subhash inamdar

subhash inamdar

Sunday, January 2, 2011

स्वप्नऋतु सीडीतून तरूणाईची गाणी

स्वप्न
हेमंतातल्या गारव्यासारखी
गोड आल्हाददायक स्वप्न
चांदराती सरून गेल्यावर
पहाटेला गुलाबी रंग देणारी ..
ही स्वप्ल
अशी हळवी, मोहक स्वप्नांची गीते देणारी स्वप्नऋतु

स्वप्ने सगळेच पाहतात. ती खरी करण्यासाठी आयुष्य वेचतात.
या स्वप्नाऋतु या श्रीरंग उ-हेकरया तरूण संगीतकाराने केलेल्या  आठ गाण्यांची सीडी पुण्यात रविवारी २ जानेवारीला संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. तसा पुण्याचा असला तरी सध्या हैद्राबाद इथं नोकरीनिमित्त गेलेल्या हर्षल पाटील याच्या गीतांना या सीडीत बंदिस्त करण्यात आले आहे. ऋचा घाणेकर – थत्ते हिच्या परिराणीच्या गीताने ह्या सीडीतून तुम्ही थोडे लहानही बनाल.

संगीताच्या ह्या दुनियेत नव्याने उदयाला येणा-या या संगीतकाराच्या कामाचे कौतूक करताना त्याने केलेल्या गीतांचेही आनंद मोडक यांनी कौतुक केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निखील श्रीराव यांनी या सीडीची निर्मिती केली आहे. त्यांच्या रूपाने मराठी शब्दांवर प्रेमकरणारा आय टीतला एक तरूण पुढे आला याचा अधिक आनंद होतो. या मराठी अल्बमच्या निमित्ताने अनेक नवे कलावंत संगीताच्या क्षेत्रात दिसायला लागतात. यात संगीतकार श्रीरंग उ-हेकर हा संगीतकार. गीते लिहिणारे हर्षल पाटील आणि ऋचा घाणेकर-थत्ते. अभिषेक मारोटकर हा गायक.
तसे या स्वप्नऋतुत दोन गीतांना सुरेश वाडकरांसारखा गायक-कलावंत सामिल झाल्यानेही या नविन मंडळींना हुरूप येणार आहे. या शिवाय सारेगमप मधले दोन चेहरे ऐकता येतात एक आनंदी जोशी आणि मुग्धा वैशंपायन हे गायक.
सर्वांनीच तयार केलेला हा मराठी अल्बम मनसा या कमलेश भडकमकरांच्या संस्थेने वितरीत करण्यासाठी घेतला आहे. यातच त्याचे मह्त्व पटून जाते.
या निमित्ताने अमर ओक यांच्या बासरीवादनाची छोटेखानी मैफल रंगली. त्यांनी बासरीतून घेतलेल्या आगळ्या सुरावटींनी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत आखणी वाढ झाली. त्यांनी पोकळ बांबूच्या बासरीमधून श्रीकृष्णाने हाती धरलेल्या मुरलीची कमाल तेवढ्याच ताकदीने दाखवून बासरीवरचे नाद ह्दयात साठविण्याची संधी दिली.
आनंद मोडक यांनी सकाळच्या जाहिरातीत कांही गोष्टींचा उल्लेख केला तर दर जास्त लागतो याची खंत व्यक्त केली. ध्वनिफितीचे प्रकाशन म्हटले की ती कमर्शीअल जाहिरात होते. म्हणूनच अमर बन्सीच्या जाहिरातीतून सहभागी गायकांची नावं टाकून जाहिरात दिली आणि हा समारंभ त्याचाच एक भाग म्हणून करावा लागला यांची खंत स्पषटपणे जाणवली.

स्वरांचे सूरेल नाते ते बासरीच्या सूरातून. गायकांच्या मुखातून आणि गीतांच्या बोलातून येत होते आणि ते रसिक चाहता आनंद घेत आस्वाद घेत होता...हेच महत्वाचे नाही काय ?
तुम्हीही हा नवा मराठी गाण्यांचा...मनातल्या भावनांचा...अधु-या स्वप्नांना साकार करणारा....जरूर ऐकावा हिच इच्छा आहे....

सुभाष इनामदार, पुणे
mob. 9552596276


Friday, December 31, 2010

बेला शेंडे-उषा अत्रे पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात  गायिका बेला शेंडे यांना "उषा अत्रे पुरस्कार', तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा ही नटरंग चित्रपटातली लावणी सध्या सर्व वयोगटाच्या रसिकश्रोत्यांच्या तोंडी आहे. ती लावणी बेलाने गायली आणि तिच्या प्रचंड लोकप्रियतेत आणखी भर पडली.
लहान वयात अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळवून हिंदी, मराठी आणि अन्य भाषातून गाणारी पार्श्वगायिका म्हणून बेला शेंडे हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर केव्हाच पोचले आहे. अर्थात त्यासाठी तिचा असलेला गाण्याचा रियाज नक्कीच महत्वाचा आहे.
बेलाने शास्त्रीय संगीताचे शिक्षण आपल्या आजीकडून, सौ. कुसुम शेंडे यांच्याकडून आणि नंतर मोठी भगिनी ख्यातनाम गायिका सावनी शेंडे-साठ्ये हिच्याकडून घतले आहे. तर उपशास्त्रीय आणि सुगम संगीतातले बहुमोल मार्गदर्शन वडिलांकडून, डॉ. संजीव शेंडे यांच्याकडून मिळालं आहे.
१९९८ मध्ये टी व्ही एस. सारेगमप मध्ये बेलाला प्रथम क्रमांक मिळाला आणि तिथूनच तिने आपली य़शाची शिखरे गाठायला सुरवात केली.
तेरा मेरा साथ रहे, एहसास, पहेली, जोधा अकबर अशा हिंदी चित्रपटांसाठी तिने पार्श्वगायन केले. जोधा अकबर मुळे तिला संगीतकार ए आर. रेहमान यांच्याकडे गायची संधी मिळाली. तर दक्षिणेतल्या इलायराजा यांच्याकडे तामिळ भाषेत तिने अनेक गाणी गायली आहेत.
उत्तरायण ह्या मराठी चित्रपटाबरोबरच सोनसावली, झाले मोकळे आकाश, सारेगमप, शुभंकरोती या मालिकांची शिर्षक गीतेही बेलाने गायली आहेत.
माझ्या मना, हृदयामधले गाणे (डॉ. सलिल कुलकर्णी), पंढरीचा स्वामी (आशुतोष कुलकर्णी), हे तिचे मराठी अल्बम्स प्रसिध्द आहेत.
सपने, कैसा ये जादू या तिच्या हिंदीतल्या अल्बम्सला झीचा पुरस्कार लाभला आहे. अ.भा. सुगम संगीत संमेलन, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन, एलोरा फेस्टिव्हल, हृदयनाथ मंगेशकरांचा भावसरगम, श्रीनिवास खळे संगीत रजनी, नक्षत्रांचे देणे, पुणे फेस्टिव्हल तसेच सोनू निगम, शंकर महादेवन, दलेर मेहंदी यांच्यासमवेत रंगमंचीय कार्यक्रम तिचे चालू असतात.
पहिला नर्गिस दत्त पुरस्कार, पुणेकी आशा पुरस्कार, Pride of Pune 2004, रेडिओ मिरचीचा Best Playback Singer पुरस्कार, नटरंगमधल्या लावण्यांसाठी पुरस्कार, आयफा साठी नामांकन, सह्याद्रिचा महाराष्ट्र संगीतरत्नचे सूत्रसंचालन आणि सध्या ई-मराठीवरील गौरव महाराष्ट्राचाची परीक्षक...अशा अनेक उल्लेखनीय गोष्टी......
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त नटरंगमधल्या लावण्यांसाठी बेला शेंडे यांना झी गौरव, म. टा. सन्मान, व्ही. शांताराम आणि कलागौरव हे पुरस्कार मिळाले आहेत.. शिवाय राज्य पुरस्कारही आहेतच.

कमलेश भडकमकर-विजया गदगकर पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात वादक कमलेश भडकमकर यांना "विजया गदगकर पुरस्कार' तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

झी-मराठीच्या जगभर लोकप्रिय असलेल्या सा रे ग म प या कार्यक्रमाचे संगीत संयोजक म्हणून कमलेश भडकमकर यांचे नाव सर्वपरिचित आहे. पण या आधीपासून, हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादक म्हणून ते संगीत क्षेत्रात ओळखले जातात.
पहिल्यापासून मुंबईत असल्याने त्यांना मोठे कार्यक्षेत्र उपलब्ध झाले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, गानसरस्वती किशोरी आमोणकर, श्रीनिवास खळे यांच्या रंगमंचीय कार्यक्रमातून तसेच ताक् धिना धिन (सह्याद्रि वाहिनी), नक्षत्रांचे देणे यातही त्यांनी साथ केली आहे.
सध्या कमलेश भडकमकर हे संगीत दिग्दर्शन आणि संगीत संयोजन क्षेत्रात स्वतःचे नाव गाजवित आहेत. अनेक हिंदी, मराठी चिक्त्रपटांचे . काही दूरदर्शन मालिकांच्या शीर्षक गीतांचे संगीत देत आहे. कमलेश यांच्या नावावर मराठी गाण्यांचे अल्बम्सही बाजारात आले आहेत.
संगीत संयोजक म्हणून त्यांची कामगिरी प्रचंड आहे. आधार, कृष्णाकाठची मीरा, पांढर, एक उनाड दिवस, आरं आर आबा आता तरी थांबा, गाव तसं चांगले, आनंदी आनंद, बालगंधर्व अशा चित्रपटांबरोबरच संगीतकार श्रीनिवास खळे, कौशल इनामदार, डॉ. सलिल कुलकर्णी, कमलाकर भागवत, उल्हास  बापट अशा अनेक संगीतकारांबरोबर असंख्य ध्वनिफितींचे संगीत संयोजन त्यांनी केले आहे. यात अवघा रंग एक झाला या नाटकाची समावेश आहे. शिवाय सध्याच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचं संगीत संयोजन त्यांचेच आहे.
झी गौरव पुरस्कार, सा रे ग म प मेगाफायनल्स अशा भव्य कार्यक्रमांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करीत असतात. मिस वर्ल्ड १९९६ या आंतराष्ट्रीय समारोहाला भडकमकरांचे संगीत संयोजन होते.
आजच्या काळातील संगीत आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी कमलेश भडकमकरांनी २००६ मध्ये मनसा ही स्वतःची संस्था सुरू केली. या संस्थेतर्फे त्यांनी तीन अल्बम्सची निर्मिती केली असून ३५ अल्बम्सचे वितरण केले आहे.
त्यांना आधार या मराठी चित्रपटाच्या संगीतासाठी २००३चा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा झी गौरव पुरस्कार आणि २००८ मध्ये जागो मोहन प्यारे या मराठी नाटकाच्या पार्श्वसंगीतासाठी राज्य पुरस्कार मिळाला आहे.

विजय कोपरकर-माणिक वर्मा पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात गायक विजय कोपरकर यांना "माणिक वर्मा पुरस्कार',  तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच नाट्यसंगीत या सर्व क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे कलाकार म्हणून विजय कोपरकर यांचा विशेष नावलौकिक आहे.
वयाच्या ८ व्या वर्षापासून सतत  २२ वर्षे संगीतसाधना करून विविध मान्यवर गुरूंकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले आहे. अगदी सुरवातीचे मार्गदर्शन त्यांनी डॉ. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडून घेतले. त्यानंतरची पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. नंतरची आठ वर्षे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून संगीत शिकण्याचे भाग्य मिळाले.
 विजय कोपरकर हे आकाशवाणीचे उच्च दर्जा लाभलेले गायक असून आजवर देशात-परदेशात अनेक मान्यवर संगीत महोत्सवात त्यांचे गायन झाले आहे. त्यातले विशेष उल्लेखनीय म्हणजे एन. सी. पी.ए.(मुंबई), पुण्याचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव, दीनानाथ मंगशकर समारोह (गोवा), राजाभाऊ पूंछवाले समारोह (जबलपूर), नागवर्धन सभा (कानपूर), पं. जितेंद्र अभिषेकी स्मृति समारोह (मंगलोर), भजन सभा ( कालिकत-केरळ), इंडिया इंटरनॅशनल सेंटर (दिल्ली). याशिवाय अहमदाबाद, नाशिक, इंदूर, आग्रा, चेन्नई, मणिपाल या ठिकाणीही त्यांच्या मैफली झाल्या आहेत. नुकतेच ते अमेरिकेचा दौराही करून आले अहेत. विजय कोपरकर यांनी गायलेल्या विविध रागांच्या ध्वनिफिती यापूर्वीच प्रकाशित झाल्या आहेत.
आजवरच्या संगितिक कामगिरीबद्दल त्यांना अनेक मानसन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. १९८३ ते १९९० या वर्षात त्यांना सुधीर फडके यांच्या सुलश्री प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती मिळाली होती. याशिवाय गांधर्व महाविद्यालयाचा पं. रामकृष्णबुवा वझे पुरस्कार. अनंतरंग आर्ट फौंडेशनचा कलागौरव पुरस्कार. सुशिलकुमार शिंदे ट्रस्टचा सुशील स्नेह पुरस्कार. विश्वेश फौंडेशनचा विश्वेश पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.
विजय कोपरकर हे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.ई. (Mattallurgy) असे उच्चविद्याविभूषित असून एक लघुउद्योजक म्हणूनही स्वतःचा व्यवसाय सांभाळतच आहेत. 

केदार पंडित -केशवराव भोळे पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात संगीतकार केदार पंडित यांना "केशवराव भोळे पुरस्कार',  पुरस्कार' तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी व-हाडी झटका, पुणेरी फटका या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करून केदार पंडित यांनी कारकीर्दीला सुरवात केली.
केदार पंडित यांनी अल्बम्स. चित्रपट. Animation Movies. दूरचित्रवाणी मालिका. जाहिरात. नाटके. आणि बॅले यासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांचे काम मुख्यतः भक्तिसंगीत प्रकारात अधिक आहे. सुगम, लोकसंगीत, गझल, भावगीत आणि रॅप प्रकारही त्यांनी सहजपणे हाताळले आहेत. त्यांच्या अल्बम्स मधील संगीतात गुंफलेले मंत्र आणि स्त्रोस्त्रे रसिकप्रिय आहेत. केदार पंडित यांच्या मराठी, हिंदी तसेच संस्कृत भाषातील दिग्दर्शित रचना लोकप्रिय आहेत.
संगीत दिग्दर्शक म्हणून केदार पंडितांनी जुन्या आणि नव्या पिढीतल्या पं. जसराज, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, अनुप जलोटा, संजीव अभ्यंकर, देवकी पंडीत, साधन सरगम, शान, आशा खाडिलकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, अजित कडकडे, वेशाली सामंत, श्रीकांत पारगांवकर, आरती अंकलीकर, अजय पोहनकर, स्वप्निल बांडोदकर, अभिचित सावंत, सावनी शेंडे, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे अशा गायक कलाकारांबरोबर काम केले आहे.
टाईम्स, सोनी, म्यूझिक टुडे, ई.एम.आय, बिग, व्हेल, फाऊंटन, विंग्ज, व्हिनस, पाकॉक, टिप्स म्यूझिक अशा कंपन्यांसाठी ३५० हुन अदिक अल्बम्सला संगीत दिले आहे. त्यांचे भारत है हमारी मातृभूमी हे शकर महादेवन यांनी गायलेले गाणे OVI च्या संकेस्थळावर सर्वेत्तम २० गाण्यांच्या यादीत ७ वे आणि एकमेव चित्रपटेतर गीत होते.
संगीत दिग्दर्शक वडील प्रभाकर पंडितांबरोबरच आई श्रीमती अनुराधा पंडितही निष्णात व्हायोलिनवादक असल्याने केदार यांना संगीत वारसा हक्कानेच मिळाला आहे. या पोषक वातावरणातच त्यांनी शास्त्रीय संगीत आराधनेला सुरवात केली. आधी अजराडा घराण्याचे कै. पे. यशवंतराव केरकर यांच्याकडे तबला शिकल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ज्येष्ठ गुरुबंधू व केरकरजींचे शिष्य पं. श्रीधर पाध्ये यांच्याकडून घेतले. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी पं. जसराज, श्रीमती किशोरी आमोणकर, पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी इत्यादी दिग्गजांबरोबर तर नव्या पिढीतले संजीव अभ्यंकर, देवकी पंडीत, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, रतन शर्मा, शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, सावनी शेंडे अशा कलाकारांना तबल्यावर साथ केली. शास्त्रीय संगीताच्या मैफलीबरोबरच केदार पंडित यांचा नेहमीच सिनेसंगीत आणि इतर रेकॉर्डिंगमध्ये लता मंगेशकर, मन्ना डे, नौशाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल, उत्तम सिंग, जतिन ललित, शंकर एहसान लॉय, सुधीर फडके, प्रभाकर पंडित, य़शवंत देव, अशोक पत्की, श्रीधर फडके या संगातकार आणि गायकांबरोबरचा सहभाग हा एक महत्वाचा भाग आहे.
केदार पंडित यांनी शास्त्रीय संगीताच्या अनेक प्रतिष्ठित मैफलीत भारतात तसेच जगभर कार्यक्रम सादर केले आहेत.
अंतर्नाद (पुणे-२०१०) या Guiness Book of World Records मध्ये नोंद झालेल्या विक्रमी कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन आणि संगीत संयोजन केदार पंडित यांनी केले होते. यात २७०० शास्त्रीय संगीत गायक एकाच वेळी एकाच मंचावरून गायले.
केदार पंडित हे मेवाती घराना पुरस्कार व अष्टपैलू संगीतकार या दोन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

कलाकार नव्हे तर कला मोठी

""कलाकार नव्हे तर कला मोठी असते, याचे भान कलाकाराला येते तेव्हा कला आणखी मोठी, समृद्ध होत असते,'' असे प्रतिपादन तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी गुरुवारी येथे केले. संगीत हे प्रवाहशील असते आणि असायला हवे. त्यामुळे ते अधिक भावते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात संगीतकार केदार पंडित यांना "केशवराव भोळे पुरस्कार', गायक विजय कोपरकर यांना "माणिक वर्मा पुरस्कार', गायिका बेला शेंडे यांना "उषा अत्रे पुरस्कार', वादक कमलेश भडकमकर यांना "विजया गदगकर पुरस्कार' पं. तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, गीतकार सुधीर मोघे, कार्यकारी विश्‍वस्त प्रकाश भोंडे उपस्थित होते.
कलेच्या सेवेत ईश्‍वरसेवा आहे, असे सांगून पं. तळवलकर म्हणाले, ""हल्लीचे संगीत पूर्वीसारखे नाही, अशी ओरड होत असली तरी या मताशी मी सहमत नाही. संगीत हे प्रवाहशील असते आणि असायलाही हवे. त्यामुळे ते अधिक भावते. खरे तर संगीत ही एक संस्कारक्षम विद्या आहे. त्याशिवाय संगीत आत्मसात करता येत नाही. म्हणून कलाकारांनी संगीतातच रमायला हवे. पुरस्कार मिळवण्यापेक्षा रसिकांचे प्रेम मिळवणे महत्त्वाचे आहे''. सुगम संगीताच्या क्षेत्रात "स्वरानंद' गेली 40 वर्षे सतत काम करते हे अतिशय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

कमलेश भडकमकर म्हणाले, ""संगीतात सतत कष्ट करण्याची तयारी हवी. मात्र, रिऍलिटी शो, झटपट प्रसिद्धी-पैसा यामुळे सध्या कष्ट करण्याची पद्धत कमी होत आहे. हे असुरक्षिततेचे वातावरण घातक आहे.''

पुरस्काराला महत्त्व असते. मात्र, तो कोणातर्फे, कोणाच्या हस्ते, कोणासोबत मिळतोय यालाही महत्त्व असते, असे कोपरकर यांनी सांगितले.

केदार पंडित यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला.
तर, "वाजले की बारा', "अप्सरा आली' ही गीते सादर करून बेलाने रसिकांची खास दाद मिळवली.





Thursday, December 30, 2010

दमां'च्या पुस्तकांचे हक्क "मेहता पब्लिशिंग'कडे

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची लोकप्रिय पुस्तके बाजारपेठेमध्ये सहजपणे उपलब्ध होत नाहीत. हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क "मेहता पब्लिशिंग हाउस'कडे दिले आहेत. नव्या पिढीच्या वाचकांसाठी नव्या संचातील १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत. 

मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनील मेहता यांना मिरासदारांची पुस्तके बाजारामध्ये मिळत नसल्याचा अनुभव आला. आठ महिन्यांपूर्वी त्यांना "माझ्या बापाची पेंड' हे पुस्तक हवे होते. त्यांनी चौकशी केली असता या पुस्तकासह मिरासदारांची सर्वच पुस्तके उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यातून त्यांनी प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या माध्यमातून प्रा. मिरासदार यांच्याशी संपर्क साधला आणि पुस्तके नव्याने प्रकाशित करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मिरासदार यांनी त्यांच्या १८ पुस्तकांचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊसला दिले.
मेहता म्हणाले, ""एखाद्या लेखकाची पुस्तके उपलब्ध होत नाहीत याचा अर्थ त्यांचे नाव कमी होते की काय, अशी भीती मला वाटली. ही पुस्तके नव्या पिढीपर्यंत पोहोचवावीत हा यामागचा उद्देश आहे. मिरासदार यांच्या बहुतांश पुस्तकांना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची मुखपृष्ठे आहेत. त्यामुळे उर्वरित पुस्तकांनादेखील नव्याने मुखपृष्ठे करून द्यावीत, ही आमची विनंती फडणीस यांनी मान्य केली आहे. "मिरासदारी' आणि "निवडक द. मा.' या पुस्तकांमध्ये त्यांच्या निवडक कथांचा समावेश आहे.''
"गाणारा मुलूक', "मी लाडाची मैना तुमची', "नावेतील तीन प्रवासी', "माझ्या बापाची पेंड', "चुटक्‍याच्या गोष्टी, "गुदगुल्या', "भोकरवाडीच्या गोष्टी', "सरमिसळ', "चकाट्या', "हसणावळ', "गंमत गोष्टी', "जावईबापूंच्या गोष्टी', "गप्पांगण', "माकडमेवा', "बेंडबाजा', "खडे आणि ओरखडे', "सुट्टी आणि इतर एकांकिका' आणि "विरंगुळा' ही १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.