख जनरल के. व्ही. कृष्णाराव आणि जनरल जे. जे. सिंग यांनी पाठविलेली शुभेच्छा पत्रे, काठमांडू (नेपाळ) येथे महार रेजिमेंटकडून मशिनगनचे प्रशिक्षण देतानाचे छायाचित्र, महार रेजिमेंटला मशिनगनचा हुद्दा मिळालेल्या आदेशाचे पत्र, महार रेजिमेंटशी संबंधित वर्तमानपत्रातील कात्रणे, लष्कराच्या विविध महत्त्वाच्या प्रसंगाची ‘प्रथम दिवस अनावरण’ डाक पाकिटे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती व माहिती, महार रेजिमेंटच्या इतिहासाची रेजिमेंटने प्रकाशित केलेली पुस्तके, सी.डी. आणि मासिके , स्वतंत्र महार रेजिमेंट स्थापनेसाठी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला जुलै १९४६ मध्ये सादर केलेला मसुदा हेही येथे पाहावयास मिळतो.

आजपर्यंत या लष्करी संग्रहालयास सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, आजी-माजी लष्करी अधिकाऱ्यांनी तसेच देशी-परदेशी अभ्यासक, इतिहास संशोधक यांनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तसेच तीनही दलांच्या प्रमुख प्रतिभाताई पाटील यांनीसुध्दा या संग्रहालयास भेट देऊन या दस्तऐवजांचे कौतुक केले. या आगळ्या-वेगळ्या राष्ट्रीय व समाजोपयोगी कार्याचे महत्त्व ओळखून ज्यांच्याकडे लष्कराशी संबंधित वस्तू असतील तर त्यांनी या संग्रहालयाच्या वाढीसाठी देणगी म्हणून द्याव्यात, अशी विनंती या संग्रहालयाचे संस्थापक सुधाकर खांबे यांनी केली आहे.
दुर्मिळ लष्करी वस्तू व  दस्तऐवज जतन करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. युद्ध व आपत्कालीन समयी आपल्याला सैनिकांची व लष्कराची आठवण होते. त्या संकटसमयी आपण त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वतोपरी मदत करतो. कालांतराने सर्वानाच त्यांचे विस्मरण होते. पुणे मनपाने या संग्रहालयाची भरभराट होण्याच्या दृष्टीने आर्थिक आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सुधाकर धर्माजी खांबे (वय ५८ वर्षे) हे सेवायोजन कार्यालयात (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज) रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना त्यांच्या तीन पिढय़ांचा लष्करी वारसा लाभल्यामुळे त्याचा त्यांनी संग्रहालयाच्या उभारणीत पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. ऐतिहासिक महत्त्वाच्या दुर्मिळ लष्करी वस्तू संग्रहित करणे अशक्य असूनसुध्दा त्यांनी ते साध्य केले आहे. त्यांना वडिलांकडून संग्राहक वृत्तीचे बाळकडू मिळाले असल्यामुळेच त्यांनी या लष्करी संग्रहालयाची उभारणी केली. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लष्करी संग्रहालय व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या लष्करी वस्तुसंग्रहालयाची उभारणी सुधाकर खांबे यांनी आपली शासकीय नोकरी सांभाळून केली आहे. त्यांच्याकडे महार रेजिमेंट संबंधित २५० च्या आसपास मूळ फोटो असून या व्यतिरिक्त भारतातील इतर रेजिमेंटची प्रथम दिवस अनावरणाची ३५० पाकिटे आहेत.

दयानंद ठोंबरे
nand.tho@gmail.com


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140386:2011-03-03-18-17-43&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212

Saturday, February 26, 2011

भीमसेन जोशींना रत्नागिरीत स्वरश्रद्धांजली

 शास्त्रीय संगीताच्या मैफलीने आज रत्नागिरीत स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 21 राग, 24 अभंगांच्या माध्यमातून 60 कलाकारांनी 16 तासांची आदरांजली वाहून जिल्ह्यातील संगीतप्रेमीना एकत्र आणले.
 
 हरी ओम मंगल कार्यालयात सकाळी 6 वाजता मैफलीला सुरवात झाली. भीमसेन जोशींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून मैफल सुरू झाली. रसिकांच्या भीमसेन जोशींविषयीच्या प्रतिक्रिया लिहिण्यासाठी नोंदवही ठेवण्यात आली होती.
 
 मैफलीत सुरवातीला पं. भीमसेन जोशी यांची तोडी रागाची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर श्रुती पाध्ये-जगन्नाथ जोशी (ललत), अनिल पाध्ये (अहिरभैरव), विनया परब (बिलावल), रवींद्र मेहेंदळे (बिलास तोडी), आनंद प्रभुदेसाई (नटभैरव), विजय रानडे (तोडी), सुलभा निजसुरे, श्रीधर व नयन पाटणकर (बिहाग, मधुवंती), उदय गोखले (कलावती), स्वप्नील गोरे (बहुकंस सारंग), अमेय आखवे (मुलतानी), प्रतीक जोशी (भीमपलास), सायली बर्वे (मधुवंती), अदिती करंबेळकर (यमन), तनुजा काळसेकर (बागेश्री), चिंतामणी दामले (तबला सोलो), मृणाल परांजपे (मधुवंती), संगीता बापट (मुलतानी), समिता जोशी, सुवर्णा परांजपे (कलावती, तिलंग), धनंजय जोशी (पूरिया), श्‍वेता जोगळेकर (नंद), संध्या सुर्वे (जोगकंस) यांनी आपली कला सादर केली. राम तांबे, नरेंद्र रानडे, शमिका भिडे, बंडू भागवत यांनी सादर केलेल्या अभंगवाणीने रसिकांची वाहवा मिळविली.

रात्री आनंद पाटणकर, राजाभाऊ शेंबेकर, प्रसाद गुळवणी यांनी पं. भीमसेन जोशींच्या ध्वनिमुद्रित भैरवीने मैफलीची सांगता केली.
सर्व कलाकारांना हेरंब जोगळेकर, राजू धाक्रस, प्रथमेश शहाणे, प्रसाद वैद्य, पराग वैशंपायन, राजा केळकर, मिलिंद टिकेकर, पांडुरंग बर्वे, सचिन भावे, विनय वळामे, मधुसूदन लेले, वैभव फणसळकर, सुहास सोहोनी, आशीष प्रभुदेसाई, महेश दामले, आनंद निवेकर, विजय रानडे, आनंद पाटणकर आदींनी संगीतसाथ केली.
आर्ट सर्कलच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या वेगळ्या उपक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 

Thursday, February 24, 2011

प्रमोद मराठे

गांधर्व महाविद्यालाचे  सर्वेसर्वा प्रमोद मराठे

Born in the family of musicians, he received preliminary lessons in vocal classical music from his father , Pt . Dhundiraj Marathe .
Later he decided to concentrate wholly on harmonium playing. He received harmonium training from Shri Dilip Gosavi of Kalyan. At present he is receiving advance training from Pt Manohar Chimote. He has been accompanying most of the top class artists such as Pt. Bhimsen Joshi , Dr. Prabha Atre , Mrs Malini Rajurkar Mrs Veena Saharabuddhe .Pt Prabhkar Karekar , Mrs Aarti Ankalikar to name a few.
पूर्वी संगीत कलेला समाजात मानाचे स्थान नव्हते. ही कला काही थोडया लोकांपुरतीच मर्यादित होती. त्यावेळी पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी संगीत शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. स्वतःच्या निर्व्यसनी आणि निष्कलंक चारित्र्याने एक आदर्श निर्माण केला. संगीतप्रसारासाठी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांचा अनेक शिष्यांनी गुरुंचा हा वारसा पुढे चालविला. त्यापैकी एक होते विनायकराव पटवर्धन. गुरुंच्या आज्ञेनुसार संगीत रंगभूमीवरची दैदिप्यमान कारकीर्द सोडून शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी पूर्णवेळ वाहून घ्यायचे ठरविले आणि ८ मे १९३२ रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी त्यांनी गांधर्व महाविद्यालय पुणे या संस्थेची स्थापना केली. ती महान परंपरा गांधर्व महाविद्यालयाचे आत्ताचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे चालवित आहेत. 

     प्रमोदजींचा जन्म एका संगीत-अभ्यासक कुटुंबात झाला. वडील श्री. धुंडिराज मराठे हे संगीत प्रवीण होते. जवळ जवळ ५० वर्ष त्यांनी गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले आणि निरपेक्षपणे संगीताची सेवा केली. स्वतः संगीतप्रसाराचे कार्य करीत असताना त्यांनी प्रमोदजीच्या आई कमलताई यांनाही लग्नानंतर विशारद पर्यंतचे शिक्षण दिले आणि आपल्या कार्यात सहभागी करुन घेतले.

      आई-वडिलांकडून आलेला संगीताचा वारसा घेऊन पं. प्रमोद मराठे दोन दशकाहून अधिक काळ कलेच्या सेवेत व्यग्र आहेत. सुरुवातीचे शिक्षण वडीलांकडून घेतल्यावर त्यांनी श्री. दिलीप गोसवी आणि पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे हार्मोनियमचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात १८-१८ तास रियाज त्यांनी केला आणि या संवादिनीवर प्रभुत्व मिळविले.

       हार्मोनियम हे खरं तर पाश्चिमात्य वाद्य पण ते भारतीय संस्कृती मध्ये असं काही रुळलं आहे की इथलेच वाटावे. कुठलीही गायनाची मैफ़ल याच्या साथीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे याचं खरं सार्थ नाव संवादिनी असेच आहे. 

       संगतकाराला साथ करत असताना अनेक गोष्टींचे भान पाळावे लागते. कलाकाराला फ़ुलवणारं वादन त्याच्याकडून अपेक्षित असते. श्री. प्रमोद मराठे हे अतिशय उत्तम संगतकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गंगुबाई हनगळ, डॉ. प्रभा अत्रे, श्री. मालिनी राजूरकर, पं राजन-साजन मिश्रा, पं. प्रभाकर कारेकर, वीणा सहस्त्रबुध्दे, उ. राशिदखान, श्री. आरती अंकलीकर, श्री. संजीव अभ्यंकर, पं. सी. आर. व्यास आदि मान्यवरांना हार्मोनियमची साथ केली आहे. पं. यशवंतबुवा जोशी, पं. बाळासाहेब पूछवाले, पं. के. जी. गिंडे, आणि दिनकर कैकणी यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या कलेची तारीफ़ केली आहे.

        त्यांनी संपूर्ण भारतभर अनेक संगीतमहोत्सवांमध्ये वादन केले आहे. सवाई गंधर्व संगीत समारोह, विविद स्मृती समारोह (पुणे), चतुरंग आणि गुणीदास संगीत समारोह (मुंबई), भारतभवन (भोपाळ), सप्तक मैफ़िल (नागपूर), इंडियन म्युझिक अ‍ॅकॅडमी (मद्रास), भातखंडे कॉलेज (लखनौ) विष्णू दिगंबर जयंती समारोह आणि शंकरलाल समारोह (नवी दिल्ली), तानसेन समारोह (ग्वाल्हेर) हे त्यापैकी काही.

       १९९२ मध्ये माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी पं. प्रमोद मराठे यांना राष्ट्रपतीभवनातील भजन महोत्सवासाठी ३ दिवस विशेष निमंत्रित केले होते.


ई.टी.व्ही., डीडी यासारख्या विविध राष्ट्रीय चॅनेल्स आणि आकाशवाणीवर त्यांनी आपले वादन सादर केले आहे. आजपर्यंत त्यांनी एच.एम.व्ही., टी.सिरीज, रिदम हाऊस, अलूरकर आणि फ़ाउंटन यासारख्या नावाजलेल्या म्युझिक कंपन्यांसाठी ५० पेक्षा जास्त कलाकारांच्याबरोबर १०० च्या वर कॅसेट्स साठी सहवादन केले आहे.

       त्यांनी अनेक मान्यवर कलाकारांसमवेत देशात तसेच परदेशाही कार्यक्र्म केले आहेत. ऑस्ट्रेलिया, दुबई, अबुधाबी, युके, मस्कत, बहारीन, सिंगापूर, हॉंगकॉंग, फ़्रान्स, स्कॉट्लंड, स्विर्झंलंड, अमेरिका, कॅनडा, इटली आणि अफ़गाणिस्तान आदि देशांचा दौरा त्यांनी केला आहे.

       सध्या ते गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषवित आहेत. या ऎतिहासिक संस्थेशी ते १९८२ पासून निगडीत आहेत. गांधर्व महाविद्यालय आणि प्रमोद मराठे हे एक समीकरणच झाले आहे. विद्यालयाला सध्याचे वैभव प्राप्त करुन देण्यामध्ये श्री. मराठे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत विद्यालयात अनेक बदल झाले आहेत. काही वर्षांपूर्वीच विद्यालयाने जुन्या वास्तुतून नव्या वास्तूत पदार्पण केले. सध्या विद्यालयाकडे ५००० स्के. फ़ूट जागा आहे. त्यात एक मोठा हॉल आहे जिथे संगीत समारोह, सभा आयोजित केल्या जातात. याशिवाय ९ वर्ग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरले जातात. विद्यालयाकडे समृध्द अशी लायब्ररी आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना रहाण्यासाठी हॉस्टेल आहे. आज विद्यालयात शास्त्रीय गायन, हार्मोनियम, तबला, सुगम संगीत, कथक, भरतनाट्यम शिकविले जाते. संगीत अलंकार, संगीत प्रवीण पर्यंतच्या अभ्यासक्रमांची तयारी करुन घेतली जाते. आज विद्यालयात ५००हून अधिक विद्यार्थी संगीत साधना करीत आहेत. परदेशातील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिकवण्या तसेच परीक्षांची सोयही आता आहे. त्याला भरघोस प्रतिसाद ही मिळत आहे. 
श्री. शरद पवार यांच्या विशेष निमंत्रणामुळे पं. मराठे बारामतीच्या सरस्वती संगीत विद्यालयाचे प्राचार्यपदही समर्थपणे सांभाळतात. सध्या या विद्यालयात ४००हून अधिक विद्यार्थी गायन-वादनाचे शिक्षण घेत आहेत.

      गांधर्व महाविद्यालयाची वाकड नंतर आता फ़लटण येथेही शाखा सुरु होत आहे.
      श्री. मराठे हे नुसतेच उत्तम कलाकार नाहीत तर उत्तम मार्गदर्शकही आहेत. त्यांचे अनेक शिष्य आज संगीत क्षितीजावर चमकत आहेत. डॉ. सलिल कुलकर्णी, राजीव तांबे, मिलिंद कुलकर्णी, उमेश पुरोहित, तन्मय देवचक्के व इतर अनेक. याशिवाय अनेक विद्यार्थी उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय अनेकजण उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यातले अनेकजण उत्तम संगतकार आहेत. संगतकार हे मुख्य कलाकाराइतकेच तयारीचे असतात तथापि त्यांना मुख्य कलाकाराइतकी लोकप्रियता मिळत नाही आणि मानधनही अतिशय कमी मिळते याची खंत प्रमोदजींना वाटते.

     पं. मराठे यांनी आत्तापर्यंत विविध रागांमध्ये आणि निरनिराळ्या तालांमध्ये ५०हुन अधिक रचना केल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून देखील ते काम करतात. त्यांनी हार्मोनियमवर अनेक पुस्तके लिहिली आहेत जी संगीत अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे गांधर्व महाविद्यालयाने शैक्षणिक सीडीज आणि कॅसेट्सची निर्मितीही केली आहे. 

     यासर्व कार्यामध्ये पं. मराठे यांच्या पत्नी सौ. परिणिता मराठे आणि मुलगा चि. प्रणित यांचा सहभागही अत्यंत महत्वाचा आहे. सौ. परिणिता विद्यालयाच्या कार्यालयीन कामकाजवर देखरेख करतातच पण पुस्तके, सीडीज आणि कॅसेट्सच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.त्या संगीत विशारद आणि एम.ए.(संगीत) आहेत.

    पं. प्रमोद मराठे यांच्या विद्यालयाच्या बाबतीत अनेक नव्या योजना आहेत. विद्यार्थ्यांना भरभरुन ज्ञान देणारा गुरु म्हणून त्यांचा लौकिक आहे. पाश्चात्य संगीताच्या आक्रमणामुळे भारतीय संगीत लोकांमध्ये रुजविण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच गांधर्व महाविद्यालयांसारखी विद्यालये ही सामाजिक आणि सांस्कृतिक गरज आहे. 
 - गौरी शिकारपूर ,
पुणे
email- geetgauri@gmail.com
      
 

    

Friday, February 18, 2011

बंदिश हावभाव अभिनयासह ...


बिरजू महाराजांचे व्यासपीठावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पंडितजींसोबतच्या गेल्या ५० वर्षांतल्या आठवणी त्यांनी श्रोत्यांशी शेअर केल्या. 'पंडितजींच्या गाण्याची पद्धत स्वतंत्र होती, त्यांनी सर्वांपर्यंत संगीत पोचवले. त्यांनी पुढच्या जन्म गायकाचाच घ्यावा आणि आपण सगळ्यांनी पुन्हा श्रोतेच व्हावे,' असे त्यांनी नमूद केले.

' जाने दे मैका सजनवाँ ' ही बंदिश त्यांनी गायली आणि श्रोत्यांना जिंकून घेतले. ते केवळ गायला आले होते खरे, मात्र थोडेतरी सादरीकरण केल्याशिवाय त्यांना रहावले नाही. 'जाने दे मोहन देर हुई' ही बंदिश हावभाव आणि अभिनयासह त्यांनी सादर केली. त्यांनी बसूनच केलेल्या सादरीकरणाला रसिकांनी मनापासून दाद दिली.

पंडितजींच्या आठवणीत आर्त स्वरांनी भिजलेली मैफल... 'भीमसेनजी की इतनी याद आ रही है पता नहीं गा पाऊंगी या नहीं' असे प्रसिद्ध गायिका परवीन सुलताना यांचे भावोद्गार आणि प्रत्येकाच्याच मनात हुरहूर अशा वातावरणात भारतरत्न भीमसेन जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली.



राम गणेश गडकरी .... "पिंपळपान'

जुन्या वाड्यांच्या जागी टोलेजंग इमारती होण्याच्या प्रक्रियेत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाकडे पाहून गोविंदाग्रज ऊर्फ ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी "पिंपळपान' ही कविता लिहिली, ते कसबा पेठेतील त्यांचे निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कसबा गणपतीजवळच असलेल्या फणी आळी तालमीपाशी "136 कसबा पेठ' येथे राम गणेश गडकरी यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. पिंपळपान या कवितेबरोबरच "प्रेमसंन्यास' या नाटकाचे लेखनही या वास्तूतच झाले. 1919 मध्ये याच वास्तूत त्यांची प्राणज्योत मालवली. या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गडकरी वास्तव्यास होते. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली.

या वास्तूविषयी ....... भालचंद्र वामन धडफळे या बालमित्राने 1910 मध्ये गडकऱ्यांना या वास्तूमध्ये राहण्यासाठी जागा दिली. त्यापूर्वी किर्लोस्कर नाट्यगृह म्हणजे सध्याचे वसंत चित्रपटगृह येथे काही काळ गडकरी राहत असत. "136 कसबा पेठ' येथे राहण्यास आल्यानंतर गडकरी यांनी मातुःश्री सरस्वतीबाई आणि बंधू शंकर यांना बोलावून घेतले. या वास्तूला ते "आमचा भूतमहाल' असे म्हणत असत.
या वास्तूचे वर्णन करताना गडकरी म्हणतात, ""फणी आळीतील लहानशा गल्लीत हा आमचा सिन्नरकरांचा वाडा आहे, समोर एक पिंपळ आहे. तळमजल्यावर तुळशीराम वाण्याचे दुकान आहे. दुसरा आणि तिसरा मजला आमच्याकडे अवघ्या पाच रुपयांमध्ये भाड्याने आहे. गल्लीत टांगे, मोटारी व लोकांच्या रहदारीची वर्दळ बिलकूल नसल्याने जणू काय आम्ही एखाद्या खेड्यात राहतो, असे आम्हाला सदोदित वाटते. भोवतालच्या शांततेमुळे सरस्वतीदेवीचा संचार मी एकटाच असता येथे ताबडतोब होतो आणि त्या- त्या वेळी मी गद्य व पद्य लिहीत असतो.''

याच वास्तूत 15-16 वर्षांचे असताना आचार्य अत्रे त्यांचा "फुलबाग' कवितासंग्रह घेऊन गडकरी यांना भेटावयास आले होते. 13 जून 1917 रोजी गडकरी यांचा दुसरा विवाह याच वास्तूत झाला. त्यांच्या अवघ्या 34 वर्षांच्या जीवनातील अखेरचा नऊ वर्षांचा कालखंड या वास्तूने पाहिला आहे. अनेक मोठी माणसे त्यांना भेटायला येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. गडकरी बाहेरून आले की समोरील पिंपळाला आणि वास्तूला नमस्कार करून मगच घरात जात, असे वि. ना. कोठीवाले यांनी "गडकरी जीवन चरित्रा'त लिहिले आहे.

 ही स्मृती जागविणारी वास्तू काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी पिंपळ आणि पार आजही या बदलामध्ये तसाच राहिला ......




 

Tuesday, February 15, 2011

आदरांजली स्वरभास्कराला


भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीच्या रणांगणावर तंबोरा घेउन कित्येक वर्ष साथ करणारे दोन स्वरसाधक माधव गुडी आणि राजेंद्र दिक्षित ( राठोड) यांनी आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी १० फेब्रुवारीला टिळक स्मारक मंदीरात  स्वरांजली सभेत गाऊन त्या स्वरांचे स्मरण केले. एक वेगळा प्रत्यय त्यांनी रसिकांना दिलाच पण गुरून दिलेले स्वरांचे देणे आपण किती तंतोतंत साध्य केले आहे याचे दर्शन घडविले.
रथसप्तमीचा दिवस म्हणजे पंडीतचींचा वाढदिवस असायचा.  आज ते आपल्यात नाहीत पण त्यांची अभंगवाणी आणि ते सूर आजही मनात साठले आहेत. या निमित्ताने त्या सुरांना या दोन शिष्यांनी मोकळी वाट करून दिली. अत्यंत सुरेल आणि सुंदर मैफलीला रसिकांना प्रतिसाद इतका मिळाला की टिळकची बाल्कनीही ब-याच दिवसांनी उघडली गेली. आणि टाळ्यांच्या गजरात रसिक दाद देत होता.
दोन्ही शिष्यांच्या अभंगवाणीच्या गायकीतून पंडीतजींचा सहीसही प्रत्यय उत्तरोत्तर रंगत गेला. इंद्रायणी काठी, मन राम रंगी रंगले, तिर्थ विठ्टल यासारखे अभंगवाणीने अजरामर केलेले अभंग  राजेंद्र दिक्षित आणि माधव गुडी यांनी आळवून त्या दिव्य स्वरसमूहांचा आनंद वाढविला.
पंडितजींचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी, आमदार गिरीश बापट, उल्हासदादा पवार, संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावून कलावंतांच्या कलेला पर्यायाने पंडीतजींच्या गाण्यालाच आजरांजली वाहिली. प्रत्येक अभंगानंतर समर्पक अशी आठवण आणि पंडीतजींच्या मोठेपणाचा भाग रंगवत नेऊन मंगेश वाघमारे यांनी अभंगवाणी रसरशित होण्याला मदत केली.
आदरांजली स्वरभास्कराला या कार्यक्रमाला पुण्यातील नावाजलेल्या कलाकारांची साथसंगत लाभली. हार्मानियमवर संजय गोगटे तर व्हायोलिनवर सौ. चारुशीला गोसावी यांनी अभंगातील प्रत्येक जागा जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहचविल्या. तबल्याची साथ वयाने सर्वात लहान असलेला विनित तिकोनकर यांनी फारच सुंदर केली. तसेच त्याचे वडील अविनाश तिकोनकर यांनी पखवाजवर समर्पक साथ करून मैफलीची रंगत वाढवित ठेवली. पंडीतजींबरोबर जवळपास प्रत्येक कार्यक्रमात टाळाची साथ करुन वाहवा मिळविणारे बुजुर्ग कलाकार माऊली टाकळकर यांचीही साथ या कर्यक्रमाला लाभली  होती हे माठे भाग्यच म्हणायचे.
दोन-अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता पंडीतजींच्या जो भजे हरि को सदा या भजनाच्या ध्वनिमुद्रणाने झाली आणि पंडीतजींचा धीर गंभीर स्वर मनात साठवून रसिक तृप्त झाला.

<iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/UmgAa5xJjlM" frameborder="0" allowfullscreen></iframe>


Friday, February 11, 2011

सर्वाधिक गायक, वादक आणि चित्रकार पुण्यामध्ये

पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक गायक, वादक आणि चित्रकार राहत असल्याची माहिती भारतीय कला मंचाने कलाकार डायरीसाठी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

पुण्यासह राज्याच्या विविध भागात राहणारे शास्त्रीय, सुगम संगीत गायक, वादक, कवी, लेखक, चित्रकारांपासून कार्यक्रमांचे संयोजक, निवदेक यांची माहिती देणारी 'कलाकार डायरी' भारतीय कला मंच गेल्या अकरा वर्षांपासून प्रसिद्ध करीत असून त्यांच्या आता तब्बल आठ हजार कलाकारांच्या माहिती संग्रह तयार झाला आहे. यात अभिनेते, नर्तक, लोककला सादर करणारे कलाकार, वाद्य दुरुस्ती करणारे, सन्मानचिन्ह तयार कारागिर, संयोजक, समीक्षक, नाट्यगृह, कला संस्थांची माहिती देण्यात येते.

सुरुवातीला केवळ पाचशे कलाकारांच्या माहितीने सुरू झालेली ही डायरी आता आठ हजार कलाकारांपर्यंत पोचली असून, यात सर्वाधिक कलाकार पुण्यात राहत असल्याचे दिसून आले आहे. कलाकारांचे विभागणी केली, तर ७० टक्के गायक, वादक, चित्रकार आणि शिल्पकार पुण्यातच वास्तव्यास आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, नृत्य कलाकार मुंबईमध्ये सर्वाधिक आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये त्यांची खूप कमी संख्या आहे, अशी माहिती भारतीय कला मंच संस्थेचे प्रमुख धनंजय देशपांडे यांनी दिली.

अनेकांना आपल्या घरी, सोसायटीत अथवा संस्थेत विविध उपक्रमांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम करायचे असतात. पण त्यांना संयोजनाचा अनुभव नसल्याने कलाकार कुठे राहतात, त्यांच्याशी संपर्क कसा साधावा, कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे, याबद्दल गोंधळ होतो. सर्वसामान्यच नव्हे, तर मोठमोठ्या संस्थांही याबाबत फारशी माहिती नसते, अशा व्यक्तींना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. बालकलाकारांपासून ते ज्येष्ठ कलाकारांची माहिती दिली जाते.

या वषीर्ही मार्चमध्ये डायरी प्रसिद्ध होणार असून, कलाकारांनी आपली नावे आणि संक्षिप्त माहिती नाव पत्यासह लिहून भारतीय कला मंच, २३, स्वप्नशिल्प अपार्टमेंट, डॉ. भगली शेजारी, सिंहगड रस्ता, पुणे : ५१, फोन ९४२२३०४३४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.